भोग आणि ईश्वर ५९८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करावी असा मानस आहे.
आज मालिकेचा विषय सोडून, आज माझे अनुभव कथन.
खरतर भोग आणि ईश्वर ही मालिका, हाच एक चमत्कार आहे. चमत्कार या अर्थाने,की कोणतीही संहिता, विषय सुची पूर्व लेखन, अगदी वाचनसुद्धा न करता फक्त आणि फक्त महाराजां वरील विश्वास श्रद्धा आणि आत्मचिंतन, या बळावर, पहिल्या दोन भागात संपवूया, या उद्देशाने १ डिसेंबर, २०२० ला फक्त दोनच लेख लिहून, दुसरा विषय घ्यावा, असा साधा उद्देश ठेवला मी. पण पहिले दोन लेख वाचक सूचनेनुसार पुन्हा वाचताना लक्षात आलं की, आपण विषयाची सुरवातसुद्धा न करता, इतिश्री करणार होतो. आजही २ डिसेंबर, २०२० चं माझं फेसबुक पेज पाहिल्यास लक्षात येईल की, दुसऱ्या लेखाचं शिर्षक भोग आणि ईश्वर (इतिश्री) असं आहे. असो.
त्यानंतर या लेखमालेने मला अनेक गोष्टी मिळवून दिल्या आहेत. या लेखमालेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की, यातील प्रत्येक लेख, त्या लेखाखाली दिलेल्या तारखेलाच लिहिला आहे. म्हणजे एकही लेख आधी किंवा आगाऊ लिहून ठेवला नव्हता. अनेक अडचणीच्या काळातसुद्धा, महाराजांनी मला लिहितं ठेवलं. सलग ६०० दिवसा एक विषय घेऊन आणि त्या विषयातील शक्य असतील ते सर्व, यातून मांडणं, हे मानवी प्रयत्नांच्या पलीकडील गोष्ट आहे. नक्कीच काही अतींद्रिय शक्ती, जिने मला भोग आणि ईश्वर या विषयात बांधून ठेवलं.
यातील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो. या ६०० दिवसात जवळजवळ २,३ वेळा सलग सहा सहा दिवस मी अगदी ताप, सर्दी खोकला याने आजारी असताना, पूर्ण दिवस अशक्तपणा असताना, त्याही काळात फक्त आणि फक्त हा लेख लिहिण्याची शक्ती, चिंतन करण्या पुरता विचार, मांडण्या साठी चेतना आणि मनाची शांतता, ही त्या अशक्त पणात सुद्धा, कुठून कशी प्राप्त होत होती, हे ईश्वर जाणे.
विशेषतः २०२१ ची दिवाळी, जेंव्हा पहिल्याच दिवशी मी तापाने आजारी पडलो आणि जवळपास पाच दिवस पूर्ण पडून होतो, त्याही दिवसात ताप असतानासुद्धा, मी हा अनुभव घेतला आहे की, नेमका लेख लिहिण्यासाठी माझा ताप उतरून, लेख पोस्ट करून झाला की, पुन्हा चढला, हा अनुभव मी स्वतः त्या काळात घेतला आहे. तसाच अनुभव जानेवारी २०२२ मधे, जेंव्हा मी पुन्हा ७,८ दिवस तापाने आजारी होतो, त्या आठ दिवसात सुद्धा असाच, ताप उतरून लेख लिहिण्याचा अनुभव मी घेतला आहे. हे बळ, ही शक्ती, ही ऊर्जा, ही प्रेरणा, हे सर्व त्या अतींद्रिय शक्तीची देणगी आहे, जी फक्त आणि फक्त माझ्यावरील कृपे पोटी, माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलकर महाराज यांनीच दिली आहे.
काही गोष्टी मुद्दाम आज सांगायच्या आहेत, ज्यामधे माझं कोणतंही महत्व न वाटता, ज्या शक्तीने हे अद्भुत कार्य माझ्याकडून या ६०० दिवसांच्या काळात करवून घेतलं, त्या शक्तीचा, माझ्याकडून हे करवून घेण्यामागचा उद्देश, नक्कीच सर्वसामान्य जनांना, हे ज्ञान, सहजी उपलब्ध व्हावं, हाच असावा. यातील एका लेखाची सुद्धा कोणतीही पूर्वतयारी मी केली नव्हती, हे घरचे आणि महाराज नक्कीच जाणतात. याव्यतिरिक्त माझे असंख्य वाचकसुद्धा हे नक्कीच जाणतात.
किंबहुना माझ्या लेखांना, अमर्याद वाचकांच्या समोर सहजी नेऊन ठेवण्याचं महत्कार्य, हेसुद्धा वाचकांनीच केले. वाचकांच्या रोजच्या प्रतिक्रिया, हाच मला लिहितं ठेवण्यासाठी, एक उपयुक्त प्रोत्साहन होतं. वाचकांनी हे लेख, फेसबुक वरून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, समस्त वाचकवर्गा पर्यंत पोहोचते केले. याचं वाचकांनी आग्रही मागणी केल्यामुळे, यातील माझ्या लेखांचा संग्रह दोन भागात पुस्तकरूपात प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली.
त्यातही ही पुस्तकं कमीतकमी किमतीत उपलब्ध करून देता यावी, यासाठी मुद्रक कंपनी एस बी प्रिंटर्स सांगली, याचे मालक श्री अमोल कुलकर्णी यांनी केलेलं मार्गदर्शन, सहकार्य, वेळो वेळी दिलेला सल्ला, या सर्वांच्या परिणामतः हे दोन भाग आज वाचकांना उपलब्ध आहे. याचे पुढील भाग ३,४,५ व ६ हे देखील प्रकाशित होतीलसुद्धा. पण आज त्याची छपाई करण्याची तरतूद माझ्याकडे नाही. सर्व भाग एकत्र केले तर, अध्यात्मिक मार्गासाठी, सोप्प्या भाषेत, उपलब्ध असलेली, ही एक खूप मोठी ग्रंथसंपदा ठरेल. असो
या लेखमालेच्या प्रवासाबद्दल आणि माझ्या एकूण अनुभवाबद्दल अजूनही लिहायचं आहे, पण उद्याच्या भागात.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment