Skip to main content

अध्यात्म विराम १७४

अध्यात्म विराम १७४

आत्ममंदिरात असलेल्या शांत शीतल गाभाऱ्याचा अनुभव, अनुभूती आणि प्रचिती, गाभाऱ्यातील त्या ईश्वराच्या समोर, एक क्षण उभ राहून घेता येते, हे माऊलींनी एका ओवीत सांगितलं आहे. पण भक्ती हा आत्मयज्ञ आहे आणि यज्ञ म्हटला की त्यात आहुती आली आणि आहुतीसाठी समिधा पण आल्याचं. आता या दोन गोष्टींवर चिंतन करूया, म्हणजे माऊलींच्या एका ओवीचा अर्थ किती गहन आहे आणि आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, हे देखील लक्षात येईल. मुळात यज्ञात अग्नी हा अध्याहृत आहे. हा अग्नी इश्वरावरील प्रेमाचा, आपुलकीचा, स्नेहाचा, श्रद्धेचा, भावाचा आणि विश्वासाचा असावा लागतो. 

कारण भक्तीचा पायाच मुळात ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास हा आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास तेंव्हाच होऊ शकतो, ज्यावेळी आपण आपल्यातील मी, स्व आणि अहं यांचा पूर्ण त्याग करतो किंवा करू शकतो. म्हणजे या आत्मयज्ञात पाहिली समिधा आणि आहुती ही मनातील मूळ स्थित अहं, ग, स्व यांची द्यावी लागते. देवाचीये द्वारी जाणं म्हणजे चित्तशुद्धी आणि आत्मशुद्धी ही प्रथम अपेक्षित आहे. म्हणजे या आत्मयज्ञात आधी आपल्या मनातील अहं, स्व आणि ग यांची आहुती दिल्यानंतर, दुसरी आहुती, काम, क्रोध, मद,मत्सर आधी शत्रूंची द्यायची आहे. 

कारण हेच शत्रू, मानवी मनाला मायेच्या स्वाधीन करून, अनेक कुकर्म, चुकीच्या गोष्टी व अनियंत्रित पाप घडवून आणतात. त्यामुळे, देवाचिये द्वारी उभे राहण्याआधी दुसरी आहुती ही विकाराला कारणीभूत शट तत्वांची द्यायला हवी. आता इतकं झाल्यावर हे साध्य झालं किंवा होईल असं म्हणता येईल का. तर नाही. कारण ही आहुती म्हणजे त्या समिधेला पूर्ण जाळून, त्याची राख करणं. जळल्यानंतर अर्थात नष्ट झाल्यानंतर या दोन्ही प्रकारच्या विकारांची अर्थात या सर्व भावनांची केंद्रे मनातून पूर्ण शुष्क झाली पाहिजेत किंवा जळून नष्ट झाली पाहिजेत.

जर कोणत्याही घटनेने, प्रसंगाने यातील कोणताही भाव किंवा मनातील अहं जागृत झाला किंवा होत असेल तर, आपण यज्ञात समिधा घातल्या नाहीत असाच याचा अर्थ घ्यावा लागेल. किंवा घातल्या तरी त्या पूर्ण ओतल्या नाहीत. म्हणजेच विकार आणि विषारी तत्व, मनातील केंद्रातून पूर्ण नाहीशी करणं,ही या यज्ञातील प्राथमिकता आहे. म्हणजेच ही आहुती पूर्णाहुती असावी. यानंतर जागृत भाव हा विकाररहीत असावा किंवा असतो.  

याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, विकार नष्ट झाल्या मुळे, मनात उत्पन्न होणारे, नकाराचे, विकाराचे भाव निर्माण होत नाहीत. त्यामुळे त्या विकारांनी मनात उत्पन्न होणारी आंदोलनं होत नाहीत.त्यामुळे मन अखंड अविरत आणि नित्य शांतीचा अनुभव घेतं. या प्रचीतीचा अनुभव मनाने एकदा घेतल्यावर,मन नित्य त्यात रममाण राहण्याचा प्रयत्न करतं. आत्मयज्ञात अपेक्षित दोन आहुती सोडून झाल्यावर, तिसरी आहुती ही, सुख आणि दुःख, भोग आणि उपभोग यांच्यातील भावनांची किंवा भावांची द्यावी. 

जो अनुभव मनाने काही क्षण घेतला आहे किंवा घेतला असेल, तो नित्य प्राप्त होण्यासाठी, या दोन्ही प्रसंगात उत्पन्न भावच, जाळून नष्ट करणं अपेक्षित आहे. मन हे इतकं चंचल आहे की, ते जरी, दोन आहुती देऊन शांत झालं तरीही, कोणता गैरभाव किंवा चुकीची आवृत्ती मनात पुन्हा जागृत होऊन, मन पुन्हा पुन्हा त्याच मार्गावर कधी जाईल, याची शाश्वती देता येणार नाही. म्हणून एकदा एक क्षण घेतलेल्या मनःशांतीचा नित्य अनुभव घेण्यासाठी, काहीतरी वेगळं साधन करणं किंवा सहाय्य घेणं अपेक्षित आहे. 

ते काय साधन किंवा सहाय्य असावं, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०४/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...