#श्रीकृष्णनीती #भाग२५
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
आतापर्यंत आपण महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा, विशेषतः नकारात्मक, विस्ताराने पाहिल्या. त्या व्यक्तींचा आलेख , मानसिकता, काहींची अपरिहार्यता, काहींची दंभ, द्वेष याने भरलेली मानसिकता, काहींची उद्दाम वृत्ती आणि सत्तालोलुपता, महत्त्वाकांक्षा या सर्वांचा आपण अभ्यास केला.
आता हे चित्र सार्वत्रिक स्तरावर कसं होतं आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम काय आणि कसा कसा होत गेला, त्याप्रमाणे हे युद्ध व्हायला कोणाची मानसिकता विशेषत्वाने कारणीभूत झाली याचा विचार करू. मुळात त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी दोन स्तरात विभागता येईल. एक म्हणजे धृतराष्ट्राच्या आधीचा काळ आणि धृतराष्ट्राचा काळ.
धृतराष्ट्राच्या आधीचा काळ मुख्यता जरासंध , कंस,नरकासुर या असुर शक्तींनी व्यापलेला काळ होता. त्यातील बऱ्याचश्या शक्ती श्रीकृष्णाने नष्ट केल्या वा करवून घेतल्या. त्याच काळातील भीष्मांच्या सारख्या महारथींनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय व अत्याचार कधी केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळ्या आदराने पाहिलं जातं होतं. त्यातही कुरु वंशाचा एक खंदा आधारस्तंभ म्हणून भीष्म ख्यात होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वलय प्रचंड मोठं होतं.
परंतु त्यांनी स्वतः कधीही कंस, जरासंध यांसारख्या समकालीन असामान्य शत्रूंशी मुद्दाम शत्रुत्व वा युद्ध पत्करलं नाही. कदाचित नितीमत्तेची विशेष चाड असलेले भीष्म आपलं यात पडणं, हे त्या राज्याच्या सर्वभौमत्वावर हल्ला आहे, असं मानत असल्याकारणाने त्यात कधी पडले नाहीत. म्हणजेच आपल्या परिघात जेवढा येईल तेवढाच आपला हिस्सा वा कार्यभाग आहे, हीच मानसिकता असलेले वीर भीष्म होते. वास्तविक इच्छामरणी आणि पराक्रमी असल्यामुळे ते मनात आणते तर नक्कीच त्यावेळच्या दुष्ट शक्तींचा नायनाट ते करू शकले असते. परंतु ते मुळात प्रतिज्ञाबद्ध असल्यामुळे आणि त्यांचं कार्यक्षेत्र सिंहासनाचे आदेश पाळणं हे असल्यामुळे ते राज्याच्या कक्षेबाहेर आणि हिताबाहेर फार कधी गेले नाहीत.
धृतराष्ट्राच्या उदयानंतर म्हणजेच त्यांच्या मनातील खदखद बाहेर आल्यानंतर परिस्थिती बदलत गेली, विशेषतः पांडु राज्याबाहेर निघून गेला आणि राज्यकारभार प्रतिनिधी रुपात राजा म्हणून धृतराष्ट्राकडे आल्यानंतर. मुळात तत्वाचा अर्क प्यायलेले विदुर या बाबतीत एक मर्यादा घालून द्यायला विसरले किंवा त्यांना ही गोष्ट जाणवली नाही वा कुणी ध्यानात आणून दिली नाही की, धृतराष्ट्र हा प्रतिनिधी स्वरूपात होता आणि प्रतिनिधींचे अधिकार नेहमीच मर्यादित असतात. तो प्रतिनिधित्व करू शकतो. पण अधिकार निर्माण करू शकत नाही. किंबहुना असलेले अधिकार एका विशिष्ट मर्यादेत राहूनच वापरणं हेच त्याचं कार्य असतं.
म्हणून ज्यावेळी धृतराष्ट्र या मर्यादेपलीकडे जात आहे वा स्वनियंत्रीत होत होता, त्यावेळी त्याला त्याच्या अधिकारांची मर्यादा सांगून अश्या अमर्यादित अधिकार व त्यातील आदेश पाळण्याचं बंधन आम्हाला नाही , हे ठणकावून सांगणं गरजेचं होतं. हेच जर वेळेत घडलं असतं तर कदाचित धृतराष्ट्र, त्याची महत्वाकांक्षा यांचा जन्मच झाला नसता आणि त्याचं मूर्त स्वरूप दुर्योधनाच्या रुपात जगापुढे आलंच नसतं. दुर्योधन हा धृतराष्ट्राच्या इच्छा, आकांक्षा, विचार, राज्यलोभ, वृत्ती यांची सजीव सावली होता. ज्याला धृतराष्ट्राने खतपाणी देऊन वाढवला.
या इच्छेचा वटवृक्ष आकार घेत असतानाच अनेक कारणांनी अनेक शक्ती वा राज्य जी श्रीकृष्ण वा पांडव यांचा दुस्वास करत होती, ती नकळत दुर्योधनाच्या कृत्यांनी आनंदित होत होती आणि एका चुंबकीय आकर्षणाप्रमाणे पांडव पर्यायाने श्रीकृष्ण यांच्या विरुद्ध दुर्योधनाच्या बाजूने होत होती. अर्थातच यात प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असल्याकारणाने
अनायासे एका बंधात निती, न्याय, धर्म यांविरुद्ध बांधले जाऊ लागले. कदाचित यात जयद्रथ, जरासंधापश्चात मगध, शिशुपालाच्या पश्चात चेदिराज यांसारखे अनेक राजे ज्यांना श्रीकृष्णाला परास्त करायचं होतं आणि अनीती अन्याय हाच ज्यांचा धर्म होता, असे राजे दुर्योधनाच्या कृत्यांनी सुखावत गेले. कारण त्यावेळी संपूर्ण जगाला एक ज्ञात होतं की, पांडवांना त्रास वा पांडवांचा छळ हा पर्यायाने श्रीकृष्णाला त्रास वा श्रीकृष्णाचा छळ.
उद्या पुढे ..........
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग पंचवीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment