सुभद्राहरण ३
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
त्यांना श्रीब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर मागायला सांगितला.त्यांनी श्रीब्रह्मदेवांना अमरत्वाचा वर मागितला. ज्यावर श्रीब्रह्मदेव म्हणाले कि, हा वर देण्याचा अधिकार मला नाह. परंतु तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम पाहून मी हा वर देऊ शकेन कि तुम्हाला तुमच्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणतीही शक्ती मारू शकणार नाही. अर्थातच दोघांचा एकमेकांवर विश्वास इतका दृढ होता कि, त्यांना खात्री होती, कि त्या दोघांच्यात कधीही तंटा वा युद्ध होऊच शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी श्रीब्रह्मदेवांना त्वरीत होकार देत त्या वरदानाचा सहर्ष स्वीकार केला आणि श्रीब्रह्मदेवांना नमस्कार करत. भूलोकी परत आले. भूलोकी परत येताच त्यांनी समस्त पृथ्वी आपल्या अत्याचाराने व्यापून टाकली. अर्थात पूर्ण पृथ्वीवर अधिराज्य प्रस्थापित केल्यापश्चात त्यांनी आपला मोर्चा देवेंद्राचा स्वर्ग जिंकण्याची प्रतिज्ञा केली.
हि वार्ता देवांच्या कानावर जाताच सारे देव भयभीत होऊन ब्रह्मलोकी श्रीब्रह्मदेवांच्या समोर येऊन उपस्थित झाले. श्रीब्रह्मदेवानी त्यांना येण्याचं प्रयोजन विचारतात, त्यांनी सुंद आणि उपसुंद या दैत्यांनी पार्थिवर त्राही करून आता स्वर्गलोकी आक्रमण करण्याचं योजिलें आहे हे कथन करून यातून स्वर्गलोकासह पृथ्वीलोकाची सुटका करण्याची विनंती श्रीब्रह्मदेवांना केली. श्रीब्रह्मदेवानी विचार करून एक अत्यंत रूपावर अशी सौन्दर्यवती अर्थात अप्सरा निर्माण केली. जिच्या सौन्दर्याने प्रत्यक्ष तिथे उपस्थित असलेले देवही मोहित झाले. तीच नाव ब्रह्मदेवांनी तिलोत्तमा ठेवून, तिला पृथ्वीवर सुंद आणि उपसुंद यांच्या समक्ष जाण्याची आज्ञा केली.
अर्थात तिलोत्तमा श्रीब्रह्मदेवांना प्रणाम करून सुंद आणि उपसुंद या दैत्यांच्या समोर प्रकट झाली. दोघेही तिला पाहून मोहित आणि अनियंत्रित झाले. असं सौन्दर्य त्यांनी पृथ्वीवर आजपर्यंत पाहिलं नव्हतं. तिला पाहून सुंद उपसुंदाला म्हणाला.
"हे उपसुंदा मी तुझ्यापेक्षा वयाने वडील असल्याकारणाने हीच उपभोग प्रथम मी घेणार. "
यावर उपसुंद त्वरेने आपली गदा हातात घेऊन म्हणाला कि,
"याचा निर्णय आपल्या युद्धानंतर या सौन्दर्यवातीलाच घेऊ देत. "
उपसुंदाचं आव्हान अर्थात सुंदाने स्वीकारले आणि दोघांच्यात अत्यंत घनघोर युद्ध आरंभ जाहले. अनेक वर्षेपर्यंत हे युद्ध चालले. दोघांपैकी कोणीही हार मानायला तयार नव्हतं कारण दोघांची तिलोत्तमानसोबत उपभोग घेण्याची वासना तीव्र असल्यामुळे आणि स्वतःवरील शक्तीचा गर्व असल्यामुळे. या युद्धाचा शेवट अर्थातच दोघांच्याही मृत्यूत झाला आणि जगाला या दोन महाभयंकर असुरांच्या अत्याचारातून मुक्तता मिळाली. परंतु यातील मुख्य सार हे कि, यांच्यात एका स्त्रीपायी तंटा उभा राहून पर्यवसान मृत्यूत झाले. तसे तुमच्यात होऊ नये म्हणून एक नियम सांगतो तो प्राणपणाने पाळा हि माझी आज्ञा राहील. "
धर्मराज वदतो.
" महायोगीराज ब्रम्हर्षी आपण निश्चिन्त असा. आपण ठरवून दिलेला नियम आम्ही प्राणपणानेच पाळू. "
धर्मराजाच्या आश्वासनानंतर समाधानी देवर्षी नारद पुढे कथन करतात.
" तर आपण प्रत्येकाने दोनमास बारा दिनापर्यंत द्रौपदीसमवेत व्यतीत करावे. एक बंधू द्रूपदीसमवेत एकांतात असताना इतर बंधूंनी त्याठिकाणी जाऊ नये. हा नियम मोडणाऱ्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्या बंधूने बारा वर्षपर्यन्त अर्थात एक तप ब्रह्मचर्याचे पालन करावे. हा नियम वा प्रायश्चित्त न मानणाऱ्याला मी शाप देईन हे विशेष ध्यानात ठेवावे. "
पाचही बंधूंनी देवर्षी नारदांना चरणवंदन करून त्यांच्या आज्ञा अनुसारच वर्तन ठेवून प्रमाद घडल्यास प्रायश्चित्त घेण्याचं वचन दिलं . अर्थातच मुनीराज संतुष्ट अंतःकरणाने अंतर्धान पावले. देवर्षींच्या आदेशानुसार पाचही बंधू द्रौपदी समवेत नियमानुसार प्रतिबद्ध राहून वर्तन करत होते. अतः सर्व यथास्थित चाललं होतं . एकेदिवशी खांडवप्रस्थातील एक विप्रवर इंद्रप्रस्थातील राजप्रासादात धावत धावत येऊन चारही बंधूंसमीप उभा राहिला. अर्थात ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर द्रूपदीसमवेत एकांतवासात होते. विप्रवराला धीर देऊन कुंतीपुत्र अर्जुन त्याला आश्वस्त करत म्हणाला
" हे द्विज आपली जी समस्या असेल ती निःसंकोच मनाने आणि निर्भयतेने आपण आमच्या समक्ष मांडावी. हे धर्मराज युधिष्ठिर यांचं राज्य आहे आपल्याला निश्चित न्याय मिळेल व आपल्या समस्येचे निवारण होईल."
आश्वस्त झालेला द्विजवर अर्जुनास म्हणाला.
क्रमशः
भाग ३ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment