Skip to main content

अध्यात्म विराम १७६

अध्यात्म विराम १७६
 
अनेकदा मला प्रश्न विचारला जातो किंवा अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो, ज्याच निश्चित उत्तर सापडत नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळत नाही. जरा यावर चिंतन करूया. सदुगुरू करणं हा मुळातच चुकीचं समज आहे आणि अत्यंत अहं जागृत असल्याचं लक्षण आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. कदाचित कोणाला आश्चर्य वाटेल वा रागसुद्धा येऊ शकेल. पण हे आपल्यातील अहं, ग आणि स्व ज्यावेळी शिल्लक असतो, त्यावेळी माणूस मी हे केलं आणि माझ्याकडून हे झालं अशी भाषा वापरतो. हे कदाचित प्रपंचात खरं असेल, अस एकवेळ गृहीत धरलं तरीही, परमार्थात केलं आणि नाही केलं या अहं मिश्रित भाषेला काहीही अर्थ नाही. 

याचं महत्वाचं कारण म्हणजे परमार्थात आपण काहीच करत नाही आणि करू शकत नाही. अन्यथा परम शक्तिवान अर्जुनाला विषाद झाला नसता आणि इतक्या मोठ्या कठीण आणि धर्माची परीक्षा घेणाऱ्या क्षणी, सखा श्रीकृष्ण भगवंतांना, सद्गुरू रूप घेऊन, गीता सांगून, अर्जुनाचा मोह, विषाद व अहं दूर करावा लागला नसता. मुळात अर्जुनाला, भगवंतांनी हे दाखवून दिलं की, तू काहीच करत नाहीस, तर मीच अनेक रुपात प्रकट होऊन, पत्येका कडून, त्याचं त्याचं कार्य करवून घेतो. मात्र ज्यावेळी प्राणी आत्म स्व विसरून, देह, बुद्धी व मन स्व मानतो, त्यावेळी तो ईश्वराच्या मार्गावरून दूर जातो आणि कर्मफल साखळीत अडकून जातो.

म्हणजे आपण ज्याप्रमाणे सांसारिक गोष्टी करताना हे विसरून जातो की, हे आपण कर्मफल साखळीच्या आधीन असलेल्या परिघात केलेलं नित्य कर्म आहे, जे करणं वा न करणं आपल्या हाती, आता राहिलेलं नाही. कारण आपण आता एका चक्रात अडकलेले आहोत आणि आपलं हित हे आपल्या हातात नाही. पण ही शृंखला तोडण्यासाठी एका असीम कृपेची आवश्यकता आहे. अशी कृपा समस्त जगतात श्रेष्ठ असे सद्गुरूच करू शकतात. कारण त्यांना तसा अधिकार प्राप्त आहे. त्यांना भेटण्याची किंवा त्यांच्या संपर्कात येण्याची मती अर्थात बुद्धी, जाणिवेची जागृती आणि प्रत्यक्ष कर्म करून, ती कृपा प्राप्त करण्याची कृती हेसुद्धा त्यांच्या कृपेवर अवलंबून आहे.

आपण कोणत्याही पारमार्थिक मार्गाचे यात्री नसताना, त्या मार्गात आपण येणं, आपल्याला त्यासाठी उद्युक्त करणं किंवा तसा योग घडून येणं, हे कृपेची परमावधी आहे. आपण यात गुरू केले किंवा आपल्याकडून एखाद्या गुरूला मान्यता मिळाली ही अहं भावाची परमावधी आहे. कारण तुम्ही कोण सद्गुरू स्वीकारणारे, तर तुम्हाला सद्गुरूंनी स्वीकारलं पाहिजे. कारण सद्गुरू तत्व हे इतकं अलौकिक, पवित्र आणि उदात्त आहे की, आपल्या कल्पनेच्या ही ते पलीकडे आहे. आपण एखादा गुरू करावा किंवा न करावा हे आपण ठरवून होत नाही. त्यासाठी आपल्या भाग्यात तसा योग असावा लागतो. असा योग घडणं ही सर्वस्वी सद्गुरू महिमा व कृपा यांच्या संयोगाने घडतं. 

त्यामुळे मी कोणताही गुरू केलेला नाही, या वाक्याच्या जागी, मला आजपर्यंत सद्गुरू लाभ झालेला नाही, हे जास्त संयुक्तिक, योग्य आणि विनम्रता पूर्ण आहे. कारण खरंतर मला सद्गुरू योग प्राप्ती झालेली नाही, ही अत्यंत दुर्दैवी आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. यात आपला सहभाग इतकाच असावा वा असू शकतो की,आपण त्याप्रकारची सदइच्छा, सद्भावना मनात बाळगून, आपला भक्तिमार्ग पुढे नेऊ शकतो किंवा नित्य साधन करू शकतो. पण हा योग जुळून येणं हे सर्वस्वी त्या सद्गुरू तत्वाच्या परम इच्छेवर अवलबून आहे.आपण त्यामध्ये आपल्या इच्छेला आपल्या मनाच्या शक्तीचं पाठबळ देऊन, त्याला अजून नेटाने पुढे नेऊ शकतो. आपल्या हाती इतकचं आहे. 

अनुभवाने सांगतो की, ज्यावेळी ती घडी येते, त्यावेळी आपल्या आयुष्यात सद्गुरू कृपेचा ओघ सुरू होतो आणि सद्गुरू स्वतःहून अश्या माणसाला साधक रुपात स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतात. म्हणजेच आपण सद्गुरू केले हा अहं भाव झाला आणि सद्गुरूंनी आपल्याला साधक म्हणून स्वीकारून ओळख दिली, ही विनम्रतेची परमोच्चता झाली. 

खूपवेळा अजून एक प्रश्न मनात येतो की, मी अमक्या सद्गुरुंचे करतो. पण तमके सद्गुरू खूप जागृत वाटतात. यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

तोपर्यंत सद्गुरू शरणं!! 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...