Skip to main content

अध्यात्म विराम १८५

अध्यात्म विराम १८५

म्हणजेच माया प्रत्येक घडलेल्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्या साठी, योग्य ते कर्म घडवून ईश्वराच्या कर्मफल न्यायाला कार्यरत ठेवून, एकप्रकारे ईश्वराचं निर्मितीचं, पालनकर्त्याचं आणि लयकर्त्याचं कार्य अविरत सुरू ठेवते. म्हणजे यातून थोडासा गोंधळ किंवा गुंता मनात व विचारात होऊ शकतो. तो असा की,जर माया आपल्याला कर्म प्रवृत्त करून कर्म घडवून घेत असेल तर, आपण काय करतो आणि आपणच ते का भोगतो. इथे एक एक मुद्दा विचारात घेऊन पुढे जाऊ, म्हणजे हा विचारांचा तिढा सैल होईल आणि विषय ध्यानात येईल. 

माया ही अनेक अंगांनी अनेक गोष्टी घडवत जाते. त्या एकेक पाहूया. मुळात माया जीवाला कर्मबद्ध करते, कर्मात गुंतवून ठेवते. त्यासाठी परिस्थिती, मती व मनः स्थिती यांचा उपयोग भ्रम निर्माण होण्यासाठी करते. किंबहुना आपण बघितल असेल की ज्यावेळी पडता काळ येतो,त्यावेळी विपत्ती आणि आपत्ती अनेक मार्गांनी येतात. मती कुंठीत करून, चुकीचे निर्णय व कर्म घडवून घेऊन, पुन्हा त्याची फलरुप निष्पत्ती भोगायला भाग पाडते. आता यांमधे मायेचा उपद्व्याप किती आणि आपली कर्मगती किती, हे अवघड गणित सोडवणं महाकर्मकठीण काम आहे. 

आधी सांगितल्या प्रमाणे, याची फलनिष्पत्ती भोगायला पुन्हा माया असेच परिस्थिती, मती आणि मनःस्थितीचे भ्रम निर्माण करून, भोग व उपभोग यांच्या अखंड मालिकेत, मनुष्याला कर्म बद्ध ठेवते. पण तरीही माया नसती तर काय घडल असतं याचा जरा विचार करून पाहूया. माया मनात बुद्धीत आणि त्याद्वारे देहात रस निष्पत्ती घडवून आणत असल्यामुळे, मनुष्याला प्रत्येक क्षण जगण्यात, माधुर्य, स्वाद, आनंद, उत्साह आणि प्रेरणा मिळत राहतात.माणूस प्रत्येक क्षण कार्यमग्न राहतो. अनेक उद्देश्य डोळ्यापुढे राहतात, चालण्याला, वागण्याला, कर्माला, वृत्तीला, प्रवृत्तीला, श्वासांना सुद्धा अर्थ प्राप्त होतो.

मायेच्याच प्रभावात मनुष्य वैभव, संपन्नता, समृद्धी, सुख यांच्या आकांक्षेत आपल जीवन रसपूर्ण करून जगतो. माया जसे भ्रम व विभ्रम निर्माण करते तसच, नवनिर्मिती, नवचेतना, नवोन्मेश, नवकल्पना, इत्यादींमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते. माया ही सरसकट चांगली वा सरसकट वाईट नाही.किंबहुना मी असं म्हणेन की माया मनुष्याच्या ठायी असलेल्या मूळ वृत्तीला प्रवृत्त करून कर्म घडवून आणते. म्हणजे मायेशिवाय कर्म हे निर्जीव होईल. माया ही जगतात ईश्वराची सक्षिभुत उपस्थिती आहे, जी हे पाहते की, जे जे ईश्वराच्या संकल्पनेत जग चालण्या साठी आवश्यक आहे,ते घडवून आणण्यासाठी परिस्थिती मती आणि मनःस्थिती यांचा संगम घडवून आणणे. 

उदाहरण घ्यायचं तर एखाद्या मिश्रण यंत्रात (मिक्सर) आपण पदार्थ घालून मिश्रण व एकजीवता घडवून आणतो. त्या वेगवेगळ्या पदार्थांना स्वतःची चव असते. पण ते तसेच वेगवेगळे ग्रहण केले तर,त्यांना चव लागेलच पण ते चविष्ट होण्यासाठी एकत्रित करून, त्यांचा चुरा, लगदा करून एकत्र एकजीव केले की, त्याची चव द्विगुणित होते. ही चविष्ट खाण्याची इच्छा, योग्य पदार्थ निवडून एकत्रित करण्याची कल्पना व बुद्धी आणि मिश्रण करून एकजीव करण्याची प्रत्यक्ष कृती, यामधे मनात इच्छा, बुद्धीत उपाय आणि त्यासाठी साधन, हे सर्व एका मायेने घडवलं. 

म्हणजे कर्म कोणी केलं तर आपण. कारण त्याचं फळ कोण चाखणार, तर आपणच. पण विचार, कल्पना बुद्धी साधन व कृती याना एकसंधपणे जोडण्याचं कार्य माया करते. आता या विवेचना वरुन हे सहज लक्षात आलं असेल की, मायेला ईश्वराची छाया का म्हणतात. थोडक्यात माया हा ईश्वराचा तो सॉफ्टवेअर प्रोग्राम व ॲप आहे, जो ईश्वराला हवा असलेलं, घडवून आणते. आता यावरून पुढे जाऊन एका गोष्टीचा, प्रश्नाचा विचार करूया की, ह्या सगळ्यात आपण कुठे आहोत, मग आपण काय करतो आणि यातून बाहेर पडण्याचा उपाय काय, की बाहेर पडूच नये, याचा विचार उद्याच्या चिंतनात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...