#श्रीकृष्णनीती #भाग२२
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
धृतराष्ट्राकडे वळण्याआधी थोडी पार्श्वभूमी बघू. कृष्णाने कंस, नरकासुर यांसह जरासंध (भीमामार्फत) , कालयवन या व अश्या मायावी शत्रूंचा निःपात करून असुरी व मायावी शक्ती संपवल्या. खरतर असुरी शक्तींचा विनाश झाला की सर्व स्थिरस्थावर होणं क्रमप्राप्त होतं. परंतु असं झालं नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे हा द्वापारयुगाचा अंतकाळ होता. कारण कृष्णावतार द्वापारहुगाच्या अंताला झाला आहे. यातून कलियुगाचा संदेश जो श्रीकृष्णांनी महर्षी व्यास यांच्यामार्फत जगाला कलियुगाच्या अंतापर्यंतच्या काळासाठी दिला आहे, तो म्हणजे इथून पुढे असुरांचं अस्तित्व हे प्रत्यक्षात नसेल, आता त्यांना वा उरलेल्या असुरांना मी नष्ट केलंय . परंतु आता ते अस्तित्व रूप बदलून अहंकार, गर्व, क्रोध, दंभ, द्वेष, मत्सर, काम, मोह, लोभ, अनीती, कुसंस्कार अश्या रिपूंच्या माध्यमातून मनात घर करून असतील.
म्हणूनच त्यांचा सामना करणं हे रोजचं नव्हे क्षणाक्षणांचं महाभारत असेल. जे प्रत्येक व्यक्तीला सामान्य वा असामान्य सर्वांनाच लढावं लागेल. यातून आत्मरुपी कृष्ण मनरूप अर्जुनाला संस्काररूप, धर्मरूप न्यायरूप, गीता सांगून त्यांच्याशी कस लढावं हे सांगेल. प्रत्यक्ष परमेश्वर आता येईलच असं नाही. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आत्म्यातील श्रीकृष्णाला सतत जाग ठेवून त्याचाच आवाज ऐकण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच कलीने प्रवेश जरी परीक्षित राजाच्या म्हणजेच अर्जुनाच्या नातवाच्या काळात केला तरी मनातील हा कली धृतराष्ट्र रूपात फार आधीच अस्तित्वात होता.
म्हणूनच मी आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, हा संघर्ष वा हे युद्ध वा खरं महाभारत हे श्रीकृष्ण आणि धृतराष्ट्र यांच्यातच होतं आणि बाकीचे आपल्या आपल्या मनाच्या आदेशानुसार वा परिस्थितीच्या अपरिहार्यतेनुसार त्यात त्या त्या बाजूने ओढले गेले आणि कुणीही न सांगितलेला निष्कर्ष आताच्या काळासाठीचा तो म्हणजे बलराम म्हणजे भारतात अस्तित्वात असलेला आजचा समाजवाद वा निधर्मीवाद. जो संपूर्ण महाभारत युद्धात अलिप्त वा तटस्थ राहिला, आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व चुकांकडे , प्रमादांकडे, दोषांकडे, अवगुणांकडे त्याच्या मनातील द्वेषभावनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून भीमाने शेवटच्या गदायुद्धात केलेल्या (श्रीकृष्णांनी सूचक इशारा केल्यानंतर केलेल्या) एका चुकीवर त्याला मारायला धावले. ज्यावेळी प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी आपल्या ज्येष्ठ बंधूंची कानउघाडणी केली आणि जो प्रश्न युद्धात कर्णाला केला होता तोच प्रश्न त्यांनाही केला ज्या ज्या वेळी दुर्योधनाने अपराध केले, प्रमाद केले, अन्याय केला, आततायीपणा केला, अधर्म केला तेंव्हा कुठे गेला होतात ताऊ ,
पूर्ण युद्ध आपण तटस्थ राहून हिमालयात तप करण्यास निघून गेलात आणि आलात ते शेवटच्या दिवशी. पूर्ण युद्ध वा पूर्ण आयुष्य आपण आपला सर्वात लाडका शिष्य , ज्याचं आपण कौतुक करता, त्याला का कधी नाही सुनावण्यास वा विचारण्यास आलात, कि इतक्या सर्व अपराधांबद्दल , प्रमादांबद्दल तुला जाब द्यावा लागेल. मागितलं का कधी त्याच्याकडे आपण स्पष्टीकरण. मग आज जर भीमाने धर्माच्या रक्षणार्थ नियम भंग केला तर आज कोणत्या हक्काने आपण विचारता आहात आणि कोणत्या हक्काने आपण भीमाला शासन करण्यास पुढे आला आहात. भीमाने नियम भंग केलाच, पण प्रमाद वा अपराध नाही तर दुर्जन दुयोधन वधासाठी जो त्याशिवाय अशक्य होता. कारण इतकी अधम कृत्य केलेल्या आपल्या पुत्राला, त्याची माता गांधारी हिने देखील, वज्राचं कवच प्रदान केलंच तेही पूर्ण आयुष्य त्याच्या चुकांवर दुर्लक्ष करून, डोळ्यावर अज्ञानरूप पट्टी बांधून आणि तीच पट्टी इतकया अधमी पुत्राच्या रक्षणार्थ उघडून त्याला वज्राचं कवच प्रदान केलं.
यातून श्रीकृष्णांनी अजून एक बोध दिला, स्वतःचे ज्येष्ठ बंधू जरी चुकीच्या बाजूने असले तरी त्यांनाही वेळ आल्यावर भगवंतांनी सुनवायला मागे पुढे पाहिलं नाही. अर्थात यातून एक संदेश आहे कि, तुम्ही जर सत्याच्या, न्यायाच्या बाजूने आहात तर तिथे ठाम रहा आणि कोणीही तुमच्या विरुद्ध असेल तर त्यांची गय करू नका. त्यातच धर्माचा , न्यायाचा , नैतिकतेचा आणि सत्याचा खरा विजय आहे. जो कलियुगात कष्टप्राय आहे. किंबहुना पांडवांच्या माध्यमातून त्यांनी हादेखील संदेश दिला कि, सत्याला, न्यायाला, नैतिकतेला प्रखर संघर्ष करावाच लागणार.
त्याला पर्याय नाही. आपली लढाई स्वतःला लढवीत लागते, प्रत्यक्ष भगवंत देखील आता तुमची लढाई वा संघर्ष स्वतः येऊन लढणार नाहीत तर फक्त आत्मरुपात मार्गदर्शन करतील, किंबहुना युद्धात शस्त्रही न उचलण्याच्या कृतीतून त्यांनी हाच संदेश दिलाय कि, कलियुगात मी फक्त एक मार्गदर्शक असेल कारण शत्रू वा असुर तुमच्या मनात असेल. त्याला मारायला मला तुम्हालाही मारावं लागेल जे अशक्यप्राय आहे. म्हणूनच तुमच्यातील असुरांना तुम्हीच मारायचं आहे. शस्त्रसज्ज होऊन स्वतःचा विवेक जागृत ठेऊन, स्वमनाला ताब्यात ठेवून, न घाबरता आणि न डगमगता तुम्हीच तुमचा मार्ग आखायचा आणि चालायचा. पथदर्शक भगवंत आहेतच परंतु ते, ज्यावेळी द्विधा मनःस्थिती असेल, ज्यावेळी अद्वैत असेल त्यावेळी उपस्थित असतील.
धृतराष्ट्र हा आपल्या अपूर्ण राहिलेल्या अनैतिक, चुकीच्या, दंभाच्या, गर्वाच्या, वृथा अभिमानाच्या एका अणुतून उत्पन्न होऊन आपल्या मनाचा ग्रास घेण्यास सज्ज असेल आणि मग या ग्रासलेल्या मनातील धृतराष्ट्र आपल्याला दृष्टिहीन अर्थात चांगलं वाईट, नीती अनीती, योग्य अयोग्य यांचा विचार करू न देता, आपल्या मनातील चुकीच्या विचारांना मूर्त स्वरूप देऊन, मनात वासना, क्रोध, मत्सर, लोभ, या रूपातील दुर्योधनाला जन्माला घालून, पुढे पूर्ण आयुष्य आपल्या मनावर राज्य करून, आपल्या याच नव्हे, तर पुढील अनेक जन्माचं कायमचं नुकसान करून वर हा धृतराष्ट्र नामानिराळा राहील आणि भोग हे आपल्या आत्म्याला भोगावे लागतील जन्मोजन्मीच्या देहात येऊन, कर्माच्या चुकांची साखळी तयार करवून घेऊन. म्हणून या मनातील धृतराष्ट्राला ओळखण्यासाठी महाभारतातील धृतराष्टाची ओळख उद्या करून घेऊ.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग बावीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment