श्रीरुक्मिणी स्वयंवर ८९ (विवाहसोहळा १७) (प्रसंग सतरावा समाप्त)
llश्रीगणेशाय नमःll
llश्रीमुकुंदाय नमःll llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll
llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
आता आजचा दिवस हा नृत्याचा दिवस होता. सर्वजण आवरून सावरून सभामंडपी जमले. दोन्हीकडची मंडळी जमली. एकमेकांना आग्रह करून बोलावून नाचवू लागले. एखाद्याचं नृत्य आवडलं तर पुनः पुनः आग्रह करून मंडळी नाच करण्यास भाग पाडत होती. ताल धरून, फेर धरून, रिंगण करून, फुगड्या घालून नाच होऊ लागले.
यादवांकडे तर नृत्यामध्ये पुरुषमंडळी स्त्रियांपेक्षा बहारदार नृत्य करण्यात तरबेज होते. कारण वृंदावनी तासनतास कृष्ण राधा आणि गोप गोपी यांना नृत्य करण्याची आवड आणि सवड होती. त्यामुळे यादवांची पुरुष मंडळी सुद्धा जोड्या जोड्या करून मृदंग ढोल यांच्या तालावर ठेक्यावर सुंदर नृत्य करत होती.
यादवांची मंडळी बराच वेळ नृत्य करून झाल्यावर कौंडिण्य पूरवासीयांना चिडवून दाखवत होती, अर्थात नाचासाठी आव्हान देत होती. हे आव्हान अर्थातच कौंडिण्यपूरवासीय स्वीकारणार नाहीत तरच नवल. अर्थातच त्यांनीही स्त्रीया व पुरुष यांनी आपलं नृत्यातील कसब दाखवून यादवांना थक्क केलं. म्हणजेच रुक्मिणीचा मान राखला आणि आपली कला देखील दाखवून दिली.
आता जोड्या जोड्या अर्थात स्त्री पुरुष यांनी नृत्य करून उत्तम पदलालित्य दाखवून प्रचलित उत्तम उत्तम नृत्यप्रकार करण्यास सुरवात केली. यात फुगडी ,रासक्रीडा असे अनेक नृत्याचे प्रकार जोडी जोडीने करण्यात आले. यानंतर आपापल्या अर्धांगिला खांद्यावर घेऊन नाच करण्याचा प्रकार (ज्याला नोवरी नाचावणे असं प्रचलित काळात म्हणत असावेत) सुरू झाला.
ज्यांना आपल्या पत्नीला खांद्यावर उचलून नृत्य करणं शक्य होतं, तीच मंडळी पुढे येऊन नाचू लागली. अर्थात यात खांद्यावरील भार, ताल ठेका आणि पदलालित्य हे सर्व सांभाळून नृत्य करणं आवश्यक होतं. अर्थात दोन्हीकडील अनेक जोड्यांनी यात विविध ठेक्यांवर सुंदर पदलालित्य दाखवत व खांद्यावरील भार सांभाळून नृत्य केलं. सरतेशेवटी अर्थातच सर्वांनी कृष्णाला रुक्मिणीस खांद्यावर घेऊन नृत्य करण्याचा आग्रह केला. कृष्णाने आधी एकट्याने नन्तर जोडीने आणि सर्वात शेवटी रुक्मिणीला खांद्यावर घेऊन अत्युत्तम नृत्य करून सर्वांना अनोखा आनंद दिला. याचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.
यानंतर आपापल्या कुलदेवतेच्या पालख्या वा तळी घेऊन नाचवण्याचा कार्यक्रम झाला. यात अनेकांनी भाग घेतला,जे आतापर्यंतच्या नृत्यात सहभागी झाले नव्हते. या कार्यक्रमात प्रत्येक जण आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून तिची महती गाऊन तिला आठवून, आळवून सुंदर नृत्य करत होतं. जवळजवळ संपूर्ण दिवसभर हा नृत्य गायन कार्यक्रम सुरू होता.
या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज यांच्या कृपेने सप्तमदश प्रसंग समाप्त होत आहे. पुढे प्रसंग अष्टमदश
क्रमशः
ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम् वंदे जगतगुरुं ll
© ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०३/०३/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment