#श्रीकृष्णनीती #भाग१५
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
काल आपण कर्णाची एक बाजू पाहिली. वास्तविक ती बाजू मांडून कर्णाचं कोणत्याही प्रकारे समर्थन करण्याचा उद्देश नव्हता. उद्देश फक्त कर्णाची गुणवत्ता प्रस्थापित करणं . त्या पार्श्वभूमीवर आज खरी परिस्थिती काय होती हे पाहूया.
मुळात कर्ण दुखावला गेला तो त्याच्या जन्माचं रहस्य त्याला माहित नव्हतं म्हणून. पण त्याला हे समजत होतं कि, ज्या मातापित्यांनी आपल्याला सांभाळलं, आपण त्यांचं अपत्य नक्की नाही. याच द्वैताच्या शोधात त्याने पूर्ण आयुष्य घालवलं. प्रस्थापित समाजव्यवस्थेत पांडव आणि कौरव दोघांनाही जन्मतः काही मार्ग उपलब्ध झाले होते,राजपरिवारात जन्म झाल्यामुळे. परंतु याचा पांडवांना कधीही माज वा गर्व वा मस्ती चढली नाही. किंबहुना त्यांची पावलं कायम जमिनीवर राहिली. अगदी महाभारत युद्धातील विजयानंतरसुद्धा.
तुमच्या कर्मावर तुमचं प्रारब्ध ठरतं हे वैश्विक सत्य आहे. कौरवांनी प्रथमपासून पांडवांचा दुस्वास आणि रागराग केला. त्यांना नामोहरम करण्याकरता सर्व आयुष्य घालवलं. त्यांच्या मृत्यूसाठी अनेक सापळे रचले. अगदी भीमाला लहान असताना मूर्च्छित करून जलात फेकून देण्याचा अयशस्वी प्रयत्नदेखील झाला. या सर्व गोष्टी उच्च बुद्धिमत्ता, जाण व भान असलेल्या भीष्मांना आणि त्यांचे गुरु असलेल्या द्रोणाचार्यांना समजत नव्हत्या असं नाही परंतु त्यांनी प्रथमपासून दुर्लक्ष केलं. कारण त्यात त्यांची अपरिहार्यता होती. हा उद्दामपणा फक्त एकतर्फी कौरवांकडून पांडवांविरुद्ध सुरु होता हे दिसत होतं. कदाचित त्यांच्या राजकीय मर्यादा आहेत असा समज त्यांनी प्रथमपासून करून घेतला.
कर्णाला असलेली महत्वाकांक्षा दुर्योधनाने ओळखूनच त्याला आपल्या बाजूला खेचण्यासाठी त्याला अंगदेशाचा राजा घोषित केलं आणि आयुष्यभराच्या ऋणात त्याला बांधून टाकलं. परंतु वास्तविक हे ऋण नसून कर्णाच्या विद्येला वा शास्त्रकलेचा केलेला सन्मान होता. त्याचा धनुर्धर म्हणून असलेला प्रतिस्पर्धी हा अर्जुन आहे हे दुर्योधन जाणून होता. परंतु कर्णाला स्वतःच्या वकुबावकर मिळवण्याऐवजी हे आयतं मिळालेलं राज्यपद बरच काही देऊन गेलं. वास्तविक खरा कर्तृत्वान यौद्धा स्वतःच्या जीवावर काही मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि कधीही दानात मिळालेलं कोणतंही पद वा राज्य वा सन्मान स्वीकारत नाही. त्यामुळे कर्णाने हे स्वीकारून स्वतःला आपणहून दुर्योधनाच्या दावणीला बांधून घेतलं. कारण तोपर्यंत दोन्ही परिवारांमधला संघर्ष आणि त्यायोगे दुर्योधनाचा खुनशी स्वभाव सर्वज्ञात होताच. कर्णाला तो नक्कीच माहिती होता. कोणताही उच्च विचार असलेला माणूस अश्या प्रकारे नीच विचारसरणीच्या माणसाकडून स्वतःला ऋणात बांधून घेणार नाही.
नीतिमत्ता असं सांगते कि, एखाद्या व्यक्तीबरोबर असलेले संबंध वा ऋण त्या व्यक्तीच्या प्रत्येक गैरकृत्यात आपल्याला सहभागी व्हावयास भाग पडतात असं जरुरी नाही. या कारणे कर्ण कोणत्याही गैर कृत्यात मित्र म्हणून दुर्योधनाला योग्य सल्ला देऊन सावध करून शकला असता. कारण दुर्योधन कर्णाला सर्वात जास्त मान देत होता. परंतु त्याने ते केलं नाही. याउपर तो त्याला हे देखील स्पष्ट करू शकला असता कि, मित्र म्हणून तुझं हित कशात आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे. परंतु तुला ऐकायचे नसल्यास मी त्यात सहभागी होऊ इच्छित नाही. कदाचित या ठिकाणी एक मित्र आणि एक माणूस म्हणून कर्तव्य संपलं असतं. याउलट कर्णाने दुर्योधनाच्या वा कौरवांच्या प्रत्येक गैरकृत्यात सहभाग घेतला आणि त्यांना प्रोत्साहनदेखील दिले.
विशेषतः द्रौपदी वस्त्रहरण या कृत्यात कर्णानेच द्रौपदीला वेश्या म्हणून नीचपणाची पातळी गाठली. या शब्दांनीच आधीच अधम असलेल्या दुर्योधनाला अजूनच चेव चढला. या सभेत भीष्म आणि गुरु द्रोण यांसारखे महारथी मूग गिळून गप्प बसले असताना कर्णाने मित्र असलेल्या दुर्योधनाला योग्य सल्ला देऊन अडवण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचं कर्तव्य पार पडलं असत. इतिहासाने कर्णाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं असत. दुर्योधन कर्णाला मित्र म्हणून किती मानत होता हे अनेक प्रसंगात दिसून येतं. कदाचित दुर्योधनाने कर्णाचा मान ठेऊन ऐकलं देखील असतं . नसतं ऐकलं तर कर्णाला सभेतून निघून जाण्याचा अधिकार नक्कीच होता. परंतु एका नीच अधमी कृत्यात व्यक्तीशः सहभाग घेऊन आपल्याच प्रारब्धात महत्तम पापकर्म कर्णाने स्वतः लिहून ठेवलं.
महाभारतात अनेक प्रसंगात वा सतत कर्ण हा दुर्योधनाच्या सोबत कायम वावरताना दिसतो. किंबहुना तो सर्वसाक्षी सर्वच ठिकाणी उपस्थित आहेच. यावरून अजून एक गोष्ट समजते कि, त्याला आपल्याला देण्यात आलेल्या अंग देशाच्या राज्याकडे बघण्याची कोणतीही आवड व गरज वाटली नाही. तसा कोणताही उल्लेख आढळत नाही. हा एक राजा (नियुक्त असला तरी) म्हणूनच्या कर्तव्यात कसूरच नसून अक्षम्य गुन्हा आहे. म्हणजेच त्याला संपूर्ण आयुष्यात पांडवांशी विशेषतः अर्जुनाशी वैरभाव धरण्यात आणि तेच जोपासण्यात आणि त्याचाच पाठपुरावा करण्यात जास्त रुची होती. किंबहुना त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता त्यातच होती. परंतु पांडवानी अश्या प्रकारचा कोणताही प्रयन्त केल्याचं दिसत नाही. किंबहुना तसा कोणताही प्रयत्न त्यांनी दुरोधनासारख्या नीचतम माणसाच्या बाबतदेखील केल्याचं आढळत नाही.
पांडवांचं पूर्ण आयुष्य सज्जनता , सत्य आणि धर्माच्या मार्गावर वाटचाल करण्यात आणि त्यायोगे स्वतःला
सतत संकटात टाकण्यात गेलं. परंतु या सर्व वाटचालीत कोणत्याही क्षणी आपण अधम व नीच मार्गावर जाऊन या सर्वांचा पाठपुरावा करून एकदाचा या वैरभावाचा (जे कौरवांनी त्यांच्याकडून जपलं होतं परंतु पांडवांनी कधीही तसं मानलं नव्हतं) सोक्षमोक्ष लावून टाकावा आणि कौरवांना एकदाच धडा शिकवावा असा विचार केल्याचं दिसत नाही. त्यांनी नेहमी कौरव आपल्यातील वैरभाव विसरतील आणि आपले संबंध पुन्हा प्रस्थापित होतील याचाच प्रयत्न केला. त्याची जबरदस्त किंमत देखील त्यांनी मोजली. तरीदेखील त्यांनी त्याबाबत कधी तक्रार केली नाही वा त्यापासून ढळण्याचा विचारदेखील केला. त्यांच्या या धर्म मार्गाच्या दृढतेमुळेच वासुदेव श्रीकृष्ण सतत , क्षणोक्षणी, आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिला. त्याचसाठी शेवटचा कृष्णशिष्टाईचा असफल आणि अपमानकारक प्रयत्नदेखील श्रीकृष्णाने केला. सरतेशेवटी सर्व उपाय थकल्यावर घडलेल्या महायुद्धात त्यांचीच बाजू घेऊन हरप्रकारे प्रयत्न करून युद्ध पांडवांना जिकून दिले.
कर्णाचा अजून एक दुर्गुण म्हणजे त्याचा खुनशीपणा. महाभारत युद्धात पितामह भीष्म यांनी ठरवून व मान्य करवून घेतलेले नियम, अभिमन्यूविरुद्धच्या युद्धात प्रत्यक्ष गुरु द्रोण व दुर्योधनासह अश्वथामा, शल्य, कृतवर्मा, कृपाचार्य, वृषसेन, बाणासेन, शकुनी, दुःशासन यासह स्वतः कर्ण या तथाकथित महावीरांनी एकत्र येऊन एकत्र हल्ला करून आधी बाणांनी आणि नन्तर एकाच वेळी खड्गाने एकसाथ वार करून अभिमन्यूची हत्या घडवून आणली. एका सोळा वर्षाच्या योद्ध्याला कौरवांना आवरता आलं नाही. या हत्येच्या क्षणापर्यंत दहा सहस्त्र कौरव सैनिक, दुर्योधन, शल्य, कृतवर्मां यांचे पुत्र, कर्ण, शकुनी, शल्य यांचे बंधू, मगधासह अनेक राज्यांचे महावीर योद्धे, कर्णाच्या सैन्यातील अनेक वीर यांना एकट्याने यमसदनी पाठवलं होतं. प्रत्यक्ष गुरु द्रोण आणि कर्ण यांना देखील एकट्याने अभिमन्यूला आवरता आलं नव्हतं. हा वास्तविक त्या दोघांचाही नैतिक पराभवच होता. विशेषतः अर्जुनाला युद्धात परास्त करण्याचं स्वप्न बाळगून असलेल्या कर्णाचा तर नक्कीच हा पराभव होता.
याच कारणाने प्रत्यक्ष दुर्योधनाशी हातमिळवणी करून, संगमताने, त्यावेळी मान्य झालेले नियम भंग करून अकरा जणांनी एकत्र येऊन अभिमन्यूला संपवण्याचा कट रचला आणि प्रत्यक्षात आणला. ज्यात गुरुद्रोण आणि कर्ण प्रत्यक्ष सहभागी होते. इतकया नीचतम कृत्यात सहभागी असलेल्या (या कृत्यात नुसता पाठिंबा नाहीतर प्रत्यक्ष योजना बनवून ती कृतीत आणून हत्या कारण्यापर्यत सर्व गोष्टीत बरोबरीचा सहभाग घेतलेला) कर्णाने आपल्यातील खुनशी आणि नीच वृत्तीची पूर्ण प्रचिती दिली. . श्रीकृष्णाने व अर्जुनाने एकवेळ आधीचे सर्व गुन्हे वा पाप विसरण्याचा प्रयत्न केलाही असता. परंतु इतकया नीचतम कृत्यात अधम पातळीची मर्यादा ओलांडणाऱ्या कर्णाला त्याच्या या नीच कृत्याची योग्य ती शिक्षा मिळणं गरजेचं होतं .
कर्णाचाच भाग उद्या पुढे.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग पंचदश समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment