श्रीकृष्ण नीति ५
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
कृष्ण जन्माची बीजं रामजन्मात आहेत याचे काही दाखले देतो
१. राम जन्मात लंकेत प्रभुरामानी आपली भक्त असलेल्या चित्रसेना नांमक एका नागकन्येला (अहिरावण आणि महिरावण वधानन्तर) वचन दिल होतं की एक रात्र मी तुझ्या महाली येईन, परंतु ज्या मंचकावर मी बसेन तो एक रात्र राहिला तर मी तुला वरेन ही कथा रामानंद सागर यांच्या रामायणात देखील आहे. मग हनुमंत भुंग्याकरवी तो मंचक पोखरुन घेतो, ज्याद्वारे प्रभु आपल्या वचनातून मुक्त होतात. पण त्या स्त्रीला , भक्तवत्सल असल्यामुळे वचन देतात की मी तुला पत्नीरुप स्वीकारण्याचं वचन दिलं होतं, त्यामुळे पुढील जन्मी द्वापारयुगामध्ये कृष्णावतारात मी तुझ्याशी विवाह करून तुला माझी राणी करीन. ही कथा वाचल्याचं स्मरतय. हीच स्त्री पुढील जन्मीची सत्यभामा. हा अजून एक श्रीराम व श्रीकृष्ण अवताराचा संदर्भ.
२. मागे प्रथम भागात उल्लेख केल्याप्रमाणे वाली वधानंतर वाली प्रभुना विचारतो की काय कारणाने आपण मला मारलेत. त्यावेळी प्रभु त्याला त्याच्या पापांची आठवण करून देतात आणि सुग्रीव मला शरण आला असल्यामुळे त्याच्या हिताचं रक्षण करण हे माझ कर्तव्य होतं. पण तरीही तुझं माझं प्रत्यक्ष वैर नसल्यामुळे, मी वचन देतो की या कर्माचा दोष म्हणून पुढील जन्मी द्वापारयुगात कृष्ण अवतारात असताना त्या अवताराची समाप्ती तुझ्या हातून होईल.
३. हनुमंताचं महाभारत युद्धातील अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर असेलेलं स्थान रामायण आणि महाभारत यांचा संबंध दर्शवतो.
कृष्णजन्मात पुढे जाताना दिसामासानी वाढत असलेला बालकृष्ण आपल्या सुंदर विलोभनीय रूपाने संपूर्ण गोकुळ वासीयांचा अत्यंत प्रिय झाला होता. त्याच्या नुसत्या दर्शन इच्छेने गोकुळवासीय नंद राजाच्या घरी येणं जाणं वाढवतात. यशोदा मातेला तर याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं आहे.
इकडे मथुरेत कंसाला जाताना योगमायेने सूचित केलेलं असत की तुझा काळ जन्माला आलाय आणि तो गोकुळात वाढतोय, तुझा वध करेल. या भविष्यवाणीने क्रोधायमान आणि तोल गेलेल्या कंसाकडून प्रजेवरील अत्याचार अजुन वाढतो. परिणामस्वरूप राज्यातील सर्व नवजात जीव शोधून त्याना मारण्याकामी काही राक्षस गणाची नियुक्ति करण्यात आलेली असते.
असेच तीन राक्षस पूतना , शकटासुर आणि तृणासुर बाल रूपातील श्रीकृष्णाला ठार करण्यासाठी गोकुळात येतात . कृष्ण या तिन्ही राक्षसांचा नायनाट करतो . हा कथाभाग सर्व जाणतात , पण प्रश्न हा उरतो की इतक्या लहान बालकाला हे कस जमलं. जर कपोलकल्पित मानलं तर मग असं असेल का की दुसऱ्याने मारून या बालकाचे महत्व वाढवण्यासाठी नाव बालकाचं घेतलं असेल. मग लगेच दूसरा प्रश्न की इतका शुर जर अस्तित्वात होता तर, त्यानेच स्वतः का कंसाला मारलं नाही. एक शक्यता अशी पण वाटते की, बाल कृष्ण पतन होऊन म्हणजेच घसरून शकट म्हणजे बैलगाड़ी खाली जाऊन तेथील तृणावर स्थिरावला, या साध्या वाक्याचा नन्तर लिहिता लिहिता पराचा कावळा होतो तसा असुर मारलाय असा प्रचार रूढ़ जहाला. भारतीय मानसिकता बघता ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तरीही प्रश्न येतो मग अश्या सामान्य बालकाची विशालकाय मंदिरं आसेतू हिमाचल कशी काय .
अश्या अद्भुत लीलानी युक्त बालपण जगण्याची गरज भगवंताला पडली, कारण पापाच्या राशी जेंव्हा जेंव्हा वाढतात, तेंव्हा तेंव्हा भगवंत या सृष्टीत अवतार घेतात. कारण child prodegy जरी मानली तरी इतकं लहान बालक कोणाचा वध करेल हे असंभव वाटते . श्रीरामानी सर्व विद्या इथेच आत्मसात केल्या आणि पूर्ण शिक्षण झाल्यावर त्यानी त्याचा वापर केला. या विरुद्ध श्रीकृष्ण अवतारात भगवंतानी अगदी बाल रुपात आपली शक्ति आणि युक्ति दोन्हींचा परिचय दिला..
एक प्रश्न तरीही डोक्यात कायम राहतो की देव हे खरच कोण्या परग्रहावरचे पुढारलेल्या सृष्टीतून आलेले नव्हते ना.
म्हणजे हे खरच महामानव नाहीत ना. पण त्यांच्यां शक्तिचा प्रताप बघितला, विशेष करून कृष्ण अवतारात तर हे महामानवी कृत्य वाटत नाही दैवी वाटतं.
करा विचार करा जरा
बघुया पुढे दिसामासानी वाढणाऱ्या बालकृष्णाच्या अद्भुत लीलांच विश्लेषण
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
© प्रसन्न आठवले
भाग पंचम समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
.
Comments
Post a Comment