कैकयी, श्रीराम आणि वनवसाचा फास ! एक चिंतन -१
माता कैकयी, जिने श्रीराम यांच्यावर पुत्रापेक्षा जास्त माया केली, स्नेह दिला, त्याचं मातेने, प्रभूंना वनवास आणि भरताला राज्य मागितलं. हा खरतर खूप चर्चिला गेलेला भाग आहे. तरीही या विषयात चिंतनातून काही प्रकाश टाकता आला तर बघुया. निव्वळ या विचाराने, आज या विषयावर लिहायला घेतलं.
मुळात एक लक्षात घ्या की, रघुकुल, ज्या कुळात राजा दशरथ, राम यांसह अनेक तत्वशील, विचारशील, आचार शील आणि वचनशील राजे झाले, त्या घराण्यात कैकयी सारखी स्वार्थी आप मतलबी राणी होईल, हे सकृतदर्शनी कोणालाही मान्य होऊ शकणार नाही. इतकी क्षुद्र विचार असणारी आणि जी गोष्ट प्रत्यक्ष आपला पुत्र भरत याला सुद्धा मान्य नसेल, हे जाणणारी व तीच गोष्ट आपण घडवून आणली तरी भरत ती गोष्ट मान्य करणार नाही, याची राणी कैकयी हिला नक्कीच खात्री असणार.
राजा दशरथ यांच्या तीनही राण्यांमध्ये विचारी, राज्य कारभार, त्याची तंत्र, बुद्धी व समज जास्त असलेली, राजकारणातील अनेक गोष्टी, बारकावे ज्ञात असलेली अशी एकमेव राणी म्हणजे कैकयी होती. महर्षी वसिष्ठ आणि महर्षी विश्वामित्र यांनी वेळोवेळी या गोष्टीची जाणीव, कल्पना आणि माहिती राजाला,राज परिवाराला करून दिलेली होती की, श्रीराम हे महाविष्णू यांचा अवतार आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षित कार्याची जाणीव अनेकांना त्यावेळी असली पाहिजे. किंवा असणार.
दोन गोष्टी या एकत्र होणं अशक्य होतं. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेल्या शापानुसर, राजा दशरथ याचा, पुत्रवियोगत मृत्यू, हे निर्विवाद भविष्य होतं. याची राज परिवारात, काही जणांना किंवा अनेकांना माहिती असणार हे नक्कीच. त्याची चर्चा जरी होत नसेल तरीही, माहीत असलेल्या सर्वांच्या मनात ती बाब असणारच. या जाणकार व्यक्तीतीलच एक माता कैकयी असणार. इथे काही गोष्टी अपरिहार्यता, काही गोष्टी विकल्पा तील एक अश्या तार्किक व बौद्धिक पद्धतीने आपण चिंतनात आणून पाहूया.
जर राजा दशरथ यांचा पुत्राच्या वियोगात मृत्यू हे घडणारं भविष्य सत्य होणार तर ते दोनच शक्यतेने होऊ शकतं. एक तर राम यांच्या अकाली मृत्यूने किंवा अचानक राज्य सोडून खूप दूर निघून जाण्याने. यातील पहिली शक्यता ही असंभव होती व दुसरी शक्यता त्या घडतं असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कठीण वाटत होती. दुसरी एक गोष्ट, श्रीरामांच्या जन्माच मुख्य इप्सित, रावण वध होता. हे कार्य तेंव्हाच शक्य होतं, जेंव्हा काही कारणाने अजेय श्रीराम आणि दुराचारी रावण यांच्यात महाभयंकर अस युद्ध झालं तरच. .
रावणाला प्राप्त वरदानाचा विचार करता, फक्त आणि फक्त नर व वानर या दोघांकडून त्याला भय होतं. अन्यथा समस्त जगतात तो अजेय होताच.एकदा वानरराज वालीने त्याला, आपल्या बगलेत सहा महिने दाबून धरला होता, हे सर्वश्रुत आहे. पण त्यानंतर तो वानरांच्या वाटेल फारसा गेला नाही. या सर्व बाबी ध्यानात घेतल्या तरीही, एक मुद्दा जो अजिबात दुर्लक्षित करून चालणार नव्हता. तो म्हणजे प्रभू स्वतः मर्यादा पुरुषोत्तम असल्याकारणाने, स्वतःहून कोणाच्याही वाटेला जाणार नाहीत,शरणा गताला अभय देणारे होते.
म्हणजे जर राजा म्हणून राज्याभिषेक झाला तर, इप्सित साध्य होणार कसं, हा तिढा होताच. त्यामुळे जर रावण स्वतःहून असा काही निंदनीय, अमानवीय आणि प्रमादा त्मक कृत्य करत नाही, तोपर्यंत श्रीराम त्याच्या वाटेला जाणार नाहीत, हे तर विधीसुद्धा जाणत होता. मर्यादित शक्यतांमधे रावण वध हा अत्यंत दुरापास्त होत होता.
विस्तारास्तव अंतिम भाग उद्याच लगेच
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०५/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment