पंचमुखी हनुमान प्रकटन, अहिरावण महिरावण चित्रसेना, मकरध्वज संक्षिप्त कथा - ३
मकरध्वज हनुमंतांना नमस्कार करून, यशस्वी होण्याचा आशीर्वाद घेतो आणि हनुमंत अहिरावणाच्या महालाच्या दिशेने वायूवेगे जातो, अर्थातच भुंग्याचं रूप घेऊन. अहिरावणाच्या महालात पोचल्यावर तिथे एक रूपवान स्त्री असते. मूळ रुपात पकटून, तिला प्रणाम करून हनुमंत म्हणतात
" हे देवी आपल्याला माझा प्रणाम. आपण कोण आहात, आपला अहिरावणाशी काय संबंध आहे. मी श्रीरामभक्त हनुमान. माझ्या स्वामीना दोन्ही असुरांनी येथे पळवून आणले होते, यास्तव त्यांच्या मुक्ततेसाठी मी आलो आहे."
" आपण श्रीरामभक्त म्हणजेच श्रीविष्णूअवतारी श्रीराम यांचे भक्त आहात, हे जाणून अत्यंत हर्ष झाला. मी नागकन्या चित्रसेना. मी नागराजाची पुत्री. परंतु माझ्या सौन्दर्यावर लुब्ध होऊन अहिरावणाने मला बळजबरीने येथे आणून माझ्याशी लग्न केले आहे. परंतु ते मला मान्य नाही. मी स्वतः त्या असुरांचा तिरस्कार करते. मी स्वतः श्रीविष्णूची भक्त आहे."
" हे देवी आपल्याला भेटून मलाही हर्ष झाला. आपण मला, त्या असुरांना मारण्याच्या कार्यात सहाय्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो."
" मी त्या असुरांचे सर्व रहस्य जाणते. मी आपल्याला नक्कीच सहाय्य करीन. परंतु माझी अट तुम्हाला मान्य असेल तरच मी यासाठी तयार आहे."
" हे देवी, आपली काय अट आहे, हे समजले तर मला त्यावर विचार करता येईल."
" ऐका, माझी एकच अट आहे आणि तसं वचन तुम्हाला द्यावं लागेल. मला श्रीराम यांच्याशी विवाह करायचा आहे. असुरांच्या संहारापश्चात तो तुम्ही करून देणार असं वचन देत असाल तरच मी सर्व रहस्य तुम्हाला सांगीन."
हनुमंत विचारात पडतात. परंतु समय थोडाच शिल्लक असल्यामुळे आणि स्वामींचे प्राण महत्वाचे असल्याकारणाने ते म्हणतात.
" हे देवी माझीही एक अट आहे, ज्या पलंगावर माझे स्वामी विराजमान होतील, तो पलंग पूर्ण रात्र जर अभंग राहिला तर मी प्रातः आपला विवाह नक्कीच स्वामींशी लावून देईन. हे माझं वचन असेल. परंतु जर तो पलंग रात्रीत भंग पावला तर मी माझ्या वचनांना बांधील नाही."
चित्रसेना विचार करते, की जिथे अहिरावणाच्या वजनाने हा पलंग कधी भंगला नाही, तिथे श्रीरामांच्या मानवदेहातील वजनाने काय होणार.या विचाराने ती हनुमंताची अट मान्य करून पुढील कथन करते.
" हे वीर हनुमान, अहिरावणाच्या मृत्यूपूर्वी आणि त्यांच्या मृत्यू करता, त्यांची आधीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते ती लक्षपूर्वक ऐका. हे दोन्ही असुर लहान असताना त्यांचे पृथ्वीवरील काही असुर साथी यांच्याशी खेळायला येत. त्यातील एक अत्यंत दुष्ट होता. तो एका भ्रमरीला पकडून तिला त्रास देत असे आणि असे करण्यात त्याला असुरी आनंद मिळत असे.
परंतु त्या भ्रमरीचा पती, भ्रमर हे पाहून अत्यंत दुःखी होत असे. एक दिवस अहिरावणाने त्या भ्रमरीची मुक्तता केली. त्याक्षणी तो भ्रमर अत्यंत आनंदित होऊन अहिरावणाला म्हणाला
"आपल्या या उपकाराची परतफेड मी आयुष्यभर करत राहीन."
म्हणूनच जेंव्हा जेंव्हा असुर मृत्यू पावतात तो भ्रमर आणि त्याचे इतर साथीदार अमृतकुंभातून अमृत आणून त्या असुरांना जीवित करतात. त्याकारणे ते पाचपट शक्ती मिळवून, पुनः युद्धास सज्ज होतात. त्यामुळे तुम्हाला आधी त्या भ्रमरांचा बिमोड करावा लागेल. या सर्व गोष्टीत मला दिलेलं वचन मात्र ध्यानात ठेवा. देवी कामाक्षी आपल्याला यश देईल."
चित्रसेनेला सादर प्रणाम करून हनुमंत लवकर परत येण्याचं वचन देऊन प्रस्थान करतात. सर्वात प्रथम मंदिरात जाऊन, पाचही दिवे घालवण्यासाठी उपाय योजतात. एक क्षण ध्यान लावून श्रीरामांच्या नामाचा जयघोष करून,
हनुमंत आपली पाच रूप प्रकट करतात. उत्तर दिशेला वराह मुख, दक्षिण दिशेला नरसिंह मुख, पश्चिम दिशेला गरुड मुख, वरच्या दिशेला हयग्रीव मुख आणि पूर्व दिशेला हनुमान मुख प्रकट होऊन एकाच वेळी पाचही दीप विझवून हनुमंत पुनः मूळ श्रीवीरहनुमान रुपात प्रकट होऊन, मंदिराबाहेर येऊन भुंग्याचा शोध सुरू करतात.
क्रमशः
भाग ३ समाप्त
संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
०९/०५/२०२०
Comments
Post a Comment