Skip to main content

अंतिम भाग - अहिरावण महिरावण चित्रसेना, मकरध्वज संक्षिप्त कथा - ४

अंतिम भाग - अहिरावण महिरावण चित्रसेना, मकरध्वज संक्षिप्त कथा - ४

हनुमंत पुनः मूळ श्रीवीरहनुमान रुपात प्रकट होऊन,  मंदिरा बाहेर येऊन भुंग्याचा शोध सुरू करतात.  काही क्षणातच भुंगे असलेलं ठिकाण सापडतं. हनुमंत  सर्व भ्रमारांना संपवून टाकतात. एक भ्रमर जिवंत राहतो, तो हनुमंताच्या पाया पडतो आणि दयेची याचना करतो. हनुमंत त्याला म्हणतात

" एकाच अटीवर तुला जीवनदान देतो. चित्रसेनेच्या महालात जाऊन तिच्या शयनकक्षातील पलंगाचे चारही पाय, विना विलंब पोखरून ठेव, ज्यायोगे त्यावर कोणीही बसलं की तो पलंग मोडून पडला पाहिजे आणि हे काम अतिशीघ्र गतीने कर, समय खूप कमी आहे." 

जीव वाचलेला भ्रमर त्वरित आपल्या कार्याला निघून जातो. हनुमंत अत्यंत वायूवेगात दोन्ही असुर जिथे युद्ध करत होते तिथे पोहोचले. मकरध्वजाने आपल्या पित्याप्रमाणेच वीरश्री दाखवत दोन्ही असुरांना युद्धात गुंगवून ठेवलेलं असतं. हनुमंत येताच, त्याच्या अंगी बळ शतपटीने वाढतं आणि दोघे मिळून अहिरावण आणि महिरावण यांना यमसदनी पाठवतात. यावेळी पाचही दीप  विझले आहेत आणि भुंगे मृत्यू पावल्यामुळे तेही येत नाहीत, त्यामुळे असुरांचा अंत होतो. दोन्ही असुरांना हनुमंत माता कामक्षीच्या मंदिरा बळी म्हणून देवीला अर्पण करतात.  

हनुमंत आपल्या पुत्राचं कौतुक करतात आणि दोघे मिळून श्रीरामलक्ष्मण यांना घेऊन चित्रसेनेच्या महाली येतात. श्रीराम व लक्ष्मण अजूनही संमोहित आहेत. महालात प्रवेश करताच हनुमंत श्रीराम आणि लक्ष्मण यांची ओळख त्या चित्रसेनेशी करून देतात. 

" हे प्रभू , ह्या चित्रसेना, असुरराज अहिरावण यांची पत्नी. त्या असुराने, यांना बळजबरीने नागलोकातून पळवून आणून विवाह केला होता. परंतु यांना तो विवाह अमान्य आहे. यास्तव यांनी अहिरावणाच्या मृत्यूचं रहस्य सांगून आपलं खूप सहाय्य केलं आहे. त्यायोगे हे दिननाथ, मी आपले प्राण वाचवू शकलो. म्हणून त्याबदल्यात मी यांना एक  वचन दिलं आहे. आपण तारणहार आहात आणि भक्तवत्सलही आहात. चित्रसेना आपल्या निर्मळ व निस्सीम भक्त आहेत." 

" कोणतं वचन" 

" यांनी केलेल्या सहकार्याच्या बदल्यात, आपण यांच्याशी विवाह कराल. तसं वचन मी दिलं आहे प्रभू आणि आपल्या भक्तांच्या वचनांची लाज राखणं हे आपलंच ब्रीद आहे." 

प्रभू चक्रावून जातात. हनुमंत पुढे म्हणतो.

" हे जानकीनाथ, आपल्या सर्व वचनांची माहिती व चिंता मला आहे. त्यामुळे आपण निश्चीन्त असा." 

असं म्हणून, प्रभुना काही कळायच्या आतच त्याना हाताला धरून हनुमंत , त्या लाकडी पलंगावर बसवतात. अर्थातच भुंग्याने कार्य चोख केलेलं असल्याकारणे, प्रभू बसता क्षणी पलंग काडकन मोडून आसनस्थ प्रभू भुवर पडतात. परंतु या धक्क्याने त्यांचं संमोहन जाऊन ते शुद्धीवर येतात. त्यांना घडलेला सर्व प्रकार आणि हनुमंताचं कौशल्य लक्षात येतं. 

हनुमंत लगेच चित्रसेनेला म्हणतात.

" हे देवी, मी दिलेल्या वचनानुसार प्रभुना आपल्या महाली विवाहप्रीत्यर्थ घेऊन आलो. परंतु माझ्या अटींनुसार आता, पलंग तुटल्या कारणे , मी वचनमुक्त झालो." 

चित्रसेनादेखील झाल्या प्रकाराने आश्चर्यचकित झालेली आहे. ती निराश आणि निरुत्साही नजरेने पहात, प्रभुना नमस्कार करते. सर्व जगताचे तारणहार श्रीरामस्वरूप विष्णू तिला उठवून म्हणतात.

" हे चित्रसेना , तुझ्या भक्तीने मी प्रसन्न जाहलो आहे. तुझ्या विवाहाच्या इच्छेचा मी स्वीकार करतो. परंतु या जन्मात मी एकपत्नीव्रती असल्याकारणे या जन्मी शक्य नाही. परंतु द्वापारयुगामध्ये पुढील जन्मी, कृष्णावतारात मी तुला माझी दुसरी प्रिय पत्नी, सत्यभामा,  म्हणून नक्की स्वीकारून तुझा उद्धार करीन." 

या वचनाने चित्रसेनेला अत्यानंद होतो. प्रभू हनुमंताला आज्ञा देतात की, चित्रसेनेला तिच्या पित्याच्या गृही सोडण्याची व्यवस्था कर. हनुमंत आपला पुत्र मकरध्वज याची ओळख आणि त्याच्या जन्माची कथा प्रभूंना सांगतो. मकरध्वज प्रभू चरणी नतमस्तक होऊन आशिष घेतो. हनुमंत, चित्रसेनेला स्वगृही सोडण्याचं कार्य, मकरध्वज याला, सोपवून पाताळ लोकांतून पृथ्वीकडे, अर्थात लंकादेशी, श्रीरामलक्ष्मण यांना घेऊन, प्रस्थान करतात. 

चित्रसेना आपल्या पित्यागृही जाते. परंतु प्रभूंच्या वचनाने अत्यानंदी होऊन, आपला देह अग्निअर्पण करून ,  आपले जीवित कार्य संपवते, ज्यायोगे तिचा पुढील जन्मीचा मार्ग सुकर होतो.  

भाग ४ व अंतिम समाप्त 

संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. 
१०/०५/२०२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...