Skip to main content

मुरली - ५५ व अंतिम

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ५५ व अंतिम

याप्रकारे राधेला दर्शनाचा लाभ आणि नारदांच्या वचनाचं पालन दोन्ही करून भगवंत राधेला म्हणाले

" राधे आता पुढील फार काळ आपली भेट होऊ शकणार नाही. त्याचसाठी माझी आठवण म्हणून ही माझी खास बालपणापासून साथ असलेली मुरली मी तुला देत आहे. माझी जेंव्हा आठवण येईल ही मुरली तू वाजव , तुझे सूर आणि इच्छा माझ्यापर्यंत पोचतील आणि  शक्य असेल त्याप्रकारे मी ते पूर्ण करीन. आता देही भेट फार प्रतिक्षेनंतर होणार आहे. पण तुझी मूर्त माझ्या हृदयात आणि माझे प्राण तुझ्या आत्म्यासमीप असतील, हे मात्र नक्की. "

कृष्णाच्या या शब्दांनी राधेला जणू वीज कोसळल्याचा भास झाला. असेच ते शब्द हृदय पिळवटून गेले. राधेला मुक्त कंठाने रडावस वाटत होतं. पण आपण अस केलं तर कृष्णाला निरोप घेताना त्रास होईल. हे जाणून तिने मुरली त्याच्याकडून स्वीकारली आणि म्हणाली

" कृष्णा तू आणि तुझं अस्तित्व हे माझ्यासाठी हृदयस्थ आहे आणि माझे पंचप्राण हे फक्त तुझ्या आत्म्याच्या समीप आहेत. हे मीपण जाणलय. म्हणून तुझी देहाने भेट जरी अल्पकाळ लाभली आणि पुढे कल्पांतीही घडली नाही, तरीही तुझ्या आठवणीत राधा फक्त तुझंच नाम घेईल. माझे सर्व श्वास हे तुलाच अर्पिले आहेत. म्हणून त्याच काय करायचं हे तू ठरव. मी या देहापलीकडे स्वतःला आणि तुला बघते. तसा साक्षात्कार तूच घडवलास म्हणून तू कुठेही असलास तरीही या राधेच्या हृदयातच असशील. मला माहित आहे."

कृष्णाने साश्रु नयनांनी राधेला बघितलं, तिचा हात हातात घेतला आणि निरोप घेतला, पुढील भेटीपर्यंत, या सूक्ष्म देही स्वरूपातून.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

लेखकाचं मनोगत :

या लेखमालेला वाचकांनी दिलेला प्रतिसाद, दिलेल्या प्रतिक्रिया  यामुळे ही काल्पनिक कथा मांडताना नक्कीच आनंद होत होता.  लेखमाले दरम्यान अनेक नवीन ओळखी झाल्या, अनेक नवीन स्नेही मिळाले. याबद्दल मी सर्वांचा अत्यन्त आभारी आहे. ही कथा व माझं लेखन याला सर्वांनी सांभाळून घेतलं, त्याबद्दलसुद्धा सर्वांचे पुनश्च आभार आणि प्रणाम.

पुढील लेखमाला उद्या पासूनच याआधी एकदा सादर केली होती पण फार काळ झाला म्हणून ती २१ भागांची मालिका परत सुरू करीन. मालिकेचं नाव  "नामावतार कलियुगी"

बाकी यश देण्यास माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत आणि समस्त गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व गुरुजन सोबत असतील याची खात्री आहे. अर्थात वाचकांची साथ ही असणारच याचा विश्वास आहे.

ll जय श्रीराम ll     ll जय श्रीकृष्ण ll     ll शुभम भवतू ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...