भोग आणि ईश्वर ५८९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.
एखाद्याच्या मनातील लहरींचा परिणाम आपल्यावर किंवा आपल्या मनावर व्हायला, आपणही तसेच संवेदनशील असावं लागतं. याचीच दुसरी बाजू म्हणजे, असा एखाद्या लहरींचा परिणाम व्हायला त्या लहरिंमधे तशी शक्ती व ऊर्जा असावी लागते. त्याला आपण प्रेरक ऊर्जा वा शक्ती म्हणू शकतो. अशी शक्ती आणि ऊर्जा लहरिंमध्ये प्रकट व्हायला,मुळात त्या व्यक्तीमध्ये तसे गुण तीव्र स्वरूपात असणं गरजेचं आहे.
अश्या व्यक्तित्वाच्या व्यक्ती दिसताच आपला छाप वा प्रभाव पाडून समोरच्या व्यक्तीला प्रभावित व प्रेरित करतात. अर्थात अश्या व्यक्तींमधे सकारात्मक वा नकारात्मक विचार वा विचारांचा पाया तीव्रतेने भरलेला असतात. मनाच्या जडण घडणीत असे तीव्र स्वरूपाचे विचार निर्माण होण्याचा योग, कर्मात, संचितात असतो.
यामधे मध्यम विचारांची, वर्तणुकीची लोक दोन्ही प्रकारच्या व्यक्ती विषेषाने प्रभावित होतात वा भारली जातात. त्यांना, ज्या प्रकारच्या व्यक्तींशी संबंध येईल, त्या प्रकारच्या व्यक्ती भावतात. म्हणूनच अश्या व्यक्ती सात्विक ते तामसी अश्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींकडे आकर्षिल्या जातात. आता इतका विचार यावर केल्यावर, साहजिक मनात प्रश्न येईल की, असे वेगवेगळे व्यक्ती विशेष तयार होण्याचं कारण काय.
याचं उत्तर साहजिकच पुन्हा कर्म घडल्यानंतर त्याचं फल भोगण्याची वेळ वा काळ आला किंवा जसा हा काळ येणार असेल, त्याप्रमाणे तामसी वा सात्विक विचार मनात येऊन, जे फल प्राप्त होणार असेल त्यानुसार कर्म घडून येतं. म्हणून बरेचदा एखाद्या प्रसंगात वा क्षणी आपल्या हातून, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध सुद्धा आपण वर्तन वा कर्म करतो. खूपदा आपण नंतर विचार पण करतो की, मी असा कसा वागलो.
अश्या प्रकारचा कृत्रिम प्रभाव संमोहन विद्येच्या सहाय्याने पाडता येतो वा पाडला जातो. पण असा प्रभाव तात्पुरता असतो. अर्थातच कर्माच्या फलस्वरुपात घडणारी घटना ही देखील आपल्याच गतकाळातील कर्माची मोहिनी, आपल्या मनावर पडते. त्याद्वारे, जे घडणे अशक्य वाटते, तेदेखील घडू शकते. हा निसर्ग नियमात घडलेला संमोहन प्रकार. म्हणूनच आपल्या कर्मफल कायद्याने घडलेल्या घटना या बऱ्याच प्रमाणात आपल्या नियंत्रणाबाहेर असतात.
मग जर सर्वच कर्म ही निसर्ग नियमाने बद्ध असतात, तर माणसाच्या हातात काय आहे किंवा माणूस काय करू शकतो, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment