Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९२ (कृष्णरुक्मिणीची वरात)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९२ (कृष्णरुक्मिणीची वरात)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
वसुदेव अर्थातच राजाच्या विनंतीचा स्वीकार करतात आणि वऱ्हाडाकडे पाहून प्रस्थान ठेवण्याची आज्ञा देतात. त्याबरोबर ढोल,ताशे,  नगारे, वाजंत्री यांचा लयबद्ध नाद आणि त्या तालावर यादवांचा जल्लोष सुरू होतो. वरातीला  सुरवात होते. सर्वांचा , मोठ्या जड अंतःकरणाने निरोप घेऊन  राजा भीमक, राणी शुद्धमती आणि कौंडिण्यपूर वासी प्रस्थान करतात. 

गजाच्या पाठीवर सजलेल्या नक्षीदार सोन्याच्या अंबारीत कृष्णरुक्मिणी बसले. माता देवकी व पिता वसुदेव, ज्येष्ठ बंधू श्रीबलराम व रेवतीदेवी आणि लाडकी भगिनी सुभद्रा हे देखील हत्तीवर बसले आहेत. आजूबाजूला यादवांच्या रथाचे कडे आहे आणि बाकीचे समस्त यादववीर नरनारी सजून नटून शृंगारून ढोल ताशाच्या गजरात, तालात नृत्य करत हास्यविनोद करत आपल्या लाडक्या कृष्णाला तितकीच लाडकी आणि सुंदर, सुशील, गुणसंपन्न अर्धांगी अर्थात राणी रुक्मिणीदेवी यांना बघत बघत, आनंदात , धुंदीत नादात द्वारकेकडे  निघाले आहेत.

ही कृष्णरुक्मिणीची वरात  बघायला नारद, यक्ष, गंधर्व , अप्सरा, किन्नर, अष्टवसु, स्वतः सूर्यनारायण, इंद्रादी देव उपस्थित आहेत. ब्रम्हाजी, श्रीउमामहेश्वर हे सर्व स्वर्गातून, आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. नानाविध रंगांच्या गुलालांची मुक्त उधळण सुरू आहे. तो सर्वरंगांचा गुलाल पार आकाशापर्यंत पोचला आहे, इतका की,  देवांनी आकाशातून केलेल्या पुष्पवृष्टीतील पुष्पे देखील त्या सप्तरंगी गुलालाच्या रंगात रंगूनच येत होती. वाद्यांचा आवाज तर प्रत्यक्ष पंच नव्हे तर शंभर कोस दूरच्या राज्यात नगरात व गावागावात पोचत होता. जणू संपूर्ण ब्रह्मांडाला माहीत व्हावं की ही वरात कृष्णरुक्मिणीची आहे.

वरात निघायची वार्ता अर्थातच दूतांकडून द्वारका नगरीत पोचली आणि सर्वत्र उत्सवाची धांदल , धमाल, उत्साह, जल्लोष यांनी वातावरण  बेहोष करून टाकलं. घरोघरी रंगरांगोळ्या ,गुढयातोरणं , चौका चौकात रांगोळ्या, पताका, ध्वजा उभारण्याचा सपाटा लागला. द्वाराकवासीयांना हा आनंद कसा आणि कोणत्या प्रकाराने साजरा करावा हेच सुचनासं झालं होतं. खास ठेवणीतले आणि परीटघडीचे पोशाख मंडळींनी काढून परिधान करायला सुरुवात केली होती. 

सर्वत्र पुष्परचनांची सजावट , केशर कस्तुरी यांची उधळण आणि त्यांचा दरवळणारा सुवास, गुलाब जाई जुई शेवंती मोगरा यांच्या गंधाने युक्त जलाचा शिडकावा करून या भरलेल्या वातावरणाला अजून बेधुंद करण्याचा प्रयत्न चालू होता. चौकाचौकात कमानी उभारून त्यावर तऱ्हेतऱ्हेचे सजावटी , पुष्परचना उभारणी सुरू होती. मुख्य मुख्य चौकात मोठमोठे जलकुंभ ठेवून त्यात सुगंधित जल आणि सुगंधित फुलं ठेवून आकर्षक आरास आणि सुगंधित वातावरण निर्मिती करण्यात येत होती. नगराच्या प्रवेशद्वारापाशी राजप्रसादातील काही मंडळी नवदाम्पत्याच्या स्वागताला सज्ज होती, तर बाकीचे प्रासाद सजून, नटून, शृंगारून कृष्ण रुक्मिणीची प्रतीक्षा करत सज्ज होतं.

नगराचे मुख्य मार्ग जेथून ही वरात जाणार होती  त्या सर्व रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी पुष्पमाळा , पुष्प , कुंकूम, अक्षता हातात घेऊन प्रचंड गर्दी केली होती.  इतकी गर्दी एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी द्वाराकेने क्वचितच पहिली होती. रस्त्यावर मुख्य मुख्य ठिकाणी दोन्ही बाजूला  हत्तीवर पुष्पे कुंकूम आणि अक्षता घेऊन मंडळी बसली होती, आपल्या लाडक्या कृष्णरुक्मिणीवर पुष्पे, कुंकूम अक्षता आदींची  बरसात करण्यासाठी.  वरात द्वारकेसमीप आल्याची वार्ता आली, नगरजनांचा उत्साह शिगेला पोचला.

आता वरात नगरात शिरण्याचा अवकाश होता. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०६/०३/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...