आमच्या इथे सोसायटी बाहेर रस्त्यावर काही छानशी झाड आहेत. त्यावर ३,४ प्रकारचे पक्षी आहेत, किंवा असावेत. पण त्यात एक विशिष्ट पक्षी जातीत २ पक्षी असावेत. असावेत यासाठी की, २ जणांचा आवाज येतो, म्हणून .
त्यांचा आवाज रोज ब्राम्हमुहूर्ताला साधारण ३ वाजल्यापासून सुरू होतो. अर्थात मंजुळ आवाज आहे त्यांचा. नाव खरच माहीत नाही. पण खूप छान संवाद चालू असतो दोघांचाही. ३ पासून ६ ते ६.३० पर्यंत त्यांचा मुक्त संवाद रोज सुरू असतो. त्यातील पहाटे ४ पासूनचा संवाद रोज मी ऐकतो. खूप छान संवाद असतो. एक तर आवाज मंजुळ शीळ घातल्यासारखा आहे. आवाजाचा पोत खूप छान आहे.
मला प्रश्न पडतो रोज काय बोलत असतील हे दोघ. मुळात हे दोघ कोण आहेत. नर व मादी ( बहुदा असावेत) . याच अंदाजावर त्यांचा मुक्त संवाद मी कल्पनेने शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. आपण सोयी साठी तो आणि ती अशी नाव देऊ त्यांना
तो : काय ग उठलीस का
ती : हो आताच तुझ्या आवाजाने जाग आली. छान डोळा लागला होता.
तो : मग काय उठायचा विचार नव्हता की काय.
ती : तस शक्य आहे का. आपण काय माणसं आहोत का. आपल्याला काय रविवार, सुट्टी काही असतं का. निसर्गाने जो नियम घालून दिला, तोच युगानुयुगे अव्याहत चालू ठेवून पालन करायच त्याच.
तो : हो हे बाकी खर बोललीस. मग झाली का चोच घासून.
ती : इश्य सकाळीच काय रे .
तो : ऐ येडे काय डोक्यावर पडलीस का काय. म्हणजे स्वच्छ केलीस का म्हणायचंय.
ती : अस होय. मला तेच वाटलं इतका कुठला तू रसिक.
तो : ते तसलं सर्व माणसांच्यात असतं. आपण पक्षी आहोत.
ती : ते असुदे पण प्रेम करणं ही निसर्गदत्त कला किंवा भावना तर आहे. आणि ते व्यक्त तर करू शकतो आपण.
तो : ते आहेच म्हणा.
ती : मग . शिवाय माणसासारखं प्रेम म्हणजे फक्त शारीरिक हे आपल्यात नसत रे. काही विशिष्ट गोष्टी आणि वेळा सोडल्या तर आपल्या डोक्यात सुद्धा या गोष्टी नसतात.
तो : हो खर आहे. त्या भावना वा वासना माणसांच्यात, आपल्यात नाही. आपलं प्रेम हे विशुद्ध , निरपेक्ष आणि निष्पाप असत.
ती : हो ना आणि तरी आपल्याला त्या माणसासारख्या व्यक्त करता येत नाहीत. चेहऱ्यावरील रेशांमधून. अव्यक्त असून देखील आपण निरपेक्ष आहोत.
तो : कदाचित म्हणूनच निरपेक्ष आहोत. हो आणि कोणत्याही दुर्गंधाशिवाय सशक्त आणि निष्पाप प्रेम करतो.
ती : आणि किती सकारात्मक ऊर्जा दिल्ये आपल्याला निसर्गाने. कधीही निराश नसतो, आपण.
तो : निराश व्हायचच कशाला, कारण आपण कोणत्याही क्षणात गुंतत नाही. कोणत्याही एका विशिष्ट क्षणाचा धागा बांधू शकत नाही आपल्याला आणि म्हणूनच आपली पुढची पिढी, आपली चिल्ली पिल्ली स्वयंसिद्ध झाली की ते वेगळे आपण वेगळे. आपणसुद्धा मोकळे आणि ते सुद्धा.
ती: हो ना नन्तर बघायला देखील थांबत नाही, पुढे काय झालं , होईल. तुला आठवतंय का रे. तुझे जन्मदाता.
तो : छे ग . असले मायेचे पाश आपल्याला दिलेच नाहीत, देवाने. म्हणून तर आपण मुक्त आहोत, मोक्षासम. जितकी वर्ष जगलो, छान जगलो. काळ आणि वेळ आली की, निघालो.कसलाही गुंता नाही.
ती : हो आणि त्यांच्याप्रमाणेच जोडी जोडी करूनच रहातो. पण लग्नाचं बंधन नसताना सुद्धा विश्वासाने राहतो.
ती : हो ग खर आहे. बघ ना यातल्या कोणत्याच गोष्टीचा , किंबहुना कोणत्याही गोष्टीचा बाऊ करत नाही आपण.
ती : हो तरीही सार्थ आहोत आणि समर्थ आहोत. हाताशिवाय फक्त चोचीनेच सर्व करतो.
तो : खर आहे. बर चल खूप गप्पा झाल्यात. आता माणस उठायची वेळ झाली. आपण पण न्याहारीची सोय करू.
ती : हो चल
दोघेही दोन दिशांना उडून जातात.
© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०७/२०१८
०८:२३
Comments
Post a Comment