सुभद्राहरण ८
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
वर्गा पुढे वदली.
"त्यांच्या तपसाधनेत व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने आम्ही हास्यविनोद व नृत्य करण्यास सुरुवात केली. परंतु हे महापराक्रमी अर्जुन, त्या तेजस्वी ब्राम्हणाने आपलं मन जराही विचलित होऊ न देता आपली साधना सुरू ठेवली. हे क्षत्रिय शिरोमणी, परंतु आमचं तपोभंगाच्या दुष्कृत्याने क्रोधीत होऊन त्या तेजस्वी तपस्वी ब्राम्हणाने आम्हाला शाप दिला की, तुम्ही शंभर वर्षापर्यंत जलात ग्राह होऊन विहार कराल. हे महापुरुष, त्या द्विजवराचे ते विद्युल्लतेसम उद्गार ऐकून आम्ही अत्यंत दुःखी झालो.
आपल्या तप आणि धर्मकार्यापासून तसूभरदेखील न ढळणाऱ्या त्या विप्रवराच्या चरणी आम्ही शिश ठेवून अत्यंत पाश्चातापदग्ध अंतःकरणाने आम्ही त्याला वदलो. हे तपोनिधान, आम्ही सौन्दर्य, काम आणि वासना यामध्ये उन्मत्त होऊन हे कृत्य करण्यास धजावलो. परंतु आम्ही आपल्यासारख्या ज्ञानी आणि तपस्वी विप्रवराचा तपोभंग करण्यास्तव येथे उतरलो हेच मुळात आमच्या अधःपतानाचं कारण आहे व परिणामदेखील.
आपण कृपाळू अंतःकरणाने आम्हाला क्षमा करावी. हे धर्मात्मा, शास्त्रात स्त्रिया अवध्य आहेत असं सांगितलं आहे. म्हणूनच आपल्या धर्मकार्याची प्रगती निरंतर होवो, त्यात आम्हाला आपण दिलेल्या या शापाने गतिरोध निर्माण करू नये. आपण ज्ञानी आहात आणि ज्ञानी पुरुष सर्व प्राणीमात्रांशी दयाभावयुक्त अंतःकरणाने व्यवहार करतात. हे तपोधन, श्रेष्ठ पुरुष शरणागताला क्षमा करतात. अतः आपण आमच्या प्रमादांना क्षमा करावी अशी आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो.
वर्गाच्या त्या पश्चातापयुक्त स्वरांनी आणि कथनाने विप्रवर क्रोधातून बाहेर आले. तिच्याकडे अत्यंत कृपाशील आणि दयायुक्त नजरेने पाहून म्हणाले. हे स्त्री मी शत वर्ष म्हणालो ते वास्तविक शत वर्षच आहे अनंत वर्षांचं प्रतीक नाही. आपण जलात शत वर्ष विहाराला येणाऱ्या प्राणिमंत्रांना ग्राह म्हणून भक्ष करत असताना, शत वर्षांनंतर एक श्रेष्ठ पुरुष तुम्हाला या जलाबाहेर काढताच तुम्हाला तुमचं हे दिव्य स्वरूप पुनःप्राप्त होईल. तुमच्या उद्धारानंतर ती तीर्थे नारीतीर्थे म्हणून प्रसिद्ध होतील आणि हजारो प्राणीमात्र त्यात स्नान करून परमपावन अनुभूती प्राप्त करतील.
त्या विप्रवराला प्रदक्षिणा घालून अत्यंत दुःखी अंतःकरणाने आम्ही तिथून निघालो आणि विचार करू लागलो की, आम्ही ग्राह बनून कोणत्या जलात राहू शकतो , जेणेकरून लवकरच त्या स्थानी एक श्रेष्ठ पुरुष येऊन आमची या शापातून मुक्तता करेल. आम्ही याच विचारात असतानाच आम्हाला देवर्षी नारदांचं दर्शन झालं. त्यांना पाहून आम्हाला हर्ष झाला. त्यांच्या समोर जाऊन त्यांना शिशनमन करून आम्ही मान खाली घालून तश्याच उभ्या राहिलो. देवर्षींनी आम्हाला आमच्या दुःखाचं कारण विचारताच आम्ही त्यांना सर्व वृत्तांत कथन केला आणि काही मार्ग सुचवण्याची विनंती केली.
आमच्या चर्येवरील भाव आणि अंतःकरणातील पश्चाताप जाणून देवर्षी म्हणाले.
क्रमशः
भाग ८ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment