भोग आणि ईश्वर ५९९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करावी असा मानस आहे.
आज मालिकेचा विषय सोडून, आज माझे अनुभव कथन.
वास्तविक आतापर्यंत मी लिहिलेल्या लेखमालेत, सर्वात जास्त दिवस सलगपणे मी जानकी पुनः वनवास अर्थात उत्तर रामायण लिहिलं. जे मी पहिल्या प्रयत्नात सलग १०० दिवस आणि नंतरच्या दुसऱ्या भागात पुढचे ९५ दिवस लिहिलं होतं. पण त्यात सलगता नव्हती कारण, मधे मधे एखाद दोन दिवसाचा खंड पडला होता, हे नक्की. पण प्रयत्न या अर्थाने इतकाच होता. त्यानंतरही मी बऱ्याच लेखमाला लिहिल्या, पण त्यातील श्रीरुक्मिणी स्वयंवर, ९५ भागातील लेखमाला हीच सर्वात मोठी होती.
बाकी सर्व लेखमाला, जसं मुरली ५५ भाग, सुभद्रा हरण ३६ भाग, श्रीकृष्ण नीती ४६ भाग, इत्यादी ८ ते १० मालिका माझ्या कडून लिहिल्या गेल्या आहेत. पण सर्वात जास्त सातत्य, फार अनुभवास होतं अशातला भाग नव्हता. त्यामुळे मागच्या अनुभवांच्या आधारावर, भोग आणि ईश्वर १ डिसेंबर, २०२० ला सुरू केल्यानंतर फार फार तर १०० ते १५० भागात संपेल, असा होरा होता. त्यातही, मी स्वतः हे नक्की आधीच निश्चित केलेलं होतं, की ज्या दिवशी खंड पडेल, त्या दिवशी मालिका आटोपती घ्यायची.
म्हणजे असं म्हणता येईल की, एकप्रकारे, महाराजांना आणि त्यांच्या अतींद्रिय शक्तीला एकप्रकारे, कसोटीवर आणलं होतं. कदाचित हा माझ्यातला मी असू शकेल. ज्या मी ची परीक्षा खुद्द महाराजांनी घेतली. म्हणजे मी जर एक दिवस खंड पडला, (कोणत्याही कारणाने), तर या लेखमालेसाठी मी थांबणार. हा, माझा होरा, अंदाज, प्रण वा निश्चय यशस्वी होऊ न देता, मला अखंड लिहितं ठेवण्याची जबाबदारी घेऊन, प्रेरणा, सद्बुद्धी, ज्ञान, विषयाचा वाहता झरा, अखंड नदीच्या प्रवाहासमान, महाराजांनी इतका विपुलतेने माझ्यासमोर आणून ओतला आणि त्यातून, योग्य तेच सार, माझ्याकडून मांडलं जाईल, हेदेखील, त्यांनी स्वतःच पाहिलं.
एकप्रकारे असच म्हणता येईल की, मला माध्यम करून, त्यांनीच हे अद्भुत, अलौकिक, विस्तृत ज्ञान सर्व प्रकारच्या साधक आणि भक्त यांसाठी मांडलं. या संपूर्ण मालिकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे, यात कोणत्याही एका संप्रदायाचा महिमा, विषय विषद करण्यात आलेला नाही. यामधे मानवाच्या जन्मातील भोग, त्यांची कारणमीमांसा, त्यांची सुसूत्रता, नियम नियमावली, त्याकडे बघण्याचा वेगळाच दृष्टीकोन इत्यादी अनेक बाजू, मांडून, त्यावर जमेल तितकं विस्तृत विवेचन करण्यात आलं आहे.
म्हणजे आपण कोणत्याही गुरूंचे साधक, कोणत्याही दिक्षेचे प्राप्त कर्ता असाल, कोणत्याही मंत्राचे अर्चक असाल किंवा कोणत्याही विषयाचे अभ्यासक असाल, किंवा आपण आस्तिक वा नास्तिक जरी असाल, आपण शास्त्राचे अभ्यासक, विज्ञानाचे समर्थक या पैकी काहीही असाल तरीही, या लेखमालेतील विचार आपल्याला नक्की पटतील आणि आपण त्यावर विचार कराल. यामधे कुठेही, कसलं अवडबर, नशीब, इत्यादींवर भाष्य नाही.
यातून, सनातन धर्म, त्याची वैज्ञानिक महती, वैज्ञानिक दृष्टिकोनातून ईश्वर नामक एका अद्वितीय वैज्ञानिकांने, या ब्रम्हांड रूप जगताची निर्मिती फक्त आणि फक्त विज्ञान या आधारावरच केलेली आहे, हे जाणून, आपण त्याकडे त्याचं दृष्टीने पाहिलं पाहिजे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यातून हे देखील मांडण्याचा प्रयत्न केला की, आपली सनातन ज्ञानगंगा किती समृद्ध, समर्थ, सशक्त, सर्वसमावेशक, संशोधित, स्वयंसिद्ध, सजग आहे.
विषय ज्याप्रमाणे मोठा आहे, लेखांची मालिका ज्याप्रमाणे मोठी आहे आणि लेखांचा अनुभव ज्याप्रकारचा व्यापक आहे, त्याप्रमाणे, हे कथन वाढत जातय. म्हणून उद्याच्या भागात पुन्हा पुढे चिंतन करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment