अध्यात्म विराम १७८
सनातन धर्मच नव्हे तर जगातील कोणत्याही धर्मात, जर असं सांगितलं गेलं असेल किंवा सांगितलं जात असेल की, आमचा देव तुम्हाला समस्या मुक्ती देईल आणि तुम्ही सुखी व समस्या मुक्त जीवन जगाल, ते हे थोतांड आहे, याचा बोध मनात धरून ठेवा. कारण जगरहाटी अशी आहे की, समस्या, दुःख, चिंता नाहीत अशी एकही जागा या जगतात नाही. आपण याच जगताचा हिस्सा आहोत आणि असणार. जर आपण असा विचार केला तकी, खूप पैसा आला की, खूप सुख येतं किंवा मिळतं, तर ही भ्रामक कल्पना आहे. कारण जो पैसा जसा येतो, तसेच त्याचे परिणाम सोबत घेऊनच येतो.हे विश्वातील कोणत्याही धर्माचा तारक, प्रचारक वा ईश्वराचा तथा कथित प्रतिनिधी सुद्धा बदलू वा टाळू शकत नाही.
यावर उपाय काही असेल तर, त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आणि आपली साधना, श्रद्धा व भक्ती वाढवत नेणे. विश्वाला संचालित करणाऱ्या त्या शक्तीने आपल्या पद्धतीत, तत्वात व नियमात, काळाच्या इतक्या मोठ्या परिघात एका अंशाचा सुद्धा बदल केलेला नाही. जे अश्या प्रकारच्या विशिष्ट धर्माच्या प्रचाराला सहजी बळी पडतात, त्यांनी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पूर्णावतारी प्रत्यक्ष श्रीकृष्ण भुलोकि असताना सुद्धा त्यांनी, पांडवांचा वनवास टाळू शकत असूनही, टाळला नाही. कारण त्यांना कर्माचा सिद्धांत किती खरा आहे, याची जाणीव जगाला करून द्यायची होती.
मात्र त्यांनी, पांडवांना वनवास काळात सुद्धा, त्यांना मानसिक नैराश्य येणार नाही व त्यांचं मानसिक खच्ची करण होणार नाही यासाठी, सतत त्यांच्या पाठीशी आपला आधार कायम ठेवला. म्हणूनच पांडव, वनवासा तील आपला कठीण काळ, धैर्याने व निष्ठेने पार पाडू शकले. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे, अंतिम महाभारत युद्धात, पांडवांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने भगवंत उभे राहिले आणि या जगतातील त्या काळचे, सर्वात नीच खलपुरूष असलेले आणि त्यांचे पाठीराखे, याना यम सदनी धाडण्यात अत्यंत मोलाची भूमिका भगवंतांनी बजावली.
काळाच्या त्या टप्प्यावर, काही वर्षात लगेचच कलियुग सुरू होणार आहे, हे जाणून, तेथपर्यंतचे सर्व दुष्ट, दुर्जन, दानवी मनाचे नीच दुरात्मे, निदान कलियुग सुरू होताना या भुलोकावरून, नाहीसे होतील याची पूर्ण काळजी घेऊन मगच आपला अवतार त्यांनी समाप्त केला. हे करत असताना, विश्वाला, कलियुगात जगण्यासाठी, प्रपंचात पदोपदी मार्गदर्शन व्हावं यासाठी आणि चिरकाल उपयोगात येणारं ज्ञान प्राप्त करून, कर्ममार्गी राहण्याची मोठी शिकवण आणि धैर्य, चिकाटी, इश्वरावर, आपल्या कर्मावर संपूर्ण श्रद्धा, विश्वास, निष्ठा, काही प्राप्त करण्या साठी त्याग, तप साधना करण्याची तयारी, ठेवण्याची शिकवण गीतेच्या माध्यमातून, या जगाला आपल्या चरित्रातून दिलीच.
पण अश्या प्रकारे जीवन जगणाऱ्या कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग आचरणाऱ्या सामान्य जनांच्या मागे मी नेहमी उभा होतो, आहे आणि असणार, हा बोध देखील त्यांनी घालून दिला.जीवनात जगण्यासाठी, मिळालेला हा आणि पुढचा प्रत्येक जन्म आपण, आपल्या भोगांची चिंता न करता, त्याने दुःखी व निराश न होता योग्य कर्म, योग्य भक्ती करून आपला कार्यभाग पूर्ण करावा. त्याचप्रमाणे या जीवनात भोग व उपभोग, सुख व दुःख हे साखळीने येणारच आहे.
प्रत्यक्ष परमेश्वर जरी पृथ्वीवर असेल तरी, तो तुमचे भोग कमी करणार नाही, कारण त्यात तुमचं अंतिम हित आहे. त्यामुळे जर कोणी तसा खोटा विश्वास देऊन, भुलव ण्याचा, मार्ग भ्रष्ट करण्याचा व चुकीचं सांगून दुसऱ्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत असेल, तर तसं काहीही, या विश्वात शक्य नाही. उलट त्यातून फक्त निराशाच अंततः पदरात पडू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन जगत असताना भोग व उपभोग, पुढील काळाची, पुढील संचिताची चिंता व चिंतन करावं, गा स्पष्ट संदेश, त्यांनी या जगताला दिला आहे.
याचं विषयाला उद्याच्या भागात पुढे नेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment