गोग्रासवाडी (डोंबिवली) २
याच श्रीकृष्णाच्या देवळात कृष्णाजन्माचा उत्सव किती छान होत असे. अजून आठवतोय. त्यावेळी गोपाळकृष्णाचं रूप अगदी नजर लागेल असे असायचं. त्याचे कपडे, मुगुट, हार आणि विविध फुल विलोभनीय शोभा होती. मला एक गोष्ट करून बघायची होती राहिली ती. ती म्हणजे एकदा कोणी नसताना श्रीकृष्णाची मुरली वाजवून बघायची राहून गेली. खूप छान होती ती छोटीशी सुबक सोनेरी रंगाची मुरली. (कदाचित याच मुळे श्रीकृष्णाने मुरली सारखी एक सुंदर काल्पनिक कथा लिहून घेतली असावी). याच मंदिरासमोर या मंदिरापेक्षा छोट, हनुमान आणि गणपती एकमेकांच्या पाठीला पाठ लावून असलेलं, पण लौकिकार्थाने मारुती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल छानस मंदिर होत. या मंदिरातील हनुमान जन्मोत्सव सुद्धा बघण्यासारखा होता.
याच कृष्णमंदिराशेजारी, डाव्या हाताला असलेल्या गोठ्याच्या दर्शनी भिंतीवर प्रभात चित्र मंदिराकडून संस्थेला सुमारे १९३६ साली, गोपाळकृष्ण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी, संस्थेची जागा अर्थात गोग्रासवाडी उपलब्ध करून दिल्याबद्दल रुपये २,०००/- रक्कम दिल्याचा, संगमरवरी दगड बसवला आहे. ही खर तर गोग्रासवाडीची शान होती . पण फार थोड्या लोकांना माहिती असेल आणि फारच कमी लोकांना अभिमान. असो. आता या चित्रपटाची सीडी सुद्धा आहे माझ्याकडे.
श्रीकृष्ण मंदिराच्या उजव्या हाताला सुद्धा एक गोठा होता ज्यात काही गायी त्यावेळी असायच्या. एक प्रश्न अजून सतावतो तेंव्हापासून की, इतक्या गायी असून आम्ही कधीही दूध विकल्याच वा वितरण केल्याचं पाहिलं नाही. कुणाला माहीत असेल तर जरूर सांगा. मारुती मंदिराच्या उजव्या हाताला एक बाग होती आणि त्यात कोणाचा तरी संगमरवरी पुतळा होता ( कोणाचा ते आता मला तरी आठवत नाही ). कमानीचा म्हणजेच गेटचा उल्लेख पहिल्या भागात केला. त्याआधी एक छोटी चाळ होती, त्यात सर्वात पहिलच कदम यांचं केशकर्तनालय होत. मध्ये एक दोन दुकान होती आणि चौथ दुकान एक मिठाईवाल्या भय्याच होत. पण तो प्रसिद्ध होता कावीळ उतरवण्यासाठी. त्यामुळे रोज सकाळी ५:३० च्या आधीपासूनच इथे लोक उपचार करून घ्यायला म्हणजे कावीळ उतरवून घ्यायला येत असत.
कृष्णामंदिराच्या मागच्या बाजूला एक छान आणि मोठं वडाच झाड होतं. ज्याला एक छानसा, गोलाकार, सिमेंटचा चौथरा बांधला होता. या चौथऱ्यावर येता जाता मी कित्येक वेळा बसत असे. याच वडाच्या झाडाला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जायची. परिसरातील सर्वच बायका तिथे पूजा करायला जमत असत. गुरुजी अर्थातच वाडीतील सुप्रसिद्ध राजाभाऊ जोशी असत. मी पण आईबरोबर लहान असे पर्यन्त जात असे, अर्थातच लक्ष ठेवायला. कारण पूजेच्या ताटातले जिन्नस, जसे आंबा वगैरे पळवल्या जायच्या,म्हणून आमची नेमणुक आणि बक्षीस म्हणून आंबा मिळायचा. त्यावेळी त्याच अप्रूप खूप होत. आज डझनाने हापूस आणून खातो, पण त्या छोट्याश्या आंब्याची गोडी वेगळी होती.
गेले ते दिन गेले ...................
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
३१/०७/२०१८
Comments
Post a Comment