ऋतूबदलाचा एक दिवस.
१जून पर्यंत प्रचंड उन्हाळा, उष्मा, उकाडा असह्य होत होता. फक्त एक दिवसाचा फरक पडला आणि २जूनला आकाशात मेघांची दाटी झाली आणि वातावरण एकदम आल्हादकारक झालं. सर्व उष्मा, उकाडा काही क्षणात पार नाहीसा झाला. संपूर्ण आसमंत काळ्या काळ्या ढगांनी भरलं आणि जवळजवळ दोन सव्वा दोन महिने असलेला उकाड्याच्या आणि त्याहीपेक्षा कारोनाच्या मानसिक सावटातून मुक्त झाल्यासारखं वाटलं. याला अजून एक गोष्ट कारणीभून ठरली. वादळाचा धोका. असं म्हणतात कि एक रेष छोटी करायची असेल तर त्या रेषेसमोर दुसरी त्यापेक्षा मोठी रेष आखली कि, आधीची रेषा आपोआप छोटी भासते. मला वाटतं निसर्गाने तेच केलं.
करोनाच्या भीतीदायक सावल्या गडद आणि मोठ्या मोठ्या होत चालल्या असताना, एक दिवस बातम्यांचं जग वादळाच्या भीतीने भरून आणि भारून टाकलं. जेणेकरून काही काळाकरता लोक करोनाची भीती विसरून या नवीन भीतीच्या बातमीत हरवून गेले. वादळ येणार होतं यात दुमत असण्याचं कारण नाही आणि वादळाने हुलकावणी दिली हेदेखील सत्य आहे. पण एका मानसिक दृष्टिकोनातून विचार केला तर, जे झालं ते एकदम परफेक्ट झालं. ज्याला करेक्शन फॅक्टर असं म्हटलं जातं तस झालं. कारण करोना आहे तो राहील तोपर्यंत आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्यात त्या तश्याच बदललेल्या राहतील. परंतु माणसाला मूळ प्रश्नापेक्षा त्या प्रश्नाची मानसिक भीती जास्त त्रास देते. म्हणून हे बदललेलं वातावरण नवीन ऊर्जा,नवीन आत्मविश्वास, नवीन चेतना, नवीन प्रकाश आणि नवीन उमेद घेऊन येईल, हे नक्की.
बघा मस्त अंधारून आलंय
आकाश अगदी भरून आलंय
मेघात गर्द पावसाचा भाव
धरणीलाही भरून आलंय
तप्त किरणांना साहून तिने
सोसले घाव विरही ग्रीष्माचे
आता होउदे तिलाही तृप्त
झेलून थेंब थेंब पावसाचे
उदयीचा सूर्य झाकोळून
मेघांनीही समा बांधला
मेघांनी पावसाच्या थेंबांचा
धरणीवर जलमहाल बांधला
रंग जाहला मेघसावळा
प्रेमाला आली आता जाग
मन म्हणतंय मनाला जणू
प्रत्येक थेंबात तू प्रेम माग
प्रत्येक थेंबात तू प्रेम माग.
कवी : प्रसन्न आठवले
०४/०६/२०२०
०७:५७
Comments
Post a Comment