भोग आणि ईश्वर ५९२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.
आपलं जीवन हे युगानुयुगे स्थित्यंतरे होत असताना सुद्धा एका ठराविक साच्यातून जात आलंय आणि जात राहील, हे खरच असच अपेक्षित आहे का आपल्याकडून, हे विधाता जाणे. पण वेद, पुराणं, धर्मग्रंथ, संत महंत यांचे व्यक्तिगत अनुभव आणि जीवनचरित्र नीट बारकाईने अभ्यासल तर लक्षात येईल की, ज्यांनी ज्यांनी ही सांसारिक चाकोरी सोडून, आत्मतत्वाला जाणून, या देहाच्या पलीकडे पाहून, जन्म मृत्यूच्या चौकटी पलीकडे पाहिलं, त्यांना या जगण्याचा खरा अर्थ सापडला.
त्यांनी त्यातून आपलं खरं उद्दिष्ट जाणून, या देहाचा सदुपयोग करून घेतला. त्यांना ते एकाच जन्मात साधलं, याचा खोलात जाऊन विचार केला तर, लक्षात येई की, यातील बहुतेकांना खूप लहानपणीच जगण्याचं प्रयोजन लक्षात आलं होतं. त्यांच्या पारमार्थिक जाणीवा, अत्यंत लहान वयात किंवा योग्य वयात, प्रगल्भ झाल्या होत्या.
परिणामी, ज्या गोष्टी आपण सांसारिक मानव उच्च दर्जाच्या मानतो, त्या गोष्टी, त्यांनी त्याज्य मानल्या. भले भले आपल्या इच्छा, आकांक्षा, लालसा, मोह, माया, लोभ, क्रोध, काम इत्यादींवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. पण या सर्व गोष्टी त्यांनी लीलया टाळल्या. किंबहुना, अध्यात्मिक जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारी त्यांची विशाल दृष्टी, आपल्याला नक्कीच थक्क करणारी आहे.
त्यांना, जीवनातील अनेक मोह लोभ इत्यादी टाळातांना व त्यात न अडकता पुढे जाताना, त्यांना करावा लागलेला त्याग हा नाईलाजास्तव केलेला नसून, त्यामागे त्यांचा त्याग आणि वैराग्य नक्कीच अनुकरणीय आहे. सद्यस्थितीत आपल्याला ग्रासणारे मोहाचे अनेक छोटे छोटे क्षण टाळताना आपल्याला त्यांच्या अनुभवातून नक्कीच, सहाय्य मिळेल.
अनेक त्याग करत, वैराग्य करताना, त्याचा कुठेही, गर्व किंवा अहंकार त्यांना स्पर्शत नाही किंबहुना मानवी जीवनातील अनेक अवगुण, त्यांच्या ठायी, कुठेही आढळणार नाहीत. अश्या प्रकारचं प्रेरणादायी व आदर्श जीवन जगण्याची त्यांची जिद्द, कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटांनी दुःखानी, कमी झाली नाही. कदाचित जे ज्ञान, आत्मबोध त्यांना झाला असेल, त्याच्या समोर, आता येणारी संकटं ही अत्यंत शुल्लक वाटतं असतील.
कारण जो आनंद त्याग, वैराग्य अंगिकारून प्राप्त होतो, तो आनंद अनुभवानेच मिळवता येतो. म्हणूनच प्राप्त ज्ञानाने, त्यांच्या मनातील जाणीवा अत्यंत जागृत झालेल्या असल्या मुळे, सूक्ष्मातील सूक्ष्म संकेत, संवाद,त्यांना जाणवत असती. त्यातून, त्यांना, विधाता वा विश्व नियंत्रक, काय करत आहे, जगताच्या मार्गातील, कोणता टप्पा सुरू आहे, काळाच्या या परिघावर, विधात्यचा काय संदेश आहे, आपण काय करणं विधात्यास अपेक्षित आहे, काय केल्याने जगताच्या जीवना तील या काळात आपण योग्य पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकू.
या सर्व दृष्टीने संत महंत, अजून काय काय विचार करतात आणि आपल्या अल्प मतीने आपण त्यातून काय शिकू शकतो, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०७/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment