Skip to main content

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९५ (कथासमाप्ती)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९५ (कथासमाप्ती)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
संपूर्ण द्वारकेला आपल्या नवपरिणीत वधूला प्रदक्षिणा करवून आणि जनसामान्यांना संतोष देववून, श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणी प्रसादात परतले. यथावकाश देवी रुक्मिणी द्वारकेच्या प्रसादाशी आणि द्वारकेसह द्वारकावासियासी समरस झाल्या. मूळ राजरूधीर असल्यामुळे द्वारकेतील रीतिरिवाज, चालीरीती, कुलधर्म, कुलाचार शिकून घेण्यास आणि ते आत्मसात करण्यास  देवी रुक्मिणी यांना फार त्रास झाला नाही. पण मुख्य बाब अर्थातच कृष्णाचा स्वभाव. त्याचा वेध घेण्यात मात्र देवी रुक्मिणींना खूप त्रास झाला, तोदेखील आयुष्यभर. अर्थात त्यातही प्रेमाचा ओलावा असल्यामुळे देवींना कृष्णाच्या नटखट स्वभाव देखील भावला. त्या आपल्या संसारी रममाण झाल्या. 
श्रीव्यासमुनींनी जे कथन केले श्रीमहाभारतात त्यातील श्रीरुक्मिणीहरण अर्थात श्रीरुक्मिणीस्वयंवर हा रोचक कथाभाग श्रीरुक्मिणीला कृष्णाची , कथा कीर्तनकार बुवांकडून झालेली ओळख, तीची  त्यावर जडलेली प्रीत आणि तिने त्याला वाहिलेले आपलं मन, ज्येष्ठ बंधू रुक्मि याने निर्माण केलेल्या पेच , रुक्मिणीची दुविधा स्थिती त्यावर तिने पत्ररूपात कृष्णाला पाठवलेली पत्रिका, कृष्णाचा त्या आमंत्रणाचा स्वीकार , त्यांचं कौंडिण्यपूर नगरीत आगमन, श्रीरुक्मिणीचं कृष्णाने केलेलं हरण, तदनंतर जरासंध आणि त्याच्या महासेनेसोबत दादा श्री बलराम आणि यादववीरांचं युद्ध, जरासंधाचा दारुण पराभव आणि रणांगणातून पळ, रुक्मिचं कृष्णाशी द्वंद्व, कृष्णाकडून रुक्मिचा मानहानीकारक पराभव आणि रुक्मिणीच्या विनवणीवर जीवदान देऊन त्याची केलेली विटंबना, कृष्ण रुक्मिणी आणि यादवांचं प्रभास क्षेत्री मूळमाधव येथे आगमन, त्यापाठोपाठ राजा भीमक आणि राणी शुद्धमती यांचं मूळमाधव ग्रामी आगमन, कृष्णाच्या विधिपूर्वक विवाहाचा प्रस्ताव, दादांची  त्याला  अनुमती , त्यापश्चात द्वारकावासीयांचं मूळमाधव येथे जल्लोषात आगमन, कृष्ण रुक्मिणीच्या विवाहाच्या सोहळ्याचा कथाभाग, वऱ्हाड आणि वरतीचं द्वारकेत नाचत गात आगमन, त्यांचं द्वारकेत हर्ष आणि उल्हासात स्वागत आणि कृष्ण रुक्मिणी यांच्या संसाराची यशस्वी सुरवात. इथं पर्यंतचा कथाभाग जो मूळ श्रीएकनाथ महाराजांनी त्यांच्या श्रीरुक्मिणीस्वयंवर या ग्रंथात अठरा अध्यायात एकूण १७०८ ओव्यामध्ये अध्यात्माच्या परिभाषेत वाराणसीपुरी  मनकर्णिकेच्या तीरी श्रीरामजयंतीच्या पावन दिनी लिहून पूर्ण केला. 
त्याच कथेचा आधार घेऊन तोच कथाभाग जो श्रीएकनाथ महाराजांनी पद्यात काव्यमय भाषेत सांगितला, तोच मी गद्यात प्रसाद म्हणून मांडून वाचकांसाठी मांडला. वाचकांनी तो प्रसाद श्रद्धायुक्त अंतःकरणाने ग्रहण केला. हेतू साध्य झाला. हा पूर्ण ९५ लेखांचा प्रवास खडतर होताच पण मला व्यक्तिगत आयुष्यात देखील बरच काही शिकवून गेला, प्रगल्भ करून गेला. याच प्रगल्भतेचा उपयोग मला पुढील लिखाणात होईल याबद्दल मला शंका नाही.  मला यातील सर्वात आश्चर्यकारक वाटलेला भाग म्हणजे कृष्णरुक्मिणीच्या विवाहाचे माझ्याकडून लिहिले गेलेले १८ भाग, हा या सर्वांचा कळस होता.
सर्वात शेवटी, श्रीगजानन, देवी शारदा, श्रीज्ञानेश्वर माऊली , गुरुवर्य श्री जनार्दन स्वामी स्वतः श्रीएकनाथ महाराज माझे गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि माझे वाचक या सर्वांच्या कृपाशीर्वादाने श्रीरुक्मिणीस्वयंवर हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्परुपी अर्थात शिवधनुष्य पेलून सुफळ संपूर्ण होऊ शकलं . मी या सर्वांचा कायम ऋणी राहीन.  अशीच अध्यात्माची, साहित्याची आणि भारतीय सनातन संस्कृतीची सेवा करण्याची संधी वारंवार मिळो हीच सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरणी प्रार्थना व विनंती.

पुढील कथा अर्थात  सुभद्राहरण, गुढीपाडव्यापासून सुरू करण्याचा मानस आहे ,भगवंताची कृपा आणि आपला आशिर्वाद असाच राहूदे, हीच प्रार्थना !!!!! कळावे लोभ असावा.

समाप्ती !!!

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१०/०३/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...