(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ५४
"तस कस होईल मुरली आहे पण...."
" पण काय"
"परंतु आता मला मुरली वाजवता येणार नाही. मी इतकंच तुला सांगू शकतो. "
" कृष्णा मला तू सर्वात जवळची समजतोस आणि मलाच सांगत नाहीस. "
"राधे मी तुला इतकंच सांगेन की मी आता मुरली वाजवू शकत नाही. पण का ते तू विचारू नयेस आणि मी ते सांगू नये."
" माझी आणि तुझी प्राणप्रिय मुरली तू का वाजवू शकत नाहीस, हे तुला सांगावं लागेल. तुला शपथ आहे माझी."
" राधे अग आधी शपथ सुटली म्हण, सांगतो मी."
" बर सुटली, पण सांग "
" मी द्वारकेच्या वाटेवर असताना , सूक्ष्म देहाने आपण भेटलो होतो, वृंदावनात. त्यावेळी तू माझ्याकडून एक वचन घेतलं होतंस की, "
"वचन आणि कोणतं"
"की जो पर्यंत आपली पुनर्भेट होत नाही, तोपर्यंत तुझे तीन स्वर गंधार , पंचम आणि धैवत माझ्याकडे राहतील. ज्यावेळी आपली भेट होईल त्यावेळी मी ते तुला परत करीन"
" मी अस वचन मागितलं, तू दिलंस आणि यातलं मला काहीही कस आठवत नाहीये."
" सुप्त मन सूक्ष्म देहाने बऱ्याच गोष्टी करत जे नन्तर स्मरत नाही आणि का दिल म्हणशील तर, मुळात तू कधीही काहीही मागत नाहीस. त्यामुळे कधी नव्हे ते तू मला काही मागितलस आणि मी ते तुला देणार नाही हे कसं शक्य आहे राधे."
" कृष्णा अरे पण तुझी प्राणप्रिय मुरलीच, तुला वाजवता न येणं ही किती मोठी शिक्षा आहे. "
"माझ्यासाठी काय मागितलय, यापेक्षा मागणारा कोण आहे हे जास्त सहज पोहोचत हृदयात माझ्या. म्हणून मी हृदयस्थ व्यक्तीला काहीही देऊ शकतो जे मला शक्य आहे."
" पण आता यावर उपाय."
" यावर उपाय एकच आता ही मुरली घे आणि तू स्वतः वाजव म्हणजे तुझ्या हृदयातून ते तीन स्वर निघून पुन्हा या मुरलीचा प्राण म्हणून परत येतील. तोपर्यंत ही मुरली वाजण शक्य नाही."
अस म्हणून कृष्ण राधेच्या हातात मुरली देते. राधा मुरली हातात घेते, ओठाना लावून श्वासावाटे मुरलीत प्राण फुंकते आणि काय चमत्कार. मुरलीतून स्वर्गीय सूर निघायला सुरवात होते. हे अलौकिक दृश्य, मंत्रमुग्ध होऊन कृष्ण पहातो आहे. कानात मुरलीचे सूर, हृदयात राधेचं प्रेम आणि नयनातून आनंदाश्रूंच्या धारा. आपले दोन्ही प्राण राधा व मुरली एकत्र पाहून कृष्णाला हृदयस्थ झालेला आनंद अवर्णनीय आहे.
या दृश्याला आपल्या डोळ्यांच्या कोंदणात साठवून घेण्यासाठी नारद स्वये येऊन प्रकट झाले. नारदाना पाहून कृष्णाने आश्चर्ययुक्त स्मित केले आणि गप्प राहण्याची खूण केली. काही क्षण भान हरपून मुरली वाजवल्यावर राधा अचानक भानावर आली. समोर प्रत्यक्ष नारद पाहून काहीशी गांगरून गेली. ते पाहून नारद स्वतः म्हणाले
" राधे आश्चर्य वाटले ना मला पाहून "
" हो कारण आपण या क्षणी इथे म्हणजे आपल्याला सुद्धा ........."
"होय राधे मलादेखील ही गोष्ट माहीत होती. कारण या सूक्ष्म देहातील भेटीचा मीच साक्षीदार होतो. नव्हे वृंदावनात तुमची दोघांची भेट होऊ न शकल्यापासून मला देखील रुखरुख लागून राहिली होती. तशी भेट घडावी यासाठीं मीच प्रत्यक्ष प्रयत्नशील होतो. त्यातच हे वचनाचं घडलं. त्यावेळी मी तस सांगण्यास गेलो होतो यदुवीरांना , पण."
"पण मीच नारदाला तस करण्याविषयी मनाई केली होती. म्हणून त्यांनी हरप्रकारे मजपर्यंत तुझी स्थिती पोहोचविण्याचे यत्न केले जेणेकरून मी तुजपर्यंत येईन, तुझी माझी भेट होईल."
राधेने विचारलं
"हरप्रकारे म्हणजे"
"राणी रुक्मिणी, राणी सत्यभामा आणि वहिनींना सुद्धा सांगून बघितलं."
"म्हणजे श्रीनाथ आपण हे जाणत होतात तर."
" नव्हे मला तिघींकडून माझ्या मनःस्थितीविषयी तशी विचारण झाल्यावर, मला त्याच सूत्र कुठून हलत असावं याचा अंदाज आला."
"आणि म्हणून आपण माझी दिशाभूल करण्यासाठी त्यावेळी रागाचा अभिनय केलात. आता लक्षात आलं. "
" हो अर्थातच, पण त्यामुळेच आपण समाधी लावून ब्रम्हादेवाना पाचारण करून त्यांच्याकडून हा उपाय जाणून घेतलात आणि इकडे आलात."
" हो. पण म्हणूनच राधेला आपलं दर्शन होऊ शकलं. भक्त आणि भगवंत यांना भेटवण्यासाठी केलेल्या या युक्त्या प्रयुक्त्या शेवटी यशस्वी झाल्या. आणि आमचा हेतू साध्य झाला."
यावर कृष्ण , राधा आणि नारद तिघेही मनमुराद हसतात.
(उद्या या लेखमालेचा शेवट व त्यानिमित्ताने लेखकाचे मनोगत व पुढील नवीन लेखमालेबद्दल माहिती)
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment