भोग आणि ईश्वर ५९६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.
कदाचित मनाच्या इच्छाशक्तीने, आसक्ती, कामना, वासना, इत्यादी गोष्टी पटकन यश देऊन जातात. याचं कारण म्हणजे ऊर्जा व शक्तीचा नियम. जेंव्हा एखादी वस्तू चार्ज होते, तेंव्हा ती त्यासमान गोष्टींना आकर्षित करते. मन जेंव्हा तश्या प्रकारच्या इच्छा करतं, तेंव्हा ते नकारात्मक ऊर्जेने चार्ज झालेलं असतं. त्यामुळे अर्थातच, तश्याच गुणांकडे ते आकर्षित होतं. किंवा तसेच गुण त्या मनाकडे आणि मनाच्या माध्यमातून, देह व बुद्धी यांना आकर्षित करते.
याचं अजून एक कारण म्हणजे असे हे दुर्गुण जलद प्रवाही असतात, अतीऊर्जा आणि अतिशक्ती यामुळे. म्हणूनच एकाच्या रागाने दुसऱ्याचा राग वाढतो. असे हे दुर्गुण, सहसा कोणत्याही गुणांना शरण जात नाहीत. कारण अतिऊर्जेमुळे, त्यांच्यात स्थिरतेचा अभाव असतो. याऊलट शांत शुद्ध आणि सात्विक गुण हे शीतल असल्या मुळे, कमी प्रवाही, कमी उर्जायुक्त असतात. परिणामी त्यांचं चलन वा वहन, संथ असतं. त्यांना गतिशीलता कमी असते.
म्हणून एखाद्या व्यक्तीचे स्वच्छ, शुद्ध विचार हे उशिराने समजतात, उशिरा जाणीवा जागृत करतात आणि उशिरा परिणाम करतात. म्हणूनच प्रवचन, चिंतन ध्यान, इत्यादी, अनेक वेळा ऐकावं लागतं. त्यांना विसरण्याची शक्यता जास्त असते.म्हणून त्यांची भरपूर आवर्तनं करावी लागतात. मनावर, बुद्धीवर आणि देहावर सतत बिंबवावी लागतात.
याचं अजून एक कारण म्हणजे, आत्म्याला शुद्ध सात्विक विचारांनी जागृत करावं लागतं. मुळात या देहात आल्या पासून, ते मागील सर्व विसरलेलं असतं. त्याला त्या सर्व आठवणी जागृत कराव्या लागतात. म्हणूनच मन देह बुद्धी आणि आत्मा यांना सात्विक विचार व लहरी यांनी बांधून ठेवताना, एकदा असं चिंतन, मनन, ध्यान करून चालत नाही. त्याची सतत आठवण करून द्यावी लागते. म्हणजेच सतत स्मरण करून द्यावं लागतं.
आपण कोण आहोत, कुठून आलो आणि कुठे जायचं आहे, याकडे आत्म्याला सतत वळवावं लागतं. त्यासाठी देह, बुद्धी व मन यातून त्याला बाहेर काढावं लागतं. जे फक्त योगिजन, ज्ञानी, सांख्य यासारख्याना शक्य होतं. पण सामान्य जनांचं काय. त्यांना असा आत्मा या देह बुद्धी व मन यातून वेगळा काढता येण्याची प्रक्रिया काहीही माहीत नसते. त्यांच्या अतीसांसारिक अतीप्रापंचिक वृत्तीमुळे, भावभावनांच्या गुंत्यामुळे, आत्म तत्वाला जागृत करणं शक्यच नसतं.
मग अश्या लोकांसाठी काही उपाय आहेत का. यावर उद्याच्या भागात.चिंतन करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment