Skip to main content

सुभद्राहरण ६

सुभद्राहरण ६

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

नागकन्या त्याला म्हणाली

" हे वीरपुरुष तुमची सर्व कथा मला माहित आहे. परंतु देवर्षीच्या प्रयश्चित्ताचा मतितार्थ इतकाच आहे की, आपण द्रौपदी संदर्भात या वचनाचं पालन करावं व त्यात मोह बाधा होऊ नये म्हणून दूर राहून हा प्रवासाचा नियम बनवला आहे. हे विशालनेत्री अर्जुन, माझी इच्छा पूर्ण करण्याने तुमच्या धर्माची कोणतीही हानी होत नाही. जरी आपल्या कर्तव्य धर्माची थोडीफार हानी झालीच तर माझ्या सारख्या युवतीचं मन राखून तिची इच्छापूर्ती केल्याने मिळणाऱ्या पुण्याने ती हानी भरून निघेल. म्हणून माझी कामना पूर्ण करून आपण मला प्राणदान देण्याचं पुण्य जरूर कमवू शकाल. आपण प्रतिदिन अनेक जीवांवर उपकार करता. मी आपल्याप्रती अनुरक्त आहे आणि आपली समागमाची अपेक्षा करते. अतः आपण व्यर्थ चिंता सोडून माझ्या इच्छेचा विचार करावा हीच माझी नम्र विनंती."
उलूपीच्या विनंतीचा मान राखून, मनोमन ज्येष्ठ भ्राता युधिष्ठीर यांना प्रणाम करून तो पूर्ण दिवस आणि रात्र उलुपी सोबत व्यतीत केली. प्रातः यथाविधी सर्व उरकून अर्जुन कौरव्य नागराजाच्या भवनातून गंगाद्वार अर्थात हरिद्वारच्या तीरावर आला. त्याला तिथपर्यंत सोडायला उलूपीदेखील आली होती. अर्जुनाने उलूपीचा निरोप घेतला. उलूपीने या उपकाराच्या बदल्यात अर्जुनाला जलात तू अजेय असशील असा वर दिला. यथावकाश अर्जुनापासून उलूपीला ईशावान नावाच्या पुत्रप्राप्ती झाली.  तो अर्थातच नागलोकीचा राजा होऊन महापराक्रमी निघाला.
बाहेर आल्यावर अर्जुनाने बरोबरीच्या सर्व ब्राम्हण ऋषींना सर्व प्रकार कथन केला.
त्यानंतर अर्जुनाने पुढील यात्रेची मनीषा सर्वांना बोलून दाखवतील. बरोबरीच्या सर्व ब्राम्हण,यात्रेकरू, ऋषी यांनी प्रातःविधी व स्नानसंध्या उरकून घेतलं अर्जुनाने या स्थळी अनेक गाई आणि धनधान्य द्रव्य दान केलं. हरिद्वार उतरून अर्जुन गंगेच्या ओघाने पूर्वेच्या दिशेने निघाला. मार्गात अनेक तीर्थाना दानधर्म करत तेथील मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा लाभ घेत, घेत अंग, वंग  व कलिंग या देशातून पुढे निघाला. कलिंग देशाच्या सीमेवर सोबत असलेले सर्व यात्री, द्विजवर, ऋषिवर  इत्यादीनी  निरोप घेतला. अर्जुनाने या ठिकाणी त्यांना व इतर उपस्थित तीर्थक्षेत्रीना सुवर्ण, द्रव्य, धनधान्य आदी दान करून संतुष्ट केलं.
कलिंग देश पार करून अर्जुन समुद्र किनारामार्गे जात जात मार्गात येणारी मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचं दर्शन घेत दानधर्म करत करत मणिपूर नगरीत पोहोचला. मणिपूर नगरीतील विविध मंदिरे आणि तीर्थांचं दर्शन घेतल्यानंतर महाबाहो अर्जुन मणिपूर नरेश राजा चित्रवाहन यांच्याकडे पोहोचला. राजाने अर्जुनाचं स्वागत करून एक पांथस्थ समजून त्या हेतूने त्याच्या निवास आदी व्यवस्था केली. त्या राजा चित्रवाहनाला चिंत्रांगदा नामक एक सुस्वरूप कन्या होती. नित्य पूजाअर्चना करताना व विहार करतेवेळी अर्जुनाने चिंत्रांगदेस पाहिली. तिच्या दिव्य रूपाची मोहिनी त्याच्या मनाला जडली. तिला प्राप्त करण्याच्या हेतूने अर्जुनाने राजा चिंत्रवाहन यास पृच्छा केली

" हे महाराज आपण  आपली पुत्री चिंत्रांगदा हिचा विवाह माझ्या सह लावून मला उपकृत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो."

राजाने त्यास तू कोण कुठून आलास कोणाचा पुत्र आहेस हे विचारताच अर्जुन वदला.

" हे राजन मी पांडू आणि कुंती देवी यांचा तृतीय पुत्र धनंजय अर्थात अर्जुन आहे."

हे ऐकून राजा म्हणाला

"हे अर्जुन, या नगरात फार पूर्वी प्रभंजन नामक एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्यांस पुत्र नव्हता. अतः  पुत्र प्राप्ती हेतू त्यांनी घोर तपश्चर्या आरंभ केली. त्यांच्या त्या दृढ तपाने पिनाकधारी देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले. त्यांनी त्यास प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. राजा प्रभंजन यांनी पुत्राचा वर मागताच देवाधिदेव वदले, हे राजन तुझ्या कुळात एकच पुत्र होईल. या वरानुसार माझ्या सर्व पूर्वजांना एकच पुत्र होत गेला आणि तोच राज्याचा वारस होत गेला. परंतु मला एकच पुत्री झाली. ती पुत्री असूनही , मी तिला पुत्राप्रमाणेच वाढवली आहे. म्हणून हि माझा पुत्र आहे असेच मानले जाईल. अतः  तुझ्या पासून तिला जो पुत्र प्राप्त होईल तोच माझ्या राज्याचा वारस असेल. त्याचप्रमाणे त्याला येथेच राहून माझ्या पश्चात माझे राज्य पुढे न्यावे लागेल. म्हणून या शर्तीनुसारच मी तुम्हाला  माझी पुत्री अर्पण करू शकतो. "

अर्थातच अर्जुनाने ह्यास मान्यता दिली आणि त्याचा चित्रांगदेसमवेत विवाह संपन्न झाला. कालांतराने त्याना एक सुंदर पुत्र जन्माला आला. ज्याचं नाव बब्रूवाहन होतं. अर्जुन चिंत्रांगदे समवेत तीन वर्ष पर्यंत राहिला. तत्पश्चात आपल्या प्रायश्चित्ताचा  उर्वरित कालावधी पूर्ण करण्यासाठी चित्रांगदेची अनुमती घेऊन प्रस्थान करता झाला. परंतु जाताना अर्जुनाने चित्रांगदेला इंद्रप्रस्थास नेण्याचं वचन दिल आणि तेथून प्रस्थान केलं.

क्रमशः 

भाग ६ समाप्त 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
ll शुभम भवतू ll 
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...