श्रीकृष्ण नीति १२
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
श्रीकृष्ण नीती युद्धापर्यंत संपत नाही. इतक्या कपटातून जाऊन ,इतक्या राजकीय डावपेचांचा सामना करूनही आणि युद्धात बहुतेक सर्व महारथींना कृष्णनीतीनेच परास्त करूनही, पिताश्री धृतराष्ट्र भेटीला कोणतीही काळजी न घेता सरळ भेट घेणाऱ्या भोळ्या पांडवांना, विशेषतः भीमाला, कृष्णानेच वाचवलं, पुतळा पुढे करायला सांगून. इतके धडे मिळूनही इतके बेसावध कसे राहू शकतात याचं व्यक्तिशः मलाही आश्चर्य वाटतं. कारण मागील प्रत्येक कपटात धृतराष्ट्र मूकपणे नक्कीच सहभागी होता, हे गत इतिहास सांगत होता.
सर्व आयुष्य ज्या कौरव कुटुंबाने फक्त कट , कपट आणि कारस्थानं हेच दिलं त्या कुटुंबाशी व्यवहार करताना वा वागताना इतका बेसावधपणा अकल्पनीय आहे. अर्थात यातून ही पण एक गोष्ट शिकायला मिळते की, अश्या व्यक्तीशी बोलताना वा त्यांच्यासमोर वावरतानासुद्धा अत्यंत काळजी पूर्वक वागलं वा बोललं पाहिजे. यात कृष्णाने शिकवलेली ही गोष्ट पण महत्वाची आहे की, नातं हे एकाच बाजूने टिकू शकत नाही आणि टिकवता उपयोगी नाही.
श्रीकृष्ण चरित्रातून अजून एक गोष्ट सिद्ध होते की, आपल्या प्रिय भक्तांना तारायला प्रसंगी नीतीला थोडी बगल दिली वा द्यावी लागली तरी चिंता करायचं कारण नाही. त्यामुळे कोणताही अधर्म वा विनाश होत नाही. जर आपला अंतिम उद्देश धर्माची स्थापना करणं वा धर्माचं रक्षण करणं असेल तर, मार्ग थोडा अडवळणाचा असेल तरीही हरकत नाही. अधर्मी शत्रूचा निःपात हा उद्देश असावा आणि तो करूनच धर्म प्रस्थापित करणं महत्वाचं मानावं.
महाभारताच्या महायुद्धात चारही महारथींना मारण्यासाठी रणांगणाबाहेरील युक्त्या वा डावपेच वापरूनच मारलं. ते चार मुख्य शत्रू पितामह भीष्म, गुरुद्रोणाचार्य, ज्येष्ठ कौंतेय कर्ण, आणि स्वतः दुर्योधन. कारण प्रत्यक्ष त्यांना मारणं हे श्रीकृष्णालाच शक्य होतं. पाचही शत्रूंना अजेंयत्वाच काहीतरी वरदान प्राप्त होतं. ज्यायोगे त्यांना प्रत्यक्ष लढाईत संपवणं पांडवांसाठी अशक्य होतं.
भीष्म ज्यांना इच्छामरणाचं वरदान प्राप्त होतं, परंतु ते स्वतःच्या प्रतिज्ञेत बद्ध होते आणि ज्यांची बांधिलकी हस्तिनापूरच्या सिंहसनाशी होती, तरीही त्यांची ही नैतिक जबाबदारी होती की हे सिंहासन चुकीच्या हातात जाता कामा नये. जर ते जात असेल तर त्याचा पुरेसा बंदोबस्त करण्याचं सामर्थ्य भीष्मांच्या बाहुत आणि शस्त्रात होतं. परंतु त्यांनी बांधिलकी सिंहासन वा राज्य यांच्याशी न मानता राजाशी दृढ केली आणि गल्लत झाली.
आपली प्रतिज्ञा आणि त्याचे होणारे परिणाम याचा विचार करून प्रतिज्ञा केली पाहिजे. ह्याची पश्चातबुद्धी भीष्मांना शरपंजरी झाल्यानंतर आली. तसा उल्लेख त्यांनी राज्या भिषेकानंतर चरणस्पर्श करण्यास आलेल्या युधिष्ठिराला केलेल्या उपदेशात केला, त्याला बोधपर गोष्टी सांगताना. अजून एक गोष्ट जी महाभारताने सांगितली ती म्हणजे वचन आणि प्रतिज्ञा या भावनेच्या भरात न देता वा न करता विचारपूर्वक दिली वा केली पाहिजे.
भिष्मांसारख्या महारथीला खरतर हि गोष्ट उमगली नाही वा उमगून ते स्व मध्ये रत झाल्यामुळे अर्थात प्रतिज्ञाकोष विणून त्यात स्वतःला गुरफटून घेऊन त्यांनी एक प्रकारे अभिमान जोपासला. जो इतक्या महान वीराला अधोगतीला घेऊन गेला. या कोशामुळे ते, हि गोष्ट पूर्ण विसरले कि, मूळ निर्णयानुसार धृतराष्ट्र राज्यास अपात्र होता आणि पांडूच्या पश्चात केवळ त्याचा प्रतिनिधी म्हणून धृतराष्ट्राला सिंहासन मिळालं होतं . म्हणून पांडुपुत्र योग्य वयात आल्यानंतर त्यांना राज्यावर बसवण्याचे उत्तरदायित्व हे धृतराष्ट्राचं नव्हतं, तर तत्वतः ते भीष्मांचे होते. अन्यथा शरपंजरी होऊनही, हस्तिनापूर पूर्ण सुरक्षित हातात जात नाही तोपर्यंत आपले प्राण त्यांनी धरून ठेवले नसते.
त्यांना याची जाणीव उशिरा झाली, शरपंजरी झाल्यानंतर. याच गोष्टीची अत्यंत मोठी शिक्षा त्यांनी शरपंजरी ८ ते ९ दिवस बाणांचे घाव सोसून व सहन करून भोगली आणि प्रायश्चित्त घेतलं. श्रीकृष्णाने ती शिक्षा त्यांना भोगायला लावली. त्यात कोणत्याही प्रकारची दया दाखवली नाही. म्हणूनच अर्जुन भीष्मांना बाण मारत असताना अर्जुनजरी भावविवश होता तरीही श्रीकृष्ण तटस्थ होता. कारण श्रीकृष्ण जाणत होता की, भीष्मांना जे मिळतंय ते त्यांच्या कर्माचं फल आहे. वचन आणि प्रतिज्ञा यांच्या चुकीच्या संकल्पनेत अडकलेल्याना याच शिक्षेतून जावं लागतं.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग द्वादशम समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment