(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४८
या सर्व गोंधळात आता काय करावं कोणाचा धावा करावा , याच विवंचनेत देवर्षी आहेत आणि ते अर्थातच आपले पिता ब्रम्हदेव यांचाच धावा करण्याच्या विचारात आहेत. नारदाना आता कोणताही अन्य मार्ग उरलेला दिसत नव्हता, त्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवाच सर्वशक्तीने , प्राणपणाने नाम घ्यायला सुरुवात केली. कारण अन्यथा या पेचातुन राधा व कृष्ण यांची सुटका होण्याचा अन्य कोणताही मार्ग , निदान देवर्षीना तरी दिसत नव्हता.
बराच काळ यात गेला. द्वारकेत सर्व पूजाविधी यथास्थित पार पडले. सर्वांनी आनंदाने व उत्साहाने आपल्या नवीन घरात प्रवेश करून आपले सर्व सामान सुमान नीट लावून घेतले. अर्थातच या कामी कृष्णाने आदेश दिल्याप्रमाणे राज्यातील सेवक वर्गाने पूर्ण मदत केली. पण त्याही पेक्षा जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे नगरवासीयांनीच एकमेकांची मदत करून , सर्व स्थिर स्थावर होईल याकडे विशेष लक्ष दिल.
कृष्णाने ही सर्व धामधुम संपल्यावर नगराची रचना पाहण्याच्या उद्देशाने बाहेर पडून नगराबाहेर एकांतात काही काळ व्यतीत केला. कृष्णाच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आपली प्रिय भक्त राधा हिची मानसिक अवस्था व आपली भेटही न झाल्याच तीच दुःख व विरह हा, ती रडून, आक्रोश करून, आपला धावा करून, आपलं नाम घेऊन व्यक्त करू शकत आहे. पण आपण. आपण तर अश्या स्थानी व अधिकार पदावर आहोत की, की, काहीही करण्याआधी आपल्याला शत शत वेळा विचार करावा लागतो. दुःख , विरह जनामध्ये व्यक्त करणं तर लांब राहिलं. पण हे भाव चेहऱ्यावर दाखवणं सुद्धा अशक्यप्राय आहे.
राधेचे भाव माझ्या हृदयापर्यंत पोचण्याचा प्रश्नच नाही. कारण राधेच स्थानच माझ्या हृदयात आहे. त्यामुळे ती जे स्मरते, जे वदते, जे श्वास घेते ते सर्व या इथे हृदयात घडतं. अगदी आता सुद्धा, ती माझं आणि फक्त माझंच स्मरण करत आहे. या कठोर आणि निष्ठुर जगात शुद्ध प्रेम, निर्मळ प्रीती आणि निष्कलंक भाव यांना खरच काही महत्व नाही आणि तेही जेंव्हा हे भाव अत्यंत दुर्मिळ होत आहेत. अगदी एक सर्वश्रेष्ठ व्यक्तित्व म्हणून नाही पण एक माणूस म्हणून सुद्धा सांगतो की अस प्रेम मिळायला युगानुयुगे जन्म घालवावे लागतात. अगदी कष्टसाध्य गोष्टी नाहीत या. या प्रारब्धाने आणि पुर्वपुण्याईने प्राप्त होणाऱ्या भाग्यातील गोष्टी आहेत. राधे, माझी व्यस्तता तुजप्रत मला येऊ देत नाहीये. हे तू जाणून आहेस. मी इच्छा असूनही तुजप्रत पोहोचू शकत नाहीये. हे तुंही जाणून आहेस.
देवर्षी नारद ध्यान लावून ब्रह्मदेवांचा धावा करत आहेत. इकडे ब्रम्हलोकात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांपर्यंत नारदांच्या नामाचा दाह पोहोचला आहे आणि सृष्टीकर्त्या ब्रम्हादेवाना हे सिद्ध समाधीत जाणवलं की नारद आपली तीव्र साधना करत असून काही संकटमय स्थितीत सापडला असावा. इतकं जाणवल्यावर ब्रह्मदेवांनी आपली समाधी सोडली आणि मर्त्यलोकी प्रस्थानाची मनीषा केली.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment