मनाचा आपल्याशी आणि आपला मनाशी संवाद भाग ६
अश्या प्रकारे शांत होण्याचा , शरिराने आणि विचाराने , प्रयन्तपूर्वक सराव कर. वेळ लागू दे. कोणतीही परीक्षा नाही. किंवा मार्क्स नाहीत. हा सराव करताना श्वास हळू हळू एका लयीत येऊन शांत शांत होत जाईल. यात एक स्थिती अशी येईल, कि आपल्याच श्वासाचा धीमा धीमा होत चाललेला प्रवास आणि त्याचा आवाज सुद्धा ऐकू येऊ लागेल. हे घडलं तर समज कि, तू योग्य दिशेने आहेस. या सरावाला प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आणि काळाने पोचू शकेल. काही घाई करायची गरजही नाही. अत्यन्त सावकाशपणे इथे पोहोचायचे आहे. या स्थितीत पुढे आपल्या ह्रदयाचे ठोके सुद्धा कानांना ऐकू येऊ लागतात. याचासुद्धा आनंद घ्यावा.
जितकी शांतता जास्त तितकाच या स्थितीचा आनंद जास्त. मनातले नको ते आणि हवे ते असे विचारांचे विभागीकरण करता येत. जे विचार आपल्याला नको असतील त्यांना बाजूला सारून जे विचार चांगले आहेत, सकारात्मक आहेत, ते जोपासता येऊ शकतील. हे साध्य झाल्यानंतर जे विचार आता नकारात्मक वाटतात त्यांना प्रयत्नपूर्वक दूर करणं या स्थितीला शक्य होऊ शकत. कारण मन पूर्ण शांत आहे आणि विचार पूर्ण थांबलेले आहेत.
आता फक्त आपण आणि आपले विचार हे दोनच साथीदार. या स्थितीचा सुद्धा काही काळ आनंद घ्यावा. इथे शांत राहण्याचा सराव करावा. या निर्मळ आनंदात अगदी भान हरपून गेलं तरी हरकत नाही . इतक्या शांततेत गेल्यानंतर विचार हे आपोआप स्तब्ध व्हायला सुरवात होते. त्यावर हळुवार नियंत्रण येऊ लागतं. हेच आपलं विचारचं धन आहे पुढे जाण्याचं. कारण इथं आपण सराव करायचा कि, कोणते विचार प्रयत्नपूर्वक आपल्याला बाजूला करायचे आहेत. म्हणून घाई उपयोगाची नाही. अत्यन्त सावकाश ह्या स्थितीला थांबून काही दिवस इथेच राहण्याचा सराव करणं गरजच आहे.
या नंतर आपल्याला एक सुखद शांतीचा अनुभव येईल. जो कदाचित या आधी कधीही घेतला नसेल. ध्यान, धारणा नित्य नियमित करणाऱ्या लोकांनां हा अनुभव येत असतो. या स्थितीला राहण्याचा सराव झाला कि, मग पुढच्या तयारीला लागता येत. पुढच्या स्थितीत आपल्याला आपल्या विचारांना चालना देणं किंवा त्यांना आपल्या मनाप्रमाणे वळवण हे महत्वाचं कार्य करायचं आहे.
पण त्या आधी इथपर्यंतचा सराव हा पूर्ण करणे गरजेचे आहे. हे पुन्हा नमूद करू इच्छितो.
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
०२/०७/२०१८
१६:३०
Comments
Post a Comment