गीत विश्लेषण !!! "तू प्यार का सागर है"
चित्रपट : सीमा (1955)
संगीतकार : शंकर-जयकिशन
गीतकार : शैलेन्द्र
गायक : मन्ना डे
पटकथा आणि दिग्दर्शन : अमिया चक्रवर्ती
तू प्यार का सागर है
तेरी इक बूँद के प्यासे हम
लौटा जो दिया तुमने
चले जायेंगे जहां से हम
तू प्यार का सागर...
घायल मन का पागल पंछी उड़ने को बेक़रार
पंख हैं कोमल, आँख है धुँधली, जाना है सागर पार
अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहाँ से हम
तू प्यार का सागर...
इधर झूम के गाये ज़िंदगी, उधर है मौत खड़ी
कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी
कानों में ज़रा कह दे, कि आएँ कौन दिशा से हम
तू प्यार का सागर...
एखादं गाणं का आवडतं, याचं कारण प्रत्येक वेळी सांगता येईल असं नाही. पण ते गाणं, मनात कुठेतरी घर करून राहतं. कुठेतरी त्याच्या अर्थाचा वेध मी घेत असतो. हे गाणं तसच डोक्यात होतं खूप काळापासून. पण त्याचं सूत्र सापडत नव्हतं.
आज अचानक सकाळी ते पुन्हा पाहताना सर्व चित्र स्पष्ट झालं आणि एक अत्युच्च आनंद मिळाला. मुळात एका अन्याय झालेल्या मुलीची सीमाची ही कथा आहे. खोट्या आरोपात अडकवून पोलिसांनी तिचाच काका काशीनाथ याला तिची बारा महिने पोलिसांच्या अखत्यारीत कोर्टाकडून देखभालीसाठी एक प्रकारे सौम्य शिक्षा दिलेली मुलगी.
ज्याने तिच्यावर चोरीचा आरोप केला त्याला पुन्हा जाऊन मारल्यानंतर पोलीस तिला घेऊन बलराज सहानी चालवत असलेल्या एका पतितांच्या आश्रमात आणून ठेवतात. उद्देश हा की तिच्यात सुधारणा व्हावी. बाहेरच्या जगातील आणि सख्या काका काकूंच्या अन्याय आणि अत्याचार यांनी पोळून निघालेल्या सीमाचं मन व्यथित वैफल्यग्रस्त झालंय. संपूर्ण जगावर तिचा राग आहे या घडीला.
कदाचित ही प्रातिनिधिक स्वरूपातील थीम असावी असं माझं मत आहे. बरेचवेळा आपलं पण असच होतं मनात राग असतो कोणत्याही प्रकारचा सल्ला अथवा निरूपण ऐकण्याची मनाची तयारी नसते. ही वैफल्यग्रस्तता, कोणत्याही कारणाने असेल, घरातील वा कार्यालयीन वा एकूणच व्यक्तिगत आयुष्यातील दुःख, अन्याय, अवहेलना यांनी मन विटलेलं असतं. हीच मनःस्थिती बरोबर पकडून चित्रित केलेलं गीत म्हणजे तू प्यार का सागर है.
एखादया मनःस्थितीला समर्पक शब्द म्हटलं तर निरूपण म्हटलं तर मनाला समजवण्याचा प्रयत्न, म्हटलं तर क्रोधाने तप्त मनावर पहिल्या पावसाचा शिडकावा. अश्या वेळी सुरवातीला मन ऐकण्यासाठी तयार नसतं. आपल्याच क्रोधात धुमसत असतं. मनाची दारं बंद करून आत आपल्याच भावकोशात स्वतःला बांधून घेतं. काहीही ऐकण्यास तयार नसतं.
याच मनाला आत्म्याच्या अनामिक सहजभाव शब्दांनी शीतलता मिळते. सुरवातीला , जसा तापलेला तवा थंड पाणीसुद्धा वाफ करून उडवून लावतो, तसच, मन सुद्धा त्या आवाजाला उडवून लावतं. परंतु त्या सध्या शब्दातील शांत आवाजातील संदेश हळू हळू मन स्वीकारत जातं, मनाची दारं कुठेतरी किलकिली होतात. आधीचे पूर्ण नकारात्मक विचार सकारात्मकतेकडे वळायला सुरवात होते. आपल्यालाच जाणवतं की, हा त्रागा करून काही अर्थ नाही. ह्याने मिळणार काही नाही, पण वेळ गेली की कळेल हा क्रोध करून ,मनाला असं जगापासून तोडून आणि हा अट्टाहास करून, हातात काही उरणार नाही.
फक्त हातातील बहुमूल्य वेळ, जो यत्किंचित जीवनातील महत्वाचा काळ हिरावून नेईल आणि सरतेशेवटी वर जाताना हातात शून्य असेल. कारण या वैफल्याच्या क्षणांसारखच जीवनसुद्धा क्षणभंगुर आहे. जितकं दुःख, अन्याय, वैफल्य उराशी कवटाळून बसू तितकं आपलंच नुकसान आहे. या प्रक्रियेत सर्व जीवन व्यर्थ गेल्याचाच भाव मनाला जाणवतो. शेवटी शून्यातून शून्यात हाच जर प्रवास असेल तर मग इतकं मनाला जाळण्यात काहीच अर्थ नाही. हे कळतं, जाणवतं आणि विवेक जागा होतो. ज्या क्षणी आणि ठिकाणी विवेक जागृत होतो ,तीच सकाळ आणि तीच पूर्व दिशा समजावी.
या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन अद्वितीय कवी आणि या गीताचे गीतकार शैलेंद्र यांनी साध्या सोप्प्या शब्दात जीवनाचा , अध्यात्माचा आणि अद्वैताचा भावार्थ सहजी विशद करून सांगितलाय. समर्थ शब्दरचना ही या गीताची सर्वात जमेची बाजू. अश्या गीताला त्यातील भावार्थ परिणामकारकरित्या ऐकणाऱ्यापर्यंत पोचवायला साधी, सरळ, कोणताही आलाप रागदारी वा फार वाद्य नसलेली चाल उत्तम होईल, हे समजणारे अत्युत्तम संगीतकार शंकर जयकिशन यांनी इतकी समर्पक चाल बांधली की याहून दुसरी असू शकत नाही हे पटतं.
गायक मन्नाडे यांनी गीत आणि संगीत यांना सर्वोत्तम न्याय देऊन ते विवेचन आपल्या आवाजात इतकं परिणामकारक पणे पोचवलं आहे की लाजवाब. गाण्याच्या चित्रीकरणात दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांची कमाल अपूर्व आहे. आत्मरुप समाजावणी करणारा बलराज सहानी बाजूला एका छोट्या मुलीला घेऊन गाणं सुरू करतो. अर्थातच ती छोटीशी मुलगी आत्म्याच्या निरागसतेचं प्रतीक. कारण अश्या क्रोधीत मनाला निरागसताच समजावून मनातील विवेक जागृत करू शकते.
वैफल्यग्रस्त मनाचं प्रतिकात्मक रूप म्हणजे सीमा अर्थात नूतन. इतका परिणामकारक अप्रतिम अभिनय मनाच्या त्या भावावस्थेचं तिने केलेलं उत्कृष्ट सादरीकरण अद्वितीय आहे. आपण लगेच आपल्या अश्या अवस्थेतील स्थितीशी या भावांना जोडतो आणि गाण्यात गुंतून जातो. गीताचा अर्थ उलगडत जातो. शब्दांच्या पलीकडे जे गीतकाराने मांडलंय ते तितक्याच ताकदीने दिग्दर्शक आणि दोन्ही कलाकार, बलराज सहानी आणि नूतन आपल्या लाजवाब अभिनयाने सादर करतात.
ती जितकी क्रोधात बुडालेली, वैफल्याने ग्रासलेली, अकारण अन्याय झालेली, तितकाच तो शांत शीतल आत्मप्रकाशी. यात दोघांनी आपला अभिनय डोळ्यात आणि हालचालीत सुंदररित्या दाखवून दिलाय. "अब तुंही इसे समझाय" म्हणताना बलराज सहानी यांनी फक्त हातानी देवाला वा विधात्याला केलेली आर्त विनवणी अलौकिक परिणाम साधते. त्याचप्रमाणे " उधर है मौत खडी" ला फक्त डोळ्यांनी मृत्यूनंतरचा पैलतीर ज्याप्रकारे दाखवलाय त्याला तोड नाही.
इतकं समर्पक गीत बघताना अजून एक दिग्दर्शकीय कमाल म्हणजे बलराज सहानी यांच्या बाजूला खांबावर शुभा खोटे यांची पियानो वाजवतानाची बोटं दिसतात. खरच कमाल आहे.
या सर्व माहितीच्या आधारावर आता हे गाणं पाहताना तुम्हाला नक्कीच मी म्हटलेला परिणाम जाणवेल आणि एखाद्या सुंदर गाण्यात जमून आलेल्या गोष्टी समजत जातील.
धन्यवाद !!!
©® संकल्पना संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
३०/०५/२०२०
०८:५३
Comments
Post a Comment