Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ९४ (द्वारकेत हर्ष उल्हास)(उद्या कथासमाप्ती)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ९४(द्वारकेत हर्ष उल्हास) (उद्या कथासमाप्ती)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
रेवती देवीने तद्नंतर रुक्मिणीला पूर्ण राजप्रासाद दाखवून आपल्या महाली नेले.  समीप बसवून यादवकुळीच्या अनेक प्रथा, चालीरीती यांची खडानखडा माहिती दिली. कोणतं कार्य, कोणते सणवार , कोणती व्रतवैकल्ये आहेत, त्यांच्या काय काय कथा आहेत, काय काय करावं लागतं, काय काय गोष्टी पिता श्रीवसुदेव, माता देवकी, दिर श्रीबलराम व श्रीकृष्ण यांना आवडत नाहीत व ज्या टाळल्या अथवा वर्जिल्या पाहिजेत त्याची पण पूर्ण माहिती देऊन त्या तिला स्मरतील याची काळजी घेतली. 

दोघांची लाडकी व एकमेव बहीण सुभद्रा हिचं घरातील स्थान आणि तिचे स्वभाववैशिष्ट्ये याबद्दल देखील सविस्तर माहिती देऊन विशेष काळजी घेण्याची सूचना केली. घराण्याचे कुलगुरू व आचार्य यांची माहिती देखील तिला करून दिली. घरातील सेवक व सेविका यांच्याशी तिची ओळख करून देतानाच प्रत्येक सेवक व सेविकेला आणि त्यांच्या कुटूंबाला विवाहाप्रीत्यर्थ  धनधान्य, वस्त्र अलंकार व इतर भेटवस्तूनी सन्मानित केलं. 

सर्वात शेवटी अर्थातच कृष्णाबद्दल खास माहिती, विशेषतः त्याला आवडत नसलेल्या गोष्टी व विशेष आवडत असलेल्या गोष्टी, त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्ये याची देखील सखोल माहिती रेवतीने रुक्मिणीला करून दिली. त्याला न आवडणाऱ्या व कटाक्षाने टाळाव्यात अश्या गोष्टी विशेष करून ध्यानात ठेवण्यास बजावले.  अर्थातच या सर्व गोष्टींची तिला माहिती देताना सोबत अर्थातच ज्येष्ठ भ्राता श्रीबलराम उपस्थित होते. त्यांनीही तिला आश्वस्त केले की, काहीही अडचण आल्यास निःसंकोचपणे त्यांना स्वतःला वा रेवतीदेवीना सांगावे म्हणजे ते नक्कीच उचित सहाय्यता करू शकतील वा करतील. 

तद्नंतर कृष्ण रुक्मिणी , बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या व उत्सवाची तयारी करून सज्ज असलेल्या द्वारकाविसीयांना भेटावयास रथारूढ होऊन निघाले. राजप्रसादाबाहेरच जन समुदाय आपल्या लाडक्या कृष्ण व देवी रुक्मिणी यांना पहावयास व त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यास अधीर होता. कृष्णरुक्मिणी यांचा रथ राजप्रासदाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आल्याबरोबर, इतका वेळ शांत व संयमाने तिष्ठत उभे असलेले जन अर्थात हजारो नरनारी, ढोल , ताशे, झांज , मृदंग, मंजिरे यांच्या तालावर बेहोष ,बेधुंद होऊन जल्लोषात नृत्य करू लागले. 

अर्थातच त्याच नृत्यगायनादी जल्लोषाच्या वातावरणात आणि त्याच नादात त्याच मार्गाने कृष्ण रुक्मिणी सर्वांना प्रणाम करत, सर्वांच्या अभिनंदनाचा सहर्ष स्वीकार करत, त्याला तितकाच उत्साहात प्रतिसाद देत, गळ्यात , रथात पडत असलेले पुष्पहार, माळा, अक्षता यांचा स्वीकार करत, लोकांच्या प्रेमाचा स्नेहाचा आदरपूर्वक स्वीकार करत करत मार्गस्थ होत होते. जवळजवळ संपूर्ण दिवस आणि मध्यरात्रीपर्यंत हा जल्लोष, उत्साह व चैतन्याचा समारोह वा प्रगटीकरण सुरूच होतं. मध्यरात्र उलटून गेल्यावर वा उत्तरारात्र सुरू होताना कृष्णरुक्मिणीचा रथ राजप्रासादी पोहोचला. अर्थातच राजप्रसादात पुन्हा त्यांचं स्वागत होऊन, सर्व सेवक सेविका  दुसऱ्या दिवशीच्या पूजेच्या तयारीला लागले. 

वाचकजनहो येथपर्यंत विस्ताराने श्रीरुक्मिणीस्वयंवर कथाभाग आपल्यापर्यंत , श्रीजनार्दन स्वामी, श्रीएकनाथ महाराज,माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपा प्रसादाने, परंतु माझ्या अल्पमतीने मी सादर करण्याचा प्रयत्न केला. आपण तो वाचून त्याला उचित प्रतिसाद देत राहिलात.  परंतु माझे गुरुजन नाथमहाराज त्यांचे गुरुजन प्रत्यक्ष श्रीकृष्ण व माता रुक्मिणी यांच्या कृपेशिवाय हे पूर्णत्वाकडे नेणं अशक्य होतं.  म्हणूनच सर्वांचा ऋणी राहून उद्या या कथेचा समारोपाचा अर्थात शेवटचा भाग मांडून ही कथा आटोपती घेईन. 

पुढील कथा अर्थात  सुभद्राहरण, गुढीपाडव्यापासून सुरू करण्याचा मानस आहे आणि या स्वयंवर कथेसह एकूण चार ते पाच पुस्तकं  नजीकच्या भविष्यात प्रकाशीत करण्याचा मानस आहे. !! भगवंताची कृपा आणि आपला आशिर्वाद असाच राहूदे, हीच प्रार्थना !!!!! कळावे लोभ असावा.

क्रमशः (उद्या समाप्ती) 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०९/०३/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...