भोग आणि ईश्वर ५८५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
मनाची महती गावी तितकी थोडी आहे. या मनाच्या सामर्थ्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. तरीही अजून बरंच काही सांगायचं राहूया गेलं आहे, असच सांगणाऱ्याला वाटतं असेल. पण मुख्य सामर्थ्य , मनातील जाणीवा जाग्या करून, आसक्ती कमी करून, देह बुद्धी मन यांचं संतुलन व एकाग्रता साधून, मिळालेल्या आयुष्यातील जास्तीतजास्त वेळ सत्कारणी लावून, ईश्वरी भेटीच्या उद्देशापर्यांत जाणं, हे आहे.
मनाच्या या अफाट शक्तीची आणि त्याद्वारे भक्तिच्या, मार्गातील श्रद्धा नामक अपूर्व ईश्वरी देणगीची जाण मनाला आली की, त्या जाणीवेतून माणसाला आपल्या खऱ्या मार्गाची, त्यावर चालायची बुद्धी जागृत होते. मनाला भगवंतांनी दिलेल्या या अफाट आणि अचाट सामर्थ्याचा प्रत्यय आला किंवा नाही आला तरीही मन आपला हे सामर्थ्य दाखवत. पण आपल्याला त्याच्या या सामर्थ्याचा प्रत्यय न आल्यामुळे, आपण त्याचा सदुपयोग करून घेण्यास सक्षम नसतो.
म्हणजे सामर्थ्य आहे, पण त्याची जाण नसल्यामुळे, आपली अवस्था, शक्ती विसरलेल्या हनुमंता सारखी असते, जो प्रचंड शक्ती, ऊर्जा यांचा प्रत्यक्ष महासागर असूनही, जांबुवंताने आठवण करून देईपर्यंत, आपल्यातील सामर्थ्याबद्दल अनभिज्ञ अज्ञानी होता. म्हणजे प्रचंड सामर्थ्याचा स्त्रोत आतमध्ये असूनही आपण शक्तिहीन, सामर्थ्यहिन ठरतो.
याचं महत्वाचं कारण आपण या मनाच्या अफाट सामर्थ्याबद्दल असेच अडाणी असतो. तरीही मन आपल कार्य चुकीच्या गोष्टीसाठी करतच असतं. उदाहरणार्थ, व्यसन, चुकीचे नाद, छंद इत्यादींसाठी मन या देहाला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकतं. त्यावेळी मन या देहाला बुद्धीला इतकं लाचार करू शकतं की, अशी लाचारी माणूस ठरवून वा जाणुनबुजून करू शकणार नाही.
मनाच्या या सामर्थ्याच्या सहाय्याने, सर्वसाधारण माणूस, संत महंत, ऋषीमुनी, अश्या सर्वश्रेष्ठ पदापर्यंत जाऊ शकतो. याचाच उपयोग सामान्य माणसाने, करावा यासाठी अनेकांनी अनेक मार्ग सांगून व त्यावर चालून दाखवून दिलं आहे. या मनाला एकग्रतेच्या मार्गावर नेऊन, त्यातील ऊर्जा व शक्ती यांना पूर्ण एकत्रित करून, त्यांना ईश्वरी चिंतनात, साधनेत, ध्यानात, धारणेत, तपश्र्चर्येने मार्गी लावून, मनाच्या शक्तींना पूर्ण उपयोगात आणता येईल.
त्यासाठी काही पूर्वतयारी, करणं गरजेचं आहे. ती पूर्वतयारी आणि त्यानंतर करायच्या गोष्टींबद्दल उद्या जाणून घेऊया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment