अध्यात्म विराम १८४
ईश्वराने जग निर्मिती करताना काही मूलभूत नियम किंवा तत्व स्थापित करून ठेवली आहेत, हे आपण मागील भागात पाहिलं. त्यातील एक कर्म हे देखील आपण पाहिलं. यातूनच पुढे येणार तत्व म्हणजे जसा भाव असेल तसाच प्रतिसाद प्राप्त होईल. कारण कर्म हे काया वाचा मन आणि बुद्धी यांच्या मार्फत केलं जातं. म्हणजेच मनातील प्रत्येक विचार हे एक एक कर्म आहे आणि ते आपला प्रतिसाद घेऊनच परत येणार. ही गोष्ट मनात एकदा ठसली की, खरतर माणसाला चुकीचे विचार, काम्य भाव, अती क्रोध भाव जागृत करणारे विचार, दुसऱ्यासाठी नुकसान कारक भाव, विचार व इच्छा येता कामा नये. कारण मी मान्य केलं किंवा नाही केलं तरी कर्माच्या आधीन असलेल्या, ईश्वराच्या या मर्त्य जगतात, भावानुसार फल प्राप्ती हे निर्विवाद सत्य आहे.
म्हणजेच जे सत्य आहे, नित्य आहे आणि चिरंतर आहे तेच शाश्वत आहे. हे दुसरं तत्व जे या कर्म तत्वापासून प्राप्त होतं. झाकता येईल, दडपता येईल, काही काळ भ्रमित करता येईल पण अंती किंवा एका क्षणी जे सत्य आहे,तेच बाहेर येणार. याचाच एक अर्थ असा की कर्म आणि हे सत्य ही दोन शाश्वत आणि एकमेकांना पूरक तत्व आहेत. किंबहुना कर्म जे केलं असेल,त्याची फल प्राप्ती हे सत्य अंतिम आहे. म्हणजे कर्म हेच या जगताच प्रथम आणि अंतिम सत्य आहे. या सत्यातून पुढे आलेलं तिसरं तत्व म्हणजे शाश्वती अर्थात कर्म आणि सत्य या मार्गाने जाणाऱ्याला आपल्या ध्येयप्राप्तीची, उद्देश पूर्तीची शाश्वती ईश्वराने दिली आहे.
ही शाश्वती अंततः असल्यामुळे, मधल्या काळात, वेळात किंवा क्षणांमध्ये जरी भ्रमाने, मायेने, मागील कर्मगतीने मार्गात असत्य किंवा चुकीच्या गोष्टी बलिष्ठ वाटल्या, भासल्या, दिसल्या किंवा जाणवल्या तरीही, त्या भ्रमाने, पथभ्रष्ट, मतीभ्रष्ट न होता कर्माच्या श्रेष्ठ मार्गाने जाणं आणि जात राहणं, कधीही सोडता कामा नये. म्हणजे सर्वथा कर्म, सत्य आणि शाश्वतता यांचा मार्ग न सोडण हितकारक आहे. पण तरीही हे भास, हा भ्रम,हे होणारच. म्हणजेच चौथ तत्व जे या जगताचा, जगण्याचा आधार आहे, ते म्हणजे हे भास, हा संभ्रम व असत्य स्थिती निर्माण करणारी माया.
या जगतातील कोणताही प्राणी, या मायेच्या प्रभावाने ग्रस्त व युक्त नाही, अशी स्थिती नाही. ही माया हा ईश्वराच्या अनेक लीलांपैकी, शक्तिंपैकी, उर्जांपैकी एक भाग आहे. ही माया सकारात्मक व नकारात्मक अशी दोन्ही प्रकारात व्याप्त राहून, प्राण्याला आपल्या भौतिक जगताच्या फेऱ्यात, खेळात गुंतवून ठेवून, ईश्वराचा कार्य भाग साधते. आता विचार येईल की, ईश्वराचा कोणता कार्यभाग यातून साध्य होतो. सर्वात महत्वाचा कार्यभाग म्हणजे, कर्माने प्राप्त भोग व उपभोग भोगण्यासाठी माया अत्यंत महत्वाचं कार्य करते.
उदाहरणार्थ, एखाद्या कर्माच्या फलामुळे आपल्याला आर्थिक नुकसान आपणच मांडून ठेवलं असेल, तर त्या ठिकाणी जाऊन, त्या प्रमाणे वागण्याचा भ्रम माया निर्माण करून, ती फलप्राप्ती घडवून आणते. अर्थात हे फक्त भोग किंवा दुःख यातच घडतं असं नाही, तर उप भोग किंवा चांगल्या कर्माच्या चांगल्या फलांना तुमच्या पर्यंत घेऊन येण्यासाठी, त्याप्रकारची बुद्धी किंवा भ्रम निर्मित करून, त्याप्रकारचं योग्य कर्म घडवून, ती उत्तम गोष्ट तुमच्यापर्यंत आणून देते. म्हणजेच माया प्रत्येक घडलेल्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी, नवनवीन कर्म घडवून ईश्वराच्या कर्मफल न्यायाला कार्यरत ठेवून, एकप्रकारे ईश्वराचं निर्मितीचं, पालनकर्त्याचं आणि लयकर्त्याचं कार्य अविरत सुरू ठेवते.
विषय मोठा असल्यामुळे उद्याच्या भागात आपण हाच पुढे नेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment