Skip to main content

#श्रीकृष्णनीती #भाग२०

#श्रीकृष्णनीती #भाग२०

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

दुर्योधनाचं खरं  भांडण वा वादाचं कारण हे पांडवांचा राज्यावरचा हक्क हा होता. मुळात त्याचं म्हणणं कि, त्याचे पिताश्री , धृतराष्ट्र हे अंध असल्याकारणाने राज्यावर बसू शकले नाहीत. याकारणे ते राज्य अनुज पांडू यांना मिळालं  अन्यथा त्यांचा व पर्यायाने पांडवांचा काहीही हक्क राज्यावर नाही. याशिवाय धृतराष्ट्र हे अंध म्हणून अपात्र ठरत असले तरी त्यांचा वारस म्हणून मी पात्र आणि लायक आहे. याकारणे देखील हे राज्य कौरवांच्या हक्कात येतं . या दोन्ही कारणाने पांडव अपात्र ठरतात. 

यात एक राजकीय नीतिमत्ता वा नियम जो त्याकाळी प्रचलित होता , त्या नियमानुसार एकदा एखादा राजा अपात्र ठरला आणि त्याचा हक्क दुसऱ्याला दिला कि त्या अपात्र राजाचा वंशज आपोआप बाद झाला. याचं  उत्तम उदाहरण म्हणजे पेशवाई. पहिले बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब यांना हि गादी वारसाहक्काने मिळाली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे हयात चिरंजीव थोरले माधवराव यांना मिळाली (रघुनाथराव पेशवे जे नानासाहेबांचे बंधू हयात होते तरी त्यांना हा हक्क मिळाला नाही.) या न्यायाने पांडवांचा हक्क हा न्यायपात्र ठरतो. याशिवाय धृतराष्ट्रांना हे राज्यपद हे निव्वळ पांडूंचे प्रतिनिधी या नात्याने तात्पुरती सोय म्हणून देण्यात आलं होतं . पांडुपुत्र योग्य वयात आल्यावर हे राज्य त्यांना द्यावयाचे हे ओघानेच त्यात आले होते. 

परंतु यालाच दुर्योधनाचा विरोध होता. त्याच्या दृष्टीने हे राज्य हा धृतराष्ट्रांनंतर त्याच्याच  हक्कात येत होतं, जरी कुंतीपुत्र युधिष्ठिर हा त्याच्यापेक्षा ज्येष्ठ होता. याच कारणाने लहानपणापासून त्याच्या मनात पांडवांबद्दल द्वेष होता. कारण त्याला हे माहित होतं कि, योग्य वयात हे राज्य पांडवांना द्यायचं आहे. त्याच्या या द्वेषाला यशस्वीपणे खतपाणी घालण्याचं काम मामा शकुनी यांनी केलं. तरीसुद्धा एक गोष्ट नक्की वाटते वा दुर्योधन चरित्रावरून जाणवते की, शकुनी या भ्रमात राहिला की तो दुर्योधनाला वापरतोय. परंतु महाभारत आणि त्यातील घटना यांचा नीट अभ्यास केला आणि अन्वयार्थ लावला तर हाच निष्कर्ष निघतो की, दुर्योधनानेच वास्तविक शकुनीच्या डावपेचांना आधार करून आपलं इप्सित साध्य करत गेला. 

कारण ज्यावेळी मामाचं ऐकायचं त्यावेळी मामाचं , कधी कर्णाचा हितोपदेश ऐकून विचार आणि निर्णय स्वतःचा घेण्याची क्षमता असलेला एक कुशल  नेता होता दुर्योधन. म्हणूनच वेळ आली तर शकुनीला सुद्धा गप्प करण्याची हिंमत त्याच्यात होती. अन्यथा अश्वत्थामा व कर्ण यांना शकुनी पाण्यात पाहात असताना, या दोघांना आपल्या अगदी जवळ जागा द्यायला जराही न घाबरणारा दुर्योधन शकुनीच्या डोक्याने चालेल ही शक्यताच नाही. किंबहुना कर्णाविरुद्ध एकही अक्षर दुर्योधनाने शकुनीकडून ऐकून घेतलं नाही. याचं कारण दुर्योधन शकुनीच्या कब्जात नव्हता तर शकुनी दुर्योधनावर अवलंबून होता.
 
दुर्योधनाचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे त्याची अति महत्वाकांक्षा, राज्याचा लोभ वा अतिलालसा आणि स्वभावाचा आततायीपणा, दुराग्रह. मुळात जर खोलात जाऊन विचार केला तर धृतराष्ट्रांकडे आलेलं राज्य हेदेखील कनिष्ठ बंधू मार्फत आलं होतं . यासाठी आपण चार पिढ्या मागे जाऊ. राजा प्रतिप  यांना तीन पुत्र होते देवपी, बहिलक आणि शंतनू, यातील देवपी ज्येष्ठ असल्यामुळे राज्याचे खरे  वारस होते . 

परंतु त्यांना कुष्ठरोग झाल्यामुळे त्यांनी राज्यावरील हक्क सोडून वनात निघून जाणं पसंत केलं. नन्तर अर्थातच बहिलक यांचा राज्यावर बसण्याचा हक्क होता. परंतु त्यांना राज्य चालवण्याच्या दृष्टीने काहीही अनुभव व प्रशिक्षण मिळालं नव्हतं वा त्यासाठी त्यांचं पालनपोषण एक युवराज म्हणून करण्यात आलं नव्हतं. (कारण त्यावेळी देवपी यांनाच युवराज म्हणून बघण्यात येत होतं). हे कारण देऊन त्यांनीही आपला हस्तिनापूरवरील हक्क सोडला. 

बहिलक यांनी असमर्थता व्यक्त केल्यानंतर तो हक्क अर्थातच शंतनू यांच्याकडे आला. शंतनू यांचे ज्येष्ठ पुत्र अर्थात भीष्म प्रतिज्ञाबद्ध म्हणून आजन्म ब्रह्मचारी. सत्यवतीच्या शंतनूपासून झालेल्या दोन संतानांपैकी एक चिंत्रांगद त्याच नावाच्या गंधर्वांकडून मारला गेला. विचित्रवीर्य अल्प आजारात मृत्यू पावला. यानंतर पुन्हा वारसाचा प्रश्न उभा राहिल्या नंतर भीष्मांचे चुलते अर्थात बहिलक याना पुन्हा विचारण्यात आलं कि, त्यांची इच्छा आहे का. त्यांनी आपला पुत्र सोमदत्त आणि सोमदत्ताचा पुत्र भूरीश्रव याला विचारलं. त्यांनी दोघांनीही यात असमर्थता दर्शवली. याच कारण ज्यावेळी बहिलक यांनी प्रथम हक्क सोडून राज्य शंतनू याना दिलं, त्याच वेळी राजा प्रतिप यांनी त्यांना सागरात एक बेट,   ज्याचं नाव बहिलक  याच नावाने ठेवण्यात आलं, त्या बेटाचं राज्य भेट म्हणून दिलं. 

 याकारणे ते अनेक वर्ष तिथेच राज्य करत होते.  परंतु महाभारतातील युद्धात ते दुर्योधनाच्या बाजूने लढले होते. याच युद्धात चवदाव्या दिवशी भीमाने बहिलक यांचा तर सात्त्यकीने सोमदत्त व भुरिश्रव यांना मारलं होतं. तर सोमदत्ताचे इतर नऊ पुत्र यांना देखील पांडवांनी यमसदनी धाडलं. भुरिश्रवाचे दोन पुत्र प्रताप (दुसरा) आणि प्रजन्य यांना तेराव्या दिवशी अभिमन्यूने मारलं होतं. म्हणजे या युद्धात त्यांचाही निर्वंश झाला. 

या सगळ्याचा उल्लेख करण्याचं कारण कि, जो राजा निःसंतान झाला तरच आणि त्यांनतरच दुसऱ्या जीवित वारसाला वा त्याच्या पुढील पिढीला विचारण्याची प्रथा होती. म्हणजेच मुळात पांडूला राजा म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या पश्चात प्रथम हक्क हा पांडवांचा होता. त्यांनी काही कारणांनी असमर्थता व्यक्त केली असती, तरच कौरवांचा हक्क प्रस्थापित होत होता. अर्थात येथे अजून एक गोष्ट आहे कि, मुळात दुर्योधन पांडवाना  फक्त कुंतीचे पुत्र मनात होता. त्याच्या मते ते राजा पंडू  यांचे पुत्र नाहीत. याचा खोलात जाऊन विचार केला तर मुळात धृतराष्ट्र आणि दोन बंधू पांडू  व विदुर हे देखील सत्यवतीच्या प्रथम पतीपासून झालेल्या , अर्थात ऋषी पराशर यांच्यापासून झालेल्या महर्षी व्यास यांच्या पासून अंबा , अम्बिका आणि एक दासी यांना नियोग पद्धतीने झालेले पुत्र होते. खरतर कुरु वंशाशी त्यांचा संबंध येत नाही. अर्थात इतक्या खोलात कुणी गेलं नसेल त्यावेळी. कारण तत्कालीन प्रचलित पद्धती प्रमाणे ते धृतराष्ट्र आणि दोन बंधू कुरुवंशीय समजले गेले. 

सांगण्याचा उद्देश मुळात दुर्योधनाचा वारसाहक्काचा  दावाच मिथ्या होता. परंतु आपल्या आततायी स्वभावानुसार त्याने सर्व गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे व्हाव्यात हा हेका लावून धरला आणि सर्व राज्य बळकावण्याची  अतिमहत्वाकांक्षा बाळगली, जोपासली आणि त्यासाठी संपूर्ण भारतवर्षाला युद्धात जुंपून, आपल्या दुराग्रहाच्या चक्रात आणि अग्नीत जाळून भस्म केलं.  त्याचे मूळचे असलेले गुण , त्याच्यातील दुर्गुणांनी इतके झाकोळून टाकले, कि, त्याच्या काही अलौकीक गुणांबद्दल त्याचं कौतुक करणारे भीष्म देखील त्याचे विरोधक झाले आणि त्याचा राग करू लागले. जरी ते त्याच्या बाजूने लढले तरी मनाने ते कधीच त्याचे राहिले नाहीत, हे नक्की. 

खरतर आधीही अनेक प्रसंगात दुर्योधनाने त्याची अतीव महत्वाकांक्षा , सत्तालोभ यापायी पांडवांना संपवण्याच्या अनेक युक्त्या, क्लुप्त्या, व कट रचले आणि पार पाडले . इतका द्वेष तो पांडवांचा करत असे कि, त्यांना समोर बघूनसुद्धा त्याला संताप येत असे. अर्थात पांडवांनी कधीही त्याला या दृष्टीकोनातून पहिले नाही. ते सतत सामोपचारात वागले. निम्मं राज्य, पाच गाव इथपर्यंत संधी करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. स्वपत्नीचा अपमान सहन करूनदेखील युद्ध टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जो नक्कीच कौतुकास्पद आहे. पण एक कण भूमीही न सोडण्याची दुर्योधनाची वृत्ती हि त्याच्यातील अधम वृत्तीचं  द्योतक आहे. 

म्हणून सरतेशेवटी काहीही उपाय न राहिल्यामुळे श्रीकृष्णांनी त्याला संपवण्याच्या मार्गात आलेले सर्व अडथळे अर्थात भीष्म, द्रोण, कर्ण यांना युक्तीने संपवून दुर्योधनालादेखील युक्तीनेच संपवला. कारण असत्याची, अधम आणि अविचारांची ताकद खूप मोठी असते. नकारात्मकतेचा अग्नी जास्त दाहक आणि ताकदवान असतो. म्हणून तो त्याहीपेक्षा जास्त ताकदीने वा युक्तीनेच संपवावा लागतो. कारण दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत धृतराष्ट्राच्या महत्वाकांक्षा जीवित राहिल्या असत्या. कारण दुर्योधन हा धृतराष्ट्राच्या महत्वाकांक्षा आणि आयुष्यभर अंध म्हणून मिळालेल्या अपेक्षांचं डोळस प्रतिनिधी वा मूर्त स्वरूप होता. म्हणून तो संपला तरच धृतराष्ट्र पूर्ण नामोहरम होईल हे श्रीकृष्ण जाणून होते. 

कारण खरं महाभारत हे श्रीकृष्ण आणि धृतराष्ट्र यांच्यात होतं आणि बाकी सर्व प्यादे होते. कसं ते पुढील भागापासून पाहू. 

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

क्रमशः

©® संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले

भाग विसावा  समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...