#श्रीकृष्णनीती #भाग३३
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
संस्कृती , ऐश्वर्य, सुबत्ता यांच्या मुबलकतेमुळे असेल कदाचित, पण त्याचं महत्व वाटत नाही. किंवा रामायण काळापासून येथे असलेली अमर्याद संपत्ती , समृद्धी यांच्यामुळे एक प्रकारची सूज बुद्धीला आली असू शकते. ज्याला आपण एखादी गोष्ट गृहीत धरणं म्हणतो त्याच न्यायाने समस्त भारतवर्ष, जे अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश पर्यंत पसरलेलं होतं, परंतु वेगवेगळ्या राज्यात विभागलेलं होतं, त्यात मुख्य राजे वा सम्राट असलेल्या काही घराण्यांनी संस्कृती, धर्म यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी नक्कीच धीराने आणि निष्ठेने पार पाडली. प्रसंगी प्राण अर्पण करून पुढील पिढ्यांना प्रेरणासुद्धा दिली.
पण आज जो मुद्दा मी मांडणार आहे तो या निष्ठेला पायदळी तुडवून, परकीय शक्तींना मदत करून, वेळप्रसंगी त्यांना येथे, इथल्याच निष्ठावान राजाला पराभूत करण्यासाठी, पाचारण करणारे अस्तनीतले निखारे या भूमीने पोसले त्यांना कोणतीही शिक्षा न करून पुढील जयचंदांच्या वारसांना धडा घालून दिला नाही. त्यांना साथ देणाऱ्यांचा बंदोबस्त केला नाही. ज्यामुळे ही विषवल्ली कधीही नष्ट झाली नाही.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या देशातील वीरांची शौर्याची परंपरा अलौकिक अशीच आहे. म्हणजेच जर प्रथमपासून सर्वच राजेरजवाडे यांना खरच या भूमीबद्दल व धर्माबद्दल थोडजरी प्रेम असतं आणि त्यातील काहींनी परकीय शत्रूंना जर मदत केली नसती तर नक्कीच ही भूमी अजेय राहिली असती. एक गोष्ट लक्षात घ्या, की भौगोलिक स्थितीमुळे देशावर तीनही बाजूंनी कधीही आक्रमण झालं नाही. ब्रिटिशांच्या आधीपर्यंत सर्व आक्रमणं ही वायव्य प्रांतातून म्हणजेच अफगाणिस्तान, जो पूर्वी भरतखंडाचा भाग होता, येथूनच प्रायः झाली.
म्हणजेच सर्व आक्रमणांचा पहिला घाव कायमच सिंध पंजाब राजस्थान या प्रांतांनी झेलला. या लढवय्या लोकांनी नेहमी परकीय शत्रूंचा वार सर्वात प्रथम झेलून बऱ्याचश्या शत्रूंना कदाचित परतवून लावलं असणार. यात परंपरेने म्हणा किंवा भौगोलिक स्थानामुळे त्याबाबतीत तेथील लोक मूलतः शूर, लढवय्ये कणखर असेच होत गेले. त्यांच्या या जबाबदारीला त्यांचं इतिकर्तव्य समजून बाकीचे बरेचसे प्रांत याबाबत अनभिज्ञ राहिले. यातून कदाचित ही मानसिकता निर्माण झाली की, जोपर्यंत संकट वा आक्रमण आपल्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण त्यात लक्ष घालायचं कारण नाही.
यातूनच आपण बरं आपलं राज्य बरं अशी मानसिकता तयार झाली. त्यामुळे ते राज्य टिकवण्यासाठी प्रसंगी लढाईच्या फारश्या फंदात न पडता शत्रूशी हातमिळवणी करून आपलं राज्य वा पद वाचवून पुढे जाणं हा त्यांनी धर्म मानला. हा इतिहास निदान छोट्या छोट्या राजांच्या बाबतीत तर नक्कीच आहे. यातूनच द्रोहाचं बीज पेरलं जाऊन वृक्ष हळूहळू पोखरायला सुरवात झाली. प्रसंगी राज्य वाचवण्यासाठी, प्रसंगी थोड्या लोभासाठी, प्रसंगी जीव वाचवायला, प्रसंगी एखाद्या साम्राटाविरुद्ध त्याचं स्थान कमकुवत करण्यासाठी अश्या अनेक कारणांसाठी इथल्याच राजांनी इथल्याच धर्म व संस्कृतीच्या वृक्षाला नख लावायला सुरवात केली.
कदाचित परकीय आक्रमक ज्यांना कोणत्याही संस्कृतीशी देणंघेणं नव्हतं आणि साम्राज्यविस्तार आणि लूट हेच ज्यांचं ध्येय होतं, त्यांनी येनकेनप्रकारेण इथली व्यवस्था, समृद्धी, संस्कृतिक वारसा, सनातन धर्म, नितीमुल्य यांना हळूहळू सुरुंग लावून पोखरायला सुरवात केली. ज्यामध्ये इथल्याच अनेक राजेरजवाडे यांनी जाणूनबुजून वा कळतनकळतपणे हातभार लावला. ज्यांनी इथल्या संस्कृतीला नख लावून त्यातून स्वार्थ साधून, संस्कृतीची एक एक बलस्थान नष्ट करून त्यायोगे संस्कृती व धर्म पूर्ण नष्ट करण्याचं काम पद्धतशीरपणे केलं.
त्यात काही महत्वाची शक्तीस्थान म्हणजे धर्माचा लिखित वारसा असलेले वेद , रामायण ,महाभारत यासारखे ग्रंथ ज्यांच्या आधारे प्रत्येक पिढी आपल्या समृद्ध वारशाची माहिती व महत्व पिढीदरपिढी जपत होती, इथली नितीमुल्य, नितीमत्ता, बुद्धिमत्ता, ज्ञानाचं भांडार असलेले ग्रंथ , जे अनेक पिढ्यांपासून जपले होते, समृद्ध केले होते, ही सर्व बलस्थानं युगानुयुगे जपलेली होती, ती आता हळूहळू नष्ट करण्याचं कार्य पद्धतशीरपणे सुरू झालं होतं आक्रमकांकडून मुख्य इथली संस्कृती धर्म नष्ट होण्यासाठी आणि आपली संस्कृती व धर्म लादण्यासाठी.
उद्या पुढे पाहू........
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग तेहेतीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment