Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९१ (पाठवणी अर्थात विदायी)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९१ (पाठवणी अर्थात  विदायी)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
राजा हात जोडून कृष्णासमोर उभे राहून बोलणार वा बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत, परंतु त्याआधीच त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा प्रत्येक थेंब राजाराणीच्या भावना अत्यंत जड अंतःकरणाने श्रीकृष्णापुढे मांडत आहेत. प्रत्येक थेंबात खालील भाव व्यक्त होत आहे. वाचकजन परियेसा.(कारण लिहिणारा मी देखील एकाच मुलीचा बाप आहे आणि पुढील वर्षभरात माझ्याही कन्येचा विवाह करण्याचे प्रयोजन आहे. त्यामुळे राजा  भीमकाची मनःस्थिती मी नक्कीच जाणू आणि व्यक्त करू शकतो)

दिली कन्या दिले सर्व
आता काळीज जपावे
माझे सर्वस्व मी दिले
त्याला प्रेमे सांभाळावे

कष्ट काड कधी नाही
चार पुत्रांहून प्रिय ही
काही न्यून राहिल्यास
तिला प्रेमाने सांगावे
माझे सर्वस्व मी दिले
त्याला प्रेमे सांभाळावे

अंगणात खेळली ती
 बालपण जपले मी
आईविण आता जायी
माता देवकी जपावे
माझे सर्वस्व मी दिले
त्याला प्रेमे सांभाळावे

माया करेल सर्वांना
आपलं मानेल ज्यांना
प्रेमपूर्वक ती जपेल
बोल आमुचे मानावे
माझे सर्वस्व मी दिले
त्याला प्रेमे सांभाळावे

पित्यासम वसुदेव
माता देवकीसमान
मायाबापांना याहून
लेकीसाठी काय हवे
माझे सर्वस्व मी दिले
त्याला प्रेमे सांभाळावे

ज्येष्ठ बंधुसम बलराम
रेवतीदेवी भावजय
बहिणीहुन माया तीज
सुभद्रा देई हे पहावे
माझे सर्वस्व मी दिले
त्याला प्रेमे सांभाळावे

चिंता कसलीच नाही
वरला हो श्रीपती
पूर्ण ब्रह्मांडाचे सुख
तीज मिळे मना ठावे
माझे सर्वस्व मी दिले
त्याला प्रेमे सांभाळावे

काय सांगू मी अजून
जगजेठीच्या हृदयात
जिस मिळाले स्थान
बापा अजून काय हवे
माझे सर्वस्व मी दिले
त्याला प्रेमे सांभाळावे

साश्रु नयनांनी राजा राणी कृष्णासमोर उभे आहेत. अश्रूंमधून सर्व भाव व्यक्त झालाय. प्रत्यक्ष कृष्ण ज्याचा जामात त्याला म्हटलं तर चिंता काहीच नाही.परंतु पोटच्या लेकीला सासरी पाठवताना सर्व लहानपणापासूनचं चित्र राजा राणीच्या डोळ्यासमोर उभं आहे. राजवाड्यात लाडाकोडात वाढलेली आपली लेक आज नववधुचा साज लेऊन समोर पतीसोबत उभी आहे.  काय बोलावं आणि किती याचा  बोध न झाल्यामुळे फक्त अश्रू ढाळत तीन जण उभे आहेत राजा राणी आणि अर्थात रुक्मिणी.

श्रीकृष्णाला या परिस्थितीचा अंदाज येतो. कृष्ण पुढे येऊन राजाचा हात हातात घेतो आणि म्हणतो

" हे राजन , आपली मनःस्थिती मी समजू शकतो.  परंतु समस्त राजपरिवार आणि यादवजन यांच्या वतीने मी पूर्ण खात्रीपूर्वक सांगतो की, घरी एका कन्येसम व घराबाहेर माझी अर्धांगी म्हणून व शक्तिशाली साम्राज्याची सम्राज्ञी म्हणून तिला प्रेम, माया, आदर, सन्मान सर्वकाही मिळेल. आपण दोघेही निश्चीन्त असावे." 

रुक्मिणी आपल्या आईला मिठी मारून स्फुंदून स्फुंदून व हमसून हमसून रडत आहे. अर्थातच राणी आणि राजादेखील साश्रु आहेत. राजा राणीच्या खांद्यावर हात ठेवून आठवण करून देतो. राणी आपले अश्रू पुसते. रुक्मिणीला एकवार  बघून  तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, तिचे अश्रू पुसते आणि कृष्णाला हात जोडून मनातील भाव व्यक्त करते. कृष्ण देखील हात जोडून  नजरेतून त्यांना आश्वस्त करतो. 

दोघेही कृष्ण रुक्मिणी राजा राणी आणि चारही बंधूंच्या पाया पडतात. रुक्मिणी आपल्या सख्यांच्या गळ्यात पडून साश्रु नयनांनी त्यांचा निरोप घेते. अर्थातच तिची सर्वात लाडकी एक सखी पाठराखीण म्हणून सोबत जाणार आहे.त्यामुळे तिला दुःखापेक्षा काही काळ तरी रुक्मिणीसोबत काढायला मिळेल याचाच आनंद आहे. वसुदेव पुढे येऊन राजा भीमकाला हात जोडून म्हणतात.

"अत्यंत कमी वेळात इतकं उत्तम कार्य आपण उभं केलंत. कुठेही  नाव ठेवायला जागा नाही. आपल्यासारख्या सत्शील, सुशील, विवेकी, शालीन घराण्याशी योग जुळून आला हे आमचं सदभाग्य. आपण करून दिलेल्या कार्याबाबत आमची काही देखील तक्रार नाही, खात्री  बाळगा. आपली कन्या रुक्मिणी ही आम्हा उभयतांना कन्येसम आहे, निश्चीन्त रहा.  आपण आमच्या सोबत येऊन द्वारकेत पाहुणचार घेऊन मग कौंडिण्यपुरास प्रस्थान केले असतेत तर उत्तम योग आला असता. नव्हे तसे मी आपणास आमंत्रणच देतो." 

राजा लगेच हात जोडून म्हणतात

" हे धीरगंभीर सुशील वसुदेव महाराज, आपल्या कुळात कन्येला देऊन आम्ही खरच  निश्चीन्त आहोत. आपण तिला लेकीसमान मानाल यात कोणतीही शंका नाही. आपलं आमंत्रण मात्र मी जरूर स्वीकारतो परंतु माझ्या लेकीला पुत्ररत्न प्राप्त झालं की त्वरित येईन मी. तोपर्यंत आपल्या गृही जलग्रहण देखील वर्ज्य आहे. क्षमा असावी."

वसुदेव अर्थातच राजाच्या विनंतीचा स्वीकार करतात आणि वऱ्हाडाकडे पाहून प्रस्थान ठेवण्याची आज्ञा देतात. त्याबरोबर ढोल,ताशे,  नगारे, वाजंत्री यांचा लयबद्ध नाद आणि त्या तालावर यादवांचा जल्लोष सुरू होतो. वरातीला  सुरवात होते. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०५/०३/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...