Skip to main content

#श्रीकृष्णनीती #भाग२३

#श्रीकृष्णनीती #भाग२३

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

मुळातच धृतराष्ट्राचा जन्म हा अंबिकेच्या पोटी अंध म्हणून नियोग पद्धतीने झाला. (जसा बाकीच्या दोन्ही बंधूंचा म्हणजे पांडू आणि विदुर यांचाही याच पद्धतीने झाला). जन्मतः अंधत्व असल्याकारणाने, जी गोष्ट इतर डोळस व्यक्ती विशेषतः पांडू करत असे वा करू शकत असे त्या करण्यात धृतराष्ट्राला काही बंधनं  नक्कीच होती. महर्षी व्यासांच्या कृपेने अचाट शक्ती (दश सहस्त्र हत्तीची शक्ती) धृतराष्ट्राच्या अंगात होती. तो  पोलादाचं एका क्षणात चूर्ण करू शकत होता, ज्याचा प्रत्यय युद्धानंतर त्याने (कृष्णाच्या चातुर्याने) भीमाऐवजी भीमाच्या आकाराचा आणि वजनाचा पूर्ण पोलादाचा पुतळा क्षणात चूर्ण करून, दिला. मुळात  असलेल्या अंधत्वाने, शरीराने पूर्ण सशक्त असलेल्या धृतराष्ट्राला राज्य पदावरून त्यावेळच्या प्रचलित नियमांनुसार बेदखल केलं. 

या गोष्टीचा अत्यंत नकारात्मक परिणाम त्याच्या मानसिकतेवर झाला. प्रारब्धाचा इतका मोठा फटका त्याच्या महत्वाकांक्षेला जबर धक्का देऊन गेला. कारण अंधत्व सोडलं तर बाकी कोणत्याही बाबतीत तो पांडूपेक्षा श्रेष्ठ होता आणि वयाने ज्येष्ठ. निव्वळ अंधत्वाच्या एका अवगुणांमुळे राजा होण्याची मोठी संधी त्याच्या हातून नियतीने काढून घेण्यात आली. अर्थातच आयुष्यभर हि जखम धृतराष्ट्राने रागात, पण प्राणपणाने जपली. हळू हळू याच जखमेला पालवी फुटली आणि त्याचा वटवृक्ष धृतराष्ट्राच्या मनात तयार झाला. किंदम ऋषींनी पांडूला दिलेल्या  शापामुळे पांडू वनात प्रस्थान करून राज्यापासून दूर गेले. त्यावेळी धृतराष्ट्राला निव्वळ पांडूचा प्रतिनिधी म्हणून राज्यपद बहाल करण्यात आले, 

अर्थातच पांडूची संतती राज्यावर बसण्यायोग्य झाली कि,  ते हा राज्यकारभार पुढे पाहतील वा प्रचलित प्रथेनुसार ज्याचा पुढील वंशज ज्येष्ठ असेल तो हे राज्य पुढे सांभाळेल.  परंतु  यात एक मेख अशी होती, जी कोणाच्याही लक्षात आली नाही वा भीष्मांसकट कोणीही इतक्या दूरवर विचार केला नाही, कि, पांडूचा  मुलगा जर ज्येष्ठ असेल आणि तो  राज्य करण्यास आला परंतु त्यावेळी धृतराष्ट्र राज्य देण्यास राजी नाही झाला वा धृतराष्ट्राची संतती त्यास राजी नाही झाली तर काय उपाय. या गोष्टीचा विचार, संतती संस्कारमय असेल असे गृहीत धरून वा धृतराष्ट्र त्यावेळी जी परिस्थिती असेल ती स्वीकृत करतील असे गृहीत धरून, करण्यात आलाच नाही. 


याच गोष्टीचा फायदा धृतराष्ट्रास मिळाला आणि त्याच्या मनातील सुप्त इच्छा व महत्वाकांक्षा दुर्योधन या सुदृढ आणि सशक्त मुलाच्या रूपात मूळ धरू लागली. दुर्योधन जन्मतः एका राजाचा पुत्र असल्याकारणाने आणि राज्यातील सेवकवर्ग यांसह सर्वांकडून त्याला तश्याच प्रकारची वागणूक मिळत गेल्यामुळे, मूळ खल प्रवृत्तीच्या दुर्योधनाच्या मनात पांडवांबद्दल घृणा वा द्वेष उत्पन्न होत गेला. ज्याला पुरेसं खतपाणी मामा शकुनी याने घातलं आणि धृतराष्ट्राने जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. कारण दुर्योधनाच्या मनात राज्य हाती ठेवण्याची बीज उत्पन्न होणं हे धृतराष्ट्राच्या पथ्यावर पडत गेलं वा धृतराष्ट्राने ते आपल्या फायद्याचं मानलं. शकुनीचं कौरवांना विशेषतः दुर्योधनाला फूस लावून भडकवणं, द्वेषाचा आणि मत्सराचा कानमंत्र देणं, कारस्थानं करणं, पांडवांच्या अगदी मृत्यूपर्यंत सर्व योजना करणं याकडे पूर्व वा पश्चात माहिती होऊनही जाणूनबुजून दुर्लक्ष करणं, दुर्योधनासमोर लाचार असण्याचं ढोंग करणं हे व यानिमित्ताने दुर्योधन, शकुनी यांच्या योजनांना अप्रत्यक्ष प्रोत्सहन देणं हे सर्व एका षडयंत्राचा भाग वाटतो. अन्यथा इतक्या मोठ्या राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला हि कारस्थानं माहित पडत नसतील व ती महाराज धृतराष्ट्रांच्या कानावर जात नसतील हे अशक्य. 

परंतु धृतराष्ट्राच्या, राज्य आपल्या हाती ठेवून पांडवांना न देण्याच्या, कुटील हेतुमध्ये हि कुटील कारस्थानं आणि या योजना नक्कीच सहाय्यक होत असतील वा होतील हे धृतराष्ट्र जाणून होता. तेवढी दूरदृष्टी नक्कीच धृतराष्ट्राला होती. किंबहुना दुर्योधनाच्या मनात राजा होण्याची सुप्त इच्छा निर्माण व्हावी याचेच प्रयत्न, पाठिंबा वा दुर्लक्ष करून, धृतराष्ट्राने कायम केले. अन्यथा लाक्षागृह प्रसंगानंतर पांडव पुन्हा आल्यावर आणि तोपर्यंत,  युधिष्ठिराच्या जागी, दुर्योधनाला युवराज घोषित करून झालेलं असल्यामुळे, तो निर्णय बदलण्याऐवजी पांडवांना राज्य देण्यातील असमर्थता दुर्योधनाच्या नावावर सांगून भीष्मांना राज्य विभाजित करण्याचा निर्णय घ्यायला लावलं नसतं. इंद्रप्रस्थाचं सुस्थापित राज्य द्यूत क्रीडेच्या माध्यमातून बळकावण्याच्या दुर्योधन, कर्ण व शकुनीच्या कारस्थानाला बळ देऊन गोष्टी हाताबाहेर जात आहेत हे लक्षात येऊन वा भीष्मांनी त्या लक्षात आणून देऊनही, थांबवण्याची असमर्थता धृतराष्ट्राने योजनाबद्ध पद्धतीने वठवली नसती. 

कारण भीष्मांची अपरिहार्यता, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांची असहाय्यता आणि अनुज पांडवांचं ज्येष्ठ बंधू प्रति प्रेम आणि प्रतिबद्धता या सर्व गोष्टींचा पुरेपूर वापर करत दुर्योधनाला न अडवण्याची हतबलता धृतराष्ट्राने प्रदर्शित केलीच नसती. भीष्मांसह सर्व ज्येष्ठ आपल्या आदेशाशिवाय काहीही करणार नाहीत व त्यांचं काहीही करू न शकणं एक प्रकारे मूक पाठिंबाच गृहीत धरून पांडव पुढे याचा प्रतिशोध घेणार नाहीत, हे जाणूनच दुर्योधनाची मस्ती आणि द्रौपदीची विटंबना होत असताना हतबल आहोत असे धृतराष्ट्राने दाखवून दिले नसते. त्यातील दूरदृष्टी अशी होती, कि, उद्या पांडव पुनः राज्य मागायला आलेच तर हीच हतबल अवस्था पुढे करून आणि दुर्योधनाची गैरमर्जी होऊ नये वा त्याच्या नाराजीने मी काहीही करणार नाही याचे पूर्ण प्रदर्शन द्यूत क्रीडेतील प्रसंगात धृतराष्ट्राने पद्धतशीरपणे केले असा माझं अनुमान आहे. कारण एक अंधत्व सोडलं तर एक हुशार आणि महत्वाकांक्षी राजकारणी असेलला धृतराष्ट्र इतका हतबल होऊ शकेल हे अशक्य वाटते. 

या ठिकाणी गांधारीने मध्यस्थी करून द्रौपदीला शाप देण्यापासून रोखले नसते आणि पांडवांना हरलेले सर्व परत  करवून घेतले नसते तर सर्व डाव  इथेच सफल होत होता. कदाचित या कट कारस्थानात पडद्यामागे सूत्रधार धृतराष्ट्र असूही शकेल. कारण काही गोष्टी इतिहासात कधीच पूर्ण विस्ताराने लिहिल्या जात नाहीत. याची साक्ष अजून एका घटनेत आहे, ज्यावेळी कृष्ण शिष्टाई करायला आला त्यावेळी, पांडवांनी युद्ध नको या कारणास्तव सांगितलेला पाच गावांचा प्रस्ताव धृतराष्ट्राने मान्य करायला लावला असता वा भीष्मांना मध्ये घेऊन दुर्योधनावर तसा दबाव आणवला असता. पण धृतराष्ट्र जाणून होता कि, पांडवांना पाच गाव जमीन जरी दिली तरी त्यांची क्षमता त्यातून पूर्ण राज्य जिंकून घेण्याची आहे. त्यामुळे पुढे मागे त्यारूपात दुर्योधनाला आपण शत्रू निर्माण करू. म्हणून त्यावेळी धृतराष्ट्र जाणूनबुजून गप्प राहिला व कृष्णाचे सर्व प्रस्ताव दुर्योधनामार्फत सरळ धुडकावून लावले. कारण विराट युद्धातील कौरव सेनेच्या पराभवांनंतर धृतराष्ट्र जाणून होता कि, फक्त पाच पांडवदेखील पूर्ण कौरव सेनेला भारी आहेत. त्यामुळे जरी पाच गाव पांडवांना मिळाली तरी उरलेलं राज्य टिकवण्याची दुर्योधनाची क्षमता पांडवांपुढे  कितपत टिकेल याबद्दल खुद्द धृतराष्ट्र साशंक होते. 

उद्या पुढे ....... 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले

भाग तेवीसावा  समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...