भोग आणि ईश्वर ५८२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आता एक नक्की आहे की कर्म व फल यांची संगती आणि विसंगती आपण जाणली. आता याच विषयात पुढे जाऊ. या जन्मात आपण, अशी फल भोगतो जी या जन्मातील कर्माशी विसंगत आहेत किंवा असतात. म्हणजेच आधीच्या काही जन्मात आपण अशी काही कर्म केली असतील, जी त्या जन्मात फल देऊ शकले नसतील. त्या सुप्त कर्मानी आपलं फल, आपल्या पुढ्यात या जन्मात वाढलं.
आता याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, आपल्या सध्याच्या जन्मातील काही कर्में, नक्कीच या जन्मात सुप्त राहिली असतील. ती सर्व सुप्त कर्म, नक्कीच पुढच्या जन्मात आपलं फल देणार. मग जर या जन्मा तील नकारात्मक, अनिष्ट व पाप कर्में, जी आज सुप्त राहतील, तर त्यांचे भोग आपल्याला पुढच्या जन्मात नक्कीच फल देणार. हाच नियम या जन्मातील, चांगल्या, सकारात्मक, इष्ट कर्माना लागू पडतात.
त्यामुळे आपल्या प्रश्नाचं काही प्रमाणात उत्तर यात दडलेलं आहे. सर्वात प्रथम कर्म सुधार घडवणं. ज्यामुळे कुठेतरी अनिष्ट कर्म व त्यातून समोर येणारं, अनिष्ट फल, यांची साखळी तुटेल. दुसरं म्हणजे चांगल कर्म हातून घडेल, याची काळजी घेणं. जेणे करून, आपल्याला आपली संचीताची ठेव, वाढवत नेता येईल. हे दोन मुख्य उपाय ताबडतोप अंमलात आणून, पुढील काळाची, आत्म्याचे व देहाचे भोग आपण आज काही प्रमाणात नियंत्रित करू शकतो.
यात एक प्रश्न मनात येतो, तो म्हणजे, कशावरून, ही चांगली कर्म पुढे उपयोगी येतील. यावर असं नक्की सांगता येईल की, अशी अनेक कर्म या जन्मात आपण नक्की केली नसतील, पण त्याप्रकारचे भोग, दुःख वाट्याला आलं. उदाहरणार्थ आपण कित्येक चांगल्या चांगल्या लोकांना, भोग व दुःख भोगताना पाहतो. कदाचित आपल्यावर सुद्धा असे भोग व दुःख भोगण्याचे योग आले असतील.
वेद व वांगमय काळात, अश्याच प्रकारचे विसंगत फळांचे अनुभव आल्यावर, चिंतनातून काही तर्क लावून, या निष्कर्षाप्रत आले असतील की, आपण कर्म करतो, ज्याच्या फलस्वरुप, काही चांगल्या व काही वाईट गोष्टी घडतात. याचं चिंतनातून, हे देखील जाणवलं असेल की, काहीवेळा अनुचित फल समोर येतं. पण चिंतनात हे समजतं की, सदर व्यक्तीने तसं काही गैर वा चुकीचं कर्म, निदान या जन्मात केलेलं नाही. या दीर्घ चिंतन व अनुभवातून, कर्मफल आणि त्यासंबंधीचे काही नियम, ठोकताळे व मुद्दे स्पष्ट झाले.
त्याचा विचार आपण, उद्याच्या भागात करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment