#श्रीकृष्णनीती #भाग३४
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
या भरतखंडाने जगाला संकृती, ज्ञान, विज्ञान, ऋषीमुनी, विद्वान, धर्मपरायण सत्पुरुष, महायोगी, संत महंत, द्वैतअद्वैत भेदाभेद, सगुण निर्गुण ज्ञान, अष्टांग योगायोग, नवविधा भक्ती, मोक्षमुक्तीचा बीजमंत्र , वसुधैवकुटुंबकम हा जगतोधारक मार्ग शिकवला. नुसता शिकवला नाही तर त्यावर लाखो वर्ष अनेक युगं चालून दाखवलं. येथील सत्पुरुषांनी राजे महाराजे यांनी अमाप संपत्ती , वैभव, ऐश्वर्य, सुबत्ता, समृद्धी स्वबळावर प्राप्त केली, येथील व्यापाऱ्यांनीसुद्धा हाच वारसा जपत संपन्नता प्राप्त केली.
राजेरजवाडे, महाराजे, धनिक, ऐश्वर्यसंपन्न लोकोत्तर पुरुषांनी येथेच दानधर्म, श्रीमंत असलेल्यानी त्या संपत्तीचा एक तृतीयांश हिस्सा देवब्राम्हणांना, एक तृतीयांश हिस्सा दानधर्मासाठी खर्च करून उरलेल्या एक तृतीयांश हिश्श्याचा स्वतःसाठी विनियोग करावा, हा अर्थव्यवस्था सुरळीत चालवणारा मूलमंत्र, नुसता दिलाच नाही तर तो मंत्र अनेक युगं सूत्रबद्ध पद्धतीने कार्यांवित करून भरतखंडातील समस्त जनतेला या ऐश्वर्याचा लाभ कसा मिळेल हे पाहिले. खऱ्या अर्थाने येथे सुवर्णयुग निर्माण करून दाखवले.
आजच्या भाषेत सांगायचं तर जागतिक अर्थव्यवस्थेत मुख्य हिस्सा हा भरतखंडाचाच होता. जगातील पहिल्या दहा क्रमांकात फक्त भारतवर्ष हा एकच प्रांत समृद्ध संपन्न म्हणून नावाजला होता. अनेक आक्रमणं आली आणि गेली, परंतु इथल्या संपत्तीत गुंजभरही फरक पडला नाही. युगानुयुगे येथील ऐश्वर्य लुटले जाऊनही येथे सुबत्ता कायमचा वास करून होती. जे आपापसातील हेवेदावे वा वादविवाद आणि त्यायोगे होणारी युद्धे ही इथेच होऊन इथली संपत्ती, येथील ऐश्वर्य इथेच राहिले. कारण ताटातून वाटीत आणि वाटीतून ताटात हा प्रकार होता.
सुरवातीला आलेले शक हुण हेदेखील परत न जाता इथलेच होऊन राहिले. ग्रीक सम्राट अलेक्झांडर हा जगतजेता बनण्याची महत्वाकांक्षा घेऊन आला, परंतु जराजर्जर अवस्थेत व सर्व गमावूनच येथून गेला. कदाचित परकीय आक्रमकांना मदत करण्याची घटना या काळात झाली आणि राजा अंभी याने अलेक्झांडर याला रस्ते व पूल बांधून सिंधू नदी ओलांडायला मदत केली, निव्वळ राजा पोरस यांच्यावर असलेल्या आकसापोटी. म्हणजे मी जे माझ्या ताकदीवर स्वबळावर मिळवू शकत नाही, ते जर दुसऱ्याने प्राप्त केलं त्याच्या ताकदीवर त्याच्या बुद्धीने, तर त्या रागापोटी मी त्याचं वाईट करण्यासाठी कोणत्याही थराला जाईन ही वृत्ती दाखवली राजा अंभी याने.
मला स्वतःला असं वाटतं की ही असुरवृत्ती जी परंपरेने दानवांमध्ये आढळते सत्ययुग आणि त्रेतायुगात तीच वृत्ती मानवामध्ये उतरलेली दिसते द्वापारयुगामध्ये. श्रीकृष्णजन्मा पर्यंत याचा वाढून वृक्ष झाला होता. दानव आणि मानव वेगळे करणं कठीण झालं होतं. किंबहुना कंसाचा काळ सोडला तर प्रत्यक्ष असुरांकडून कोणी मदत घेतल्याचं नन्तर दिसत नाही. कारण तोपर्यंत तीच दानवी वृत्ती मानवात पूर्णपणे उतरली होती. मला स्वतःला असं वाटतं की कंस मदतीसाठी बोलावत असलेल्या असुर शक्ती एलियन्स असावेत आणि त्यांना बोलावून त्यांच्याकडून मदत घेण्याची कला वा विद्या त्याकाळी आपल्याला ज्ञात असावी आणि एलिअन्सना ज्ञात असलेलं ज्ञान हे मायावी विद्या समजलं जात असेल. असो तो एक वेगळा विषय आहे लेखाचा.
द्वेष, मत्सर, लोभ, अहंकार आणि यातून चुकीच्या गोष्टी घडल्यानंतर वा केल्यानंतर जोडले जाणारे हितसबंध हा महाभारताचाच एकूण पाया आहे. कंस, जरासंध, धृतराष्ट्र हे असुरी महत्वाकांक्षेचे वुक्ष आणि दुर्योधनादि त्या वृक्षाला लागलेली फळ. कारण दुर्योधनाचा संपूर्ण पाया हा पांडवांचा द्वेष व मत्सर आणि सर्वसत्ताधी होण्याचा लोभ व त्यापायी \झालेला अहंकार. या चार असुरी वासना बळावून त्यातून दुसऱ्याला मिळालेलं वा मला न मिळालेलं नष्ट करण्याची हिनवृत्ती मानवाच्या अंगी येण्याचा प्रकटकाळ हा मुख्यतः महाभारत असावा. भगवंतांना अवतार घ्यावा लागण्याचं मुख्य कारण या शक्ती वा वृत्ती नष्ट करणं नव्हे, तर या शक्ती असलेल्या माणसांशी कशाप्रकारे व्यवहार करावा आणि गरज पडल्यास या हिनवृत्तीच्या मानवाला जगतकल्याण व अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी या जगतातून नष्ट करणं हा एकच रामबाण इलाज श्रीकृष्ण जन्मात भगवंतानी सांगितला वा दाखवून दिला.
सर्वसामान्यांनाही आत्मोद्धार आणि स्वहित जपताना या गोष्टीचा वापर करावा लागला तर तो निश्चित करावा इतकं सहज आणि स्पष्ट भगवंतानी संपूर्ण चरित्रातून मांडलंय. याचा कदाचित विचारसुद्धा नन्तरच्या काळात केला गेला नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांसारखे काही मोजके राजे सोडले तर कोणीही याला अवलंबलं नाही. महाराज म्हणजे श्रीकृष्णनीतीचं प्रत्यक्ष उदाहरणच. धर्मरक्षणार्थ सिद्ध झालेल्या राजाने कसं वागावं, शत्रूला कसं तोलावं, त्याला कसा त्याच्या जागेवर ठेवावं आणि डोईजड होत असल्यास कसा त्याला संपवावं हे फक्त महाराज आणि पेशवे यांनीच दाखवून दिलं.
खलांशी खल आणि सज्जनांशी सज्जन हा सहज सोपा आणि स्पष्ट संकेत जो श्रीकृष्णांनी वारंवार सांगितला, दाखवून दिला, तो इतक्या वर्षांच्या राजेरजवाडे यांच्या काळात फार थोड्या लोकांनी अवलंबून अंमलात आणला. हेच खरतर या देशाचं दुर्दैव. अन्यथा राजनीतीच्या वारशाची इतकी सुबत्ता असताना इतकी वैचारिक दिवाळखोरी असावी हीच या प्राचीन आणि अर्वाचीन भारताची शोकांतिका आहे. आपण दुसऱ्यावर आक्रमण करणारे नाही नव्हतो परंतु आपलं आहे ते राखणारेदेखील राहिलो नाही , तेही श्रीराम श्रीकृष्ण यांच्या भूमीत असून, इतकी आक्रमण झाली पण एकाही राजाने वा तात्कालिक सम्राटाने परकीय शत्रू पूर्ण संपवून त्याला या देशातून हद्दपार करण्याचा साधा विचारही न करावा हे श्रीकृष्णनीती नीट न समजल्याचं अपयश आहे आणि याची अनंत काळपर्यंत न भरून येणारी किंमत आपणच मोजली आहे, मोजत आहोत, बथ्थड शत्रूकडून हृदयपरिवर्तनाची अपेक्षा ठेवून आणि पोकळ अहिंसावादी होऊन. तुझे आहे तुजपाशी परी तू व्यर्थ वाया गेलासी असं खेदाने म्हणावसं वाटतं .
इतकी अमूल्य देणगी दिली आहे श्रीकृष्णाने, राजकीय, सामाजिक, वयक्तिक अश्या सर्वच स्तरावर उच्च मूल्य राखून, आपली हानी होऊ न देता, सर्व इप्सित साध्य करत, खलांना दंड करत, सामान्य मानवाचं जीवनमान सुधारण्यासाठी, राजकीय नीतिमत्ता राखून दुर्जनांना संपवण्यासाठी. परंतु आपणच आपल्या ज्ञानाला पायदळी तुडवलं आहे तुडवत आहोत, त्यामुळे यात परमेश्वरसुद्धा काही करू शकत नाही.
उद्या पुढे पाहू........
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग चौतीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment