Skip to main content

मुरली - ५२

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ५२

कृष्ण क्षणात योगमायेने राधेच्या समोर प्रकट होऊन उभा ठाकला. राधा विरहाने आणि घडलेल्या उपवासाने गलितगात्र होऊन निपचित पडली होती. ओठात आणि हृदयात एकच नाव.

"कृष्णकृष्ण कृष्णकृष्ण कृष्णकृष्ण कृष्णकृष्ण कृष्णकृष्ण कृष्णकृष्ण"

पण तेही अगदी क्षीण आवाजात. ज्या नामाचा जप तिच्या हृदयातून मुखावाटे अस्पष्ट आवाजात ऐकू येत होता, तो साक्षात कृष्ण समोर उभा राहिला असूनसुद्धा राधेला, अर्धमूर्च्छित अवस्थेमुळे, भान नव्हते. कृष्ण समोर उभा राहून ऐकत होता. त्याने हलकेच  राधेला हाक मारली.

"राधे माझ्या हृदयाच्या समीप असणाऱ्या, माझ्या सर्वात निकट असणाऱ्या सखये. बघ मी आलोय. तुझा कान्हा तुझ्या समोर उभा असताना अजून कोणाचा धावा करते आहेस. "

राधा कृष्णाचा आवाज ऐकून एक क्षण मनोमन हर्षित झाली. पण लगेच तिला वाटलं कि, आपल्याला भास झाला असावा. म्हणून ती स्वतःशीच म्हणाली

का मज होती हे भास रें
कृष्ण दिसे दिनरात रे
पळ पळ काया क्षीण रे
तरीहि तुझी मज आस रे

तू उरला जगती भास रे
उगा छळती हे आभास रे
मज ऐकू येति आवाज रे
परी कोणी ना समीप रे

भीती राहिली न काळास रे
मी भक्त तुझी कष्टात रे
दे दर्शन इतुका ध्यास रे
मज जगण्याची ना आस रे
का मज होती हे भास रे

राधेला वाटलं कि आतापर्यंत जसं तिला कृष्ण आल्याचे भास होत होते, तसाच हा देखील एक भास आहे आणि त्याच भासातला आवाज आहे. म्हणून प्रथम तिने आवाजाकडे लक्ष न देता आपलं नाम सुरूच ठेवलं. मग कृष्णाने तिला वाकून हाताला धरून उठवलं. कृष्णाच्या हाताच्या स्पर्शाने राधा भानावर आली. त्याच्या हाताला धरून, अर्धवट अडखळत, पडत, अशक्तपणामुळे धडपडत राधा उठून उभी राहिली.

आपल्या हृदयस्थ कृष्णाला साक्षात समोर पाहून तिला अश्रू अनावर झाले. साश्रू नयनांनी तीने सावळ्या कृष्णाचं रूप अवलोकन करायला सुरवात केली. डोळ्यात अश्रू, लोचनात कृष्ण, आणि हृदयात त्याचंच नाम. प्रथमतः तिचा  स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.  भेटीची आस क्षीण झाली होती आणि तिचे आराध्य आता तिला भेटू शकणार नाहीत अश्या स्थितीला मन आलेलं होत, आत्मा फक्त क्षण क्षण फक्त कृष्णाचा धावा करत होता.

पण अनेक युगांची तपश्चर्या फळास येऊन , ताटातूट झालेले भक्त भगवंत भेटत होते.अचानक समोर कृष्ण उभा.  तिने कृष्णाला स्पर्श करून बघितलं.  नंतर स्वतःला स्पर्श करून बघितलं. होय खरच माझा हरी , माझा कान्हा, गोकुळीचा कृष्ण, नंदकिशोर , यशोदानंदन साक्षात तिच्या हाकेला धावून तिच्या प्राणांचं रक्षण करण्यास सत्वर येऊन उभा ठाकला होता. तिला काय करून अन काय नको असं होऊन गेलं. आधीच अशक्तपणामुळे आणि सुखद धक्कयामुळे तिच्या कंठातून उच्चार सुद्धा बाहेर पडत नव्हता. कृष्ण तिला  पाहून हरकून गेला. दोघेही फक्त एकमेकांना पाहून,  एकमेकांचं रूप डोळ्यात साठवण्याचा यत्न करत होते. जणू युगांनंतर दोघेही एकमेकांना भेटत होते.

आता कृष्णाच्याही डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. भक्ताला भगवंत भेटल्याचा आनंद असतोच. पण इथे भगवंतालाही, आपल्या प्रिय भक्ताला पाहिल्याचा अवर्णनीय आनंद झालेला होता. हा हृद्य सोहळा अंतरिक्षातुन साश्रू नयनांनी स्वतः देवर्षी नारद पाहत होते. ज्यांनी भक्त आणि भगवंत यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. प्रसंगी कृष्णाचा राग पत्करून तिन्ही देवीना विनवणी करून आणि हे सर्व उपाय थकल्यानंतर,  प्रत्यक्ष पिताश्री ब्रह्मदेव यांचा धावा करून , त्यांचा आशिष व सल्ला घेऊन हे सर्व घडवून आणलं होत. त्यांनाही जन्म जन्मांतरीचं  सार्थक झाल्यासारखं वाटत होत. या सोहळ्याचे देवर्षी फक्त साक्षीदारच  नव्हते तर कर्ता करविता होते.

कृष्ण राधेला हर्षपूर्ण नजरेने आणि साश्रू नयनांनी अवलोकत होता आणि राधा कृष्णाला.  या अलौकिक दृश्याचा दुसरा साक्षी होता प्रत्यक्ष काळ. तोही काही क्षण हा सुखद, नेत्रदीपक असा राधा कृष्ण भेटीचा हृद्य सोहळा पाहण्याच्या मोहाला आवरू शकत आणि इच्छित नव्हता, म्हणून स्तब्ध उभा होता. कृष्ण आणि राधा कोणीही काहीही बोलत नव्हते. दोघांकडेही सांगण्यासारखं आणि ऐकण्यासारखं काहीही नव्हतं. जे होत ते फक्त समजून घेण्यासारखं. राधेला कृष्णाचं फक्त दर्शन हवं होत आणि कृष्णाला राधेला सकुशल पाहून समाधान मिळालं होत. 

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...