(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४७
इकडे द्वारकेत सर्वत्र वास्तुपुजेची धामधूम आणि हर्षजल्लोश सुरू असतानाच देवर्षी नारद राधेच्या काळजीने व्याकुळ झालेत आणि या सर्वात त्यांनी स्वतः घोळ घालून ठेवलाय. मुळात श्रीकृष्णाची मनःस्थिती स्वतः राधा आणि त्याव्यतिरिक्त देवर्षी नारद हेच जाणत आहेत. हे माहीत असूनही त्यांनी तीन स्त्रियांना त्यांच्या मनःस्थितीची अर्धवट कल्पना देऊन पेचात भर घातली आहे.
पण त्यामुळे त्यांचा मूळ उद्देश जरी समस्या सोडवून राधेला श्रीकृष्णाची भेट घडवणं हा असला तरीही त्यांनी करून ठेवलेल्या उपद्व्यापामुळे समस्या अधिक गंभीर आणि पेच अजूनच घट्ट झाला असण्याचा संभव जास्त आहे.
द्वारकेत सर्वत्र वास्तुपुजा, वास्तुशांती आणि त्यानिमित्ताने होणारे इतर धार्मिक विधी यांचीच तयारी चालू आहे. नारदाना, सर्वत्र संचार करून लोकांचा आनंद, त्यांची आपल्या नवीन भूमीप्रति कृतज्ञता, या पुजाविधींना आलेलं एकूणच उत्सवाचं स्वरूप आणि या सगळ्याला छेद देणारा, राधा कृष्णाची भेट न झाल्यामुळे, राधेचा विरह, अशी विचित्र स्थिती दिसत आहे. त्यामुळे त्यांना लोकांच्या आनंदात आनंद न वाटता विराहाची व दुःखाची झालर जाणवते आहे.
अर्थात या सर्वात मधुसूदन स्वतः अलिप्त न भासता, सर्वांचा आनंद घेत आहे, असच नारदाना जाणवलं. त्यावर कडी म्हणजे ते स्वतः कृष्णाची मनःस्थिती जाणून घेऊ इच्छित असूनही जाणून घेऊ शकत नाहीत. प्राप्त परिस्थिती इतकी विचित्र झाली होती. राधेच्या मनाची भावावस्था मधुसूदनाला सांगू शकत नाही , राधेला दिलेल्या वाचनातून मुक्तता होत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण मुरली वाजवू शकत नाहीत, मुरली वाजवण्यासाठी राधेला जाऊन समक्ष भेटणं आता शक्य नाही.
या सर्वात श्रीकृष्ण स्वतः कोणताही पुढाकार सध्यातरी घेऊ शकत नाही, तोपर्यंत राधेच व श्रीकृष्णाच विराहाग्नीत जळण आणि भक्त व भगवंत दोघांचीही इच्छा असून व स्वतः भगवंत असूनसुद्धा भेट न होऊ शकण हा पेच काही सुटणार नाही.
मोठी विचित्र कात्री तयार झाली होती. मुख्य म्हणजे या कात्रीच्या एका धारेवर श्रीकृष्ण, एका धारेवर राधा आणि मधोमध नारद असा व्यूह तयार झाला होता. बर हे सर्व प्रकरण बऱ्याच प्रमाणात नारदांनी स्वतः वाढवलं असल्यामुळे ती बोच त्यांच्या मनाला होतीच. सध्यातरी याला काळ हे एकच औषध आहे , हे नारदांच मन काही मानायला तयार नव्हतं. इतका पेच असून सुद्धा ही समस्या सोडवण्यासाठी काही करता येईल का याचा विचार अजूनही त्यांचं मन करतच आहे.
पण इच्छा असूनही मार्ग न दिसत असल्यामुळे निराशा त्यांना ग्रासत होती. ती निराशा पराकोटीला जाण्याआधी काही करावं हा निर्धार त्यांनी केला होता. पण त्यांच्याच उतावळेपणामुळे व घाईमुळे त्याचा पेच त्यांनीच वाढवला. एवढं होऊनही आज त्यांचा कोणीही मदतनीस आता तरी दिसत नव्हता.
या सर्व गोंधळात आता काय करावं कोणाचा धावा याच विवंचनेत देवर्षी आहेत आणि ते अर्थातच आपले पिता ब्रम्हदेव. म्हणून त्यांचाच धावा नारदांनी सुरू केला.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment