वाचण्यात आलेली रामायणातील हिंदी कथा माझ्या शब्दात आणि शैलीत मराठीत स्वैर अनुवादित !!
इंद्रजिताच्या शक्तीअस्त्राचा परिणाम होऊन भ्राता लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडले आहेत. प्रभू स्वतःच्या मांडीवर लक्ष्मणाचं मस्तक ठेवून विलाप करत बसले आहेत. हनुमंत विभीषणाच्या सांगण्यावरून वैद्यराज सुशेण याना ते झोपलेल्या पलंगासह घेऊन येतो. वैद्यराजाना जागं करून विभीषण परिस्थिती कथन करून लक्ष्मणाचा जीव वाचवण्याची विनंती करतात. . वैद्यराज लक्ष्मणाची नाडीपरिक्षा करून प्रभुंकडे हात जोडून पाहतात आणि म्हणतात
" हे श्रीराम लक्ष्मणाला वाचवण्याचा एकच उपाय आहे हिमालयात संजीवनी नावाची वनस्पती आहे तिचा पाला काढून त्याचा काढा करून तो जर लक्ष्मणाला दिला तर त्याचा जीव वाचू शकेल. तेदेखील सूर्योदयाच्या आत, अन्यथा...... "
वैद्यराजांचे हे शब्द एखाद्या तीराप्रमाणे प्रभूंच्या हृदयात घुसले. नेहमी अविचल असणारे प्रभू एक क्षण विचलित होतात . विभीषण आणि सुग्रीव यांनी प्रभुना धीर दिला. बंधू विरहात व्यथित झालेले प्रभू क्षणात अश्रू ढाळू लागले. प्रत्यक्ष प्रभुना अश्रू ढाळताना पाहून हनुमंत अत्यंत कष्टी झाला. त्याने विचार केला एक क्षण आणि प्रभू चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला
" हे स्वामी हा दास जिवंत असताना जर आपल्याला अश्रू ढाळावे लागत असतील तर माझ्या जगण्याला कडीइतकीही किंमत नाही. आपण त्वरित हे मस्तक धडावेगळं करावं, क्षणाचाही विलंब न करता"
हनुमंताचे हे तिखट शब्द प्रभुना भाला टोचावा तसे बोचले. प्रभू हनुमंताला उठवून म्हणाले.
" हे वत्स , लक्ष्मण जर माझं हृदय आहे तर तू प्राण आहेस, तुंही जर नसशील तर मी एकट्याने काय करावं हा विचार केलास."
" प्रभू चूक झाली क्षमा असावी. पण मी असताना आपण अश्रू ढाळावेत, हे मला दास म्हणून लांच्छनास्पद आहे. आपण आज्ञा द्यावी आणि मी कार्य पूर्ण करावं, इतकंच माझं मागणं आहे."
हनुमंताचं कथन ऐकून सुग्रीवदेखील मधेच वदतो
" हे स्वामी, अंतर्यामी, हनुमंत हिमालयात जाऊन ती औषधी वनस्पती घेऊन सहजी परत येईल सूर्योदयाच्या आत"
भगवंत साश्रु नयनांनी हनुमंताकडे पाहून हात जोडून म्हणतात
" हे महावीर , महाशक्ती, महारुद्र हनुमंता, माझ्या लक्ष्मणाची प्राणज्योत तुझ्या हातात देतो मी. मला विश्वास आहे की ,तू नक्की हे महाकठीण कार्य पूर्ण करशील. "
हनुमंत आपले अश्रू पुसत आनंदाने प्रभूचरणी माथा टेकतो.
प्रभू म्हणतात
"यशस्वी भव"
हनुमंत प्रभुना हात जोडून पुनः वंदन करून एका हातात गदा उचलतो आणि वदतो "जय श्रीराम"
हनुमंत उड्डाण करून लंकेहून हिमालयात निघाला आहे. वाटेत अयोध्येजवळ नंदीग्राम येथे रामनामाचा जाप ऐकून हनुमंत क्षणिक उतरतो. हनुमंताला पाहून भरत आपलं चापबाण उचलतो. इतक्यात हात जोडून हनुमंत भरताला म्हणतो
" हे सहृदय , आपण ज्या प्रभूंच्या नामाचा जाप करीत आहात , त्यांचा मी सेवक, हनुमान."
भरत हात जोडून क्षमा मागतो आणि येण्याचं कारण विचारतो. हनुमंत सीता हरण आणि लक्ष्मणाच्या मूर्च्छित होण्यापर्यंतचं सर्व कथन करतो. तिथे उपस्थित असलेली कौसल्या माता वदते
" हे हनुमान, माझा रामाला संदेश दे की, माझ्या लक्ष्मणाशिवाय अयोध्येत पाऊलसुद्धा टाकू नकोस, वनातच राहा."
तिथे शेजारीच उभी असलेली माता सुमित्रा नम्रपणे म्हणते
" हे हनुमान, श्रीरामाला माझा संदेश आहे की, माझा अजून एक पुत्र शत्रुघ्न आहे त्याला मी धाडते, तुझ्या कार्यार्थ. कारण लक्ष्मण जर रामसेवेत कामी आला तरीही मला अभिमान असेलच, पण माझा द्वितीय पुत्रसुद्धा प्राणांची पर्वा न करता बंधुसेवार्थ हसत हसत प्राण अर्पण करेल."
प्रभू श्रीरामप्रति इतकं प्रेम पाहून हनुमंत आपले अश्रू लपवू शकत नाही. अर्थातच हे आनंदाश्रू आहेत. हनुमंत दोन्ही माता व भ्राता भरत यांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो. परंतु हे सर्व चालू असताना तिथे उपस्थित असलेली उर्मिला मात्र स्मितवदन पाहून हनुमंत आश्चर्याने हात जोडून विचारतो
"माते आपले पती तिथे मूर्च्छित आहेत आणि मी सूर्योदयापूर्वी पोहोचलो नाही तर त्यांची प्राणज्योत मालवेल हे ऐकूनसुद्धा आपण स्मित करत आहात, कारण समजेल का"
उर्मिला म्हणते
" हे हनुमान, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर प्रत्यक्ष श्रीराम यांचं मस्तक मांडीवर घेऊन बसले असतील तर काळाचीही हिम्मत नाही यांना हात लावायची. आपल्याला प्रचिती घ्यायची असेल तर आपण खुशाल काही दिवस येथे राहा, सूर्याची उदय होण्याची देखील हिम्मत होणार नाही, प्रत्यक्ष श्रीराम ज्यांना मांडीवर घेऊन बसलेत, त्यांना न्यायला यमराज येईल असं वाटलंच कसं आपल्याला.
माझे पती म्हणजे प्रत्यक्ष श्रीरामछबी आहेत, त्यांच्या , रोमारोमात, कणाकणात, श्वासात, रुधिराच्या प्रत्येक थेंबात श्रीरामच आहेत. आणि ज्याच्या अंतर्यामी श्रीराम आहेत त्यांना कळीकाळाची कसली भीती. उलट, मी जाणते की आज तेरा वर्ष माझे पती झोपले नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष प्रभूंच्या मांडीवर डोकं ठेवून ते काही काळ आपली निद्रा पूर्ण करत आहेत. कारण त्यांनाही खात्री आहे की, ज्या मांडीवर डोकं ठेवलंय ते आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत. आपण निश्चितपणे संजीवनी घेऊन जा. सूर्य आपल्यासाठी थांबेल."
देवी उर्मिलेची प्रभुंवर असलेली पराकोटीची भक्ती, प्रेम आणि निष्ठा पाहून हनुमान निःशब्द होतो आणि आपली भक्ती , प्रेम त्यांला खूजं वाटायला लागतं. आज तेरा वर्ष वेगळं राहूनही या लोकांची प्रभूंवरची निष्ठा तसूभरही ढळलेली नाही, हे पाहून हनुमंत हात जोडुन प्रणाम करतो. माता उर्मिलेच्या अपूर्व निष्ठेची प्रचिती सोबत घेऊन हनुमंत आपल्या कार्यार्थ उड्डाण करतो, म्हणतो
जय श्रीराम !!!!!🌷🌷🌷🌷
©® लेखन : प्रसन्न आठवले
०१/०२/२०२०
Comments
Post a Comment