Skip to main content

भोग आणि ईश्वर ६०१

भोग आणि ईश्वर  ६०१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)

काल मी जो विषय मांडला, त्यावर पुढे चिंतन सुरू करूया. मूळ मनाची प्रवृत्ती ही, कोणत्यातरी संचितातून किंवा प्रसंग वा अनुभव उपरांत तयार झालेली असते. जन्मतः एखादी प्रवृत्ती असते, ती गर्भसंस्कार किंवा पूर्वजन्म संस्कार अश्या कोणत्या तरी संस्कारातून आलेली असते. म्हणजे मनावर काही संस्कार घडलेले किंवा घडावे असं काही आधी पाहिलेलं, ऐकलेलं आणि मनावर खोल रुजलेल असेल, तरच त्यातून प्रवृत्ती तयार होऊन, माणूस काही मानसिक भूमिका घेतो. हे झालं खोल रुजलेल्या संस्कारी मनाबाबत अर्थात सखोल प्रवृत्ती बाबत. यामधे आस्तिक, नास्तिक दोन्ही आले.

याविपरित काही व्यक्ती उथळ प्रवृत्तीच्या असतात. म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, कर्म करणं, निर्णय घेणं हे प्रसंगावर, त्या प्रसंगाच्या मानसिक स्थितीवर आणि त्या स्थितीचा त्यांच्या मनात तयार झालेला आलेख व परिणाम यांचा संयुक्त परिणाम यांवर अवलंबून असतं. म्हणजे यांची मनोभूमिका ही प्रसंगोपात बदलती, दोलायमान अशी असू शकते. पण या दोन्ही प्रकारच्या लोकांतून आपल्या निर्मात्यावर विश्वास दाखवणारी श्रद्धाळू आणि अविश्वास दाखवणारी आणि नास्तिक असणारी प्रवृत्ती तयार होते.

मुळात मी एखादी गोष्ट मानत नाही, याला त्यांच्या त्यांच्या मताने, अनुभवाने असलेला आधार त्यांच्यासाठी संयुक्तिक असतो. पण समस्त विश्वाचं सूत्रसंचालन करणारी. महाशक्ती जिने संगणकीय मेंदू असलेला किंवा त्याहूनही उच्च पातळीची प्रज्ञा असलेला मानवी मेंदू, त्याला जोड देणारी आणि प्रसंगी त्या मेंदूच्या शक्तीचा योग्य वा अयोग्य वापर करून, त्याची उपयुक्तता शतोगुणीत करणारी मनाची अपार शक्ती ज्याने निर्माण केली, त्याचं अस्तित्व नाकारायची बुद्धी ही खरंतर अनाकलनीय आहे.

कारण आजही जो काही मूठभर ज्ञानी, ऋषीमुनी, संत महात्मे, यांना कणभर समजला आहे, जो कळीकाळाच्या पार आहे, ज्याला जाणणं वेद पुराण ब्रम्ह इत्यादींनासुध्दा साधलेलं नाही, ज्याचा अफाट पसारा त्याच्या अस्तित्वाची साक्ष आहे, पण जो स्वतः या पसाऱ्याहून अभिन्न दशांगुळे पुरून उरलेला आहे, अश्या परम शक्तीला मी नाकारणं म्हणजे अपूर्ण असलेल्या एका बिंदूने पूर्ण वर्तुळाच्या अस्तित्वाला नाकारण्यासारखं आहे.

ज्याच्या अतींद्रिय शक्तिपुढे आणि मायेच्या खेळापुढे माणूस हा म्हटलं तर एक अणुहून सूक्ष्म आहे आणि तरीही जो त्यातील प्रत्येक जीवासाठी, आपल्या तटस्थतेला त्यागून या विश्वात साक्षीरुप राहतो, त्याच्यामुळे मी असताना, त्यालाच नाकारणं याहून विनोदी दुसरी गोष्ट असेल, असं संभवत नाही. बरं याबाबत यांची कारण काय असतात तर, मला तसा अनुभव आला नाही, किंवा मला तसं जाणवलं नाही, अथवा माझ्या अडचणीत त्याने माझी मदत केली नाही

किंवा मला विश्वासच ठेवायचा नाही इत्यादी. मुळात जो सर्व गुण, रूप देह इत्यादी मितीहून भिन्न आहे, ज्याला या जगतात येण्याची वा येथून जाण्याची वेगळी आवश्यकता नाही आणि ज्याच्यामुळे विश्व आहे त्याला ओळखायला लागणारी दृष्टी, जाणीव आणि आत्मशक्ती ही पूर्णपणे देहाच्या पलीकडे जाऊन प्राप्त करायची आहे, हे सिद्ध असताना, निव्वळ मला वाटत नाही, म्हणून त्याला नाकारणं, ही अजाणता आणि अज्ञान यांची परिसीमा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे.

यावरील चिंतनासाठी उद्याच्या भागात पुन्हा भेटूया. हा विषय संपला की भाग क्रमांक ५९७ मधील विषय पुढे नेऊ. तोपर्यंत आपण नामातून त्याला साद घालण्याचा प्रयत्न सुरूच ठेवूया.

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...