llश्रीगणेशाय नमःll ज्ञानोबा माऊली तुकारामllश्रीगुरुवे नमःll
ज्ञानयोग ३
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले
तुझा तूंचि भाव तुझा तूंचि देह
फिटला संदेह अन्य तत्वे
केवळ भौतिक जगाचं ज्ञान हे सत्य अस मानणारे या जगी आहेत. तार्किक दृष्ट्या जे दिसत, जे सिद्ध करता येऊ शकत तेच सत्य असा हा सिद्धांत आहे. कारण ते दिसत ते भौतिक ज्ञानेंद्रियांना समजतं , ते या देहाच्या चक्षुना दिसतं, त्याचा स्पर्श शरीराची ऊर्जा सकारात्मक वा नकारात्मक चेतवतो, त्याचे अनुमान काढावे लागत नाही. पण या त्रिमिती जगाच्याही पलीकडे चतुर्थ मिती असणार यात शंका नाही. कारण विज्ञान जसं जसं पुढे जातंय तसं तसं आपण अनेक अनाकलनीय गोष्टी साध्य करताना दिसतोय. अगदी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून ध्वनिचित्र संवाद साधण्यापर्यंत प्रगती झाली हे नक्कीच विज्ञानाचं यश आहे. यात वाद नाही.
पण या ज्ञानाला मर्यादा आहेत त्या परिणामांच्या. म्हणजेच जसे जसे आपण वैज्ञानिक दृष्टीने पुढे जातोय तसे तसे त्यांचे बरे वाईट परिणामसुद्धा समोर दिसत आहेत वा वाचनात येत आहेत. म्हणजेच हे ज्ञान भौतिक जगतात समृद्धी आणेलसुद्धा पण शाश्वत सत्य या पलीकडे आहे जे आपल्या ऋषी मुनींनी वैदिक व पुराण रुपात मांडून ठेवलं आहे. हे एक प्रकारे कैवल्यज्ञान आहे.
फक्त भौतिक जीवन समृद्ध करण्याचं ध्येय साध्य न करता या विश्वाच्या नियंत्यापर्यंत पोहोचण्याच शास्त्र या वेद व पुरानात अनेक पद्धतीने मांडून ठेवलंय. जे युगानुयुगे खूप मोठ्या समाजाला अप्राप्य होतं आणि ते जगासमोर किंबहुना समस्त मानव जातीपुढे, त्यांना समजेल अशा स्वरूपात येणं गरजेचं होतं. हे जाणूनच माऊलींनी भौतिक जगतात प्रवेश करून त्या अलौकिक कैवल्य ज्ञानाची गुरुकिल्ली सोप्प्या सुटसुटीत जनसामान्यांच्या भाषेत मांडली. हे समस्त मानव इतिहासातील महान कार्य आहे.
अश्या या कैवल्य ज्ञानाचा स्पर्श जरी झाला तरी पुढच कार्य सुकर होतं. मार्ग सुलभ होतो. अस हे अलौकिक अध्यात्मिक ज्ञान. ज्याचा उल्लेख माऊली प्रथम चरणात सुरवातीलाच करतात. पारलौकिक गूढ आणि अनंत शक्तिमान परमात्म्याचं ज्ञान ज्याला प्राप्त झालं, ज्याचे आत्मिक डोळे या ज्ञानाने प्रदीप्तीत झाले, त्याला कसलीही तमा उरत नाही. अनेक अर्थाने तो एका वेगळ्या वाटेवर वाटचाल करत असतो.
अश्या ज्ञानाने प्राणी परिपूर्ण होतो. जगात त्याला काहीही करण्यासारखं राहात नाही. असा जीव त्रिगुण आणि भूत भविष्य याही पार असतो. या जीवाला कशाचीही चिंता करण्याचं कारण उरत नाही. असा जीव सर्व उपाधींच्याही पुढे असतो. जगाच्या सर्व भौतिक संज्ञा त्याला लागत नाहीत. म्हणजेच तो एका अर्थी पावन,पवित्र शुद्ध सात्विक भावाचा होऊन उरतो.
ll ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ll
ll ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ll
ll ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ll
ll बोला पंढरीनाथ महाराज की जय ll
प्रेरणा : श्रीसद्गुरू
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२०/०७/२०१८
Comments
Post a Comment