भोग आणि ईश्वर ५९१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.
मनाला नियंत्रित करण्यासाठी अनेक युक्त्या प्रयुक्त्या अनेकांनी सांगितल्या आहेत. त्या सर्वांचा वापर प्रत्येकाने आपल्या आपल्या उद्देशांसाठी करावा. पण यातही स्वार्थ आणि परमार्थ असावा किंवा असल्यास, अनेक लाभ हे नकळत मिळत जातात. मनाची एकाग्रता ही अनेक क्षेत्रात किंबहुना प्रत्येकच क्षेत्रात, प्राथमिक गरज आहे. कारण मन जर एकाग्र होत असेल, तरच आपल्या सर्व ऊर्जा व शक्ती एकत्रितपणे उपयोगात आणता येतात.
एक नक्की ध्यानात ठेवा की, या देहात असलेल्या प्रत्येक पेशीमध्ये, ईश्वराने शक्ती व ऊर्जा भरून ठेवली आहे. त्या त्या प्रसंगात, तो तो अवयव, इंद्रिये आपला कार्य करतात. पण हे कार्य उत्तम तऱ्हेने करवून घेण्याचा अधिकार व जबाबदारी, ही मनाची आहे. कारण अपरिमित ऊर्जा व शक्ती यांचा अभूतपूर्व संगम जर कशात असेल तर तो मनात.
मनाची अजून एक ताकद वा गुण हा आहे की, ते देह बुद्धी आणि चैतन्य शक्ती असलेला आत्मा, यांच्याशी संधान आणि संबंध प्रस्थापित करून, त्यांच्या गुणांचा व दोषांचा वापर करून घेऊ शकतं. मनाला म्हणूनच अमर्याद शक्ती देण्यात आली आहे. त्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करून घेतल्यास, माणूस अनेक चमत्कार रूप गोष्टी घडवून आणू शकतो.
या सर्वात, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आत्म्याला, स्वची जाणीव होणं अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे. आत्मा हा वास्तविक, या देहाचा खरा मालक आहे. त्याला हा देह आणि मनासह देहातील प्रत्येक व्यवस्था वापरण्यासाठीच हा देह प्राप्त झाला आहे. माणसाच्या दृष्टीने, यातील सर्वात अयोग्य घडणारी गोष्ट जर काही असेल तर, ती म्हणजे, आत्मा या देहाला प्राप्त झाल्यानंतर, सर्वात प्रथम आपला मुख्य कर्तव्य विसरून, या देहाचा धर्म प्राथमिक होऊन जातो.
ते इतकं अंगवळणी पडतं आणि नंतर आपल्या जीवन कार्याचा तो भाग होऊन जातो. आपण जन्म, बाल्य, तारण्या, प्रौढावस्था, वृद्धत्व आणि मृत्यू, या चक्रालाच आपण जीवन किंवा जन्माचं सार्थक मानतो. आर्थिक, सामाजिक, व्यक्तिगत, कौटुंबिक प्रगतीला, जीवनाची. सार्थकता समजतो. किंबहुना आपण आज युगानयुगे याचं संकल्पनेत वावरतो. त्यालाच जन्म मृत्यूच्या मधल्या आयुष्याचं इप्सित, साध्य व साधना मानतो.
यावर विचार करा, म्हणजे खरं काय व वास्तविकता काय असावी, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत सद्गुरुंकडून प्राप्त नाम घेतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment