भोग आणि ईश्वर ५७९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनाची सर्वात महत्वाची खासियत म्हणजे, त्या मनाला कधीही रीता ठेवता येत नाही. किंबहुना भाव व विचार रहित मन ही संकल्पना तशी बऱ्यापैकी अशक्य कोटीतील वाटते. म्हणजे योगी, साधक व समाधी पर्यंत पोहोचलेले महान आत्मे यांनी कदाचित शून्य विचार ही गोष्ट साधली असेल, हे निश्चित. पण सर्वसामान्य माणसाला, या गोष्टी जमणं ही नक्कीच कल्पने पलीकडील आहेत. कारण मुळात मन हे स्थिर होऊ शकतं, हेच आपल्याला पटणार नाही.
कारण मन हे सतत काही ना काही विचार करणारच. मग त्याला स्थिर कारण कसं शक्य आहे. यावर एक विचार सांगतो, त्यावर चिंतन करा. मनाला स्थिर करण्याचा विचार करण्यापेक्षा, मनातील विचारांना स्थिर करण्याचा उपाय करून बघू शकतो. म्हणजे संकल्पना अशी की, अनेक विचारातून मनाला स्थिर करण्याच्या फंदात न पडता, मनातील अनेक विचारातून, मनाला एका विचारावर स्थिर करणं, आपण नक्कीच साध्य करू शकतो.
म्हणजे अनेक विचारातून शून्यावर येण्याआधी किंवा येण्यापेक्षा, त्यातील एका विचाराच्या धाग्याला पकडून, बाकीच्या विचारांना आपोआप side track करणं किंवा बाजूला सारणं हे नक्कीच अशक्य नाही. हे सवयीने साध्य होऊ शकते. म्हणजे आपणच आपल्या मनात येणाऱ्या विचारांना तपासून, त्यातील गैर, अवास्तव, अशक्य, वासनामय, टाकाऊ विचार बाजूला काढून मग उरलेल्या विचारांचा विचार करू शकतो.
आता उरलेल्या विषयातून, वाजवी व गैरवाजवी किंवा निरुपयोगी आणि सदुपयोगी विचार वेगळे वेगळे करू शकतो. या प्रक्रियेपर्यंत, आपल्याला निदान आपल्याच विचारांचे प्रकार लक्षात येतात. म्हणजे या स्थितीला येण्यासाठी नक्की विचारांचं पृथक्करण, वर्गीकरण, करण्या इतपत बुद्धी वा जाण असणं आवश्यक आहे. मग यातून सामान्य माणसाने कसा काय मार्ग काढायचा. यावर स्वयं ईश्वराने, उपाय सांगून ठेवला आहे की, फक्त माझं स्मरण करत करत आपला नित्यकर्म करत रहा. याचं प्रकारे मोक्षाच्या मार्गात, पडून राहिलं तरीसुद्धा आपलं हित साध्य होऊ शकतं.
कसं तर या ईश्वर स्मरण करत आपला नित्य कर्म करण्याने, आधीच्या परिच्छेदात सांगितलेलं साध्य होऊ शकतं. म्हणजे काय, तर या एका साध्याशा कृतीने, मनाला एका विशिष्ट सकारात्मक आणि उत्तम विचारात, मन गुंतलेलं राहील. जेणेकरून, मनातील इतर अनेक निरुपयोगी उपद्रवी विचार आपोआप दूर होऊ शकतात. दुसरा लाभ म्हणजे, चिंतनाची सवय मनाला लागते. चुकीच्या विचारत व्यर्थ वाया जाणारी मनाची क्रयशक्ती, एका सदकार्यात खर्च होईल.
म्हणजे ईश्वर चिंतनात मनाकडून अतिरिक्त ऊर्जा वापरली जाऊन, कर्माच्या सिद्धांतानुसार, त्याचा अमूल्य लाभ, जन्ममृत्यू मार्गात किंवा प्रक्रियेत, निश्चितच, आत्म्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाईल.
याच्या अजून लाभांबद्दल आपण उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत ईश्वर स्मरणाचा क्रम आपण पुढे नेत राहू.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment