अध्यात्म विराम १८८
ज्ञान माणसाला सत्य आणि मिथ्या, योग्य व अयोग्य, अती आणि संयत, अनावर आणि नियंत्रण यातील फरक मुख्यतः जाणवून देतं. ज्ञानाने कृती किंवा कर्म योग्य पद्धतीने घडेल, ही शक्यता पूर्ण ठामपणे जरी सांगता आली नाही तरी, ज्ञानाने मनाचे चक्षु नक्कीच उघडतात आणि त्याने कार्य करण्याची, जग वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. अर्थात दृष्टी आली म्हणजे कार्य घडेल किंवा योग्य कृती होईल, याची शक्यता असेलच हे विश्वेश्वर सुद्धा सांगू शकणार नाही.
पण जाणिवेची केंद्र जागृत होतात. बरेच वेळा एखादी नवीन माहिती, आपल्याला मिळाल्यावर, आपण म्हणतो अरे हे तर माहीतच नव्हतं. अर्थात माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, हे इथे मुद्दाम स्पष्ट करू इच्छितो. तर माहिती म्हणजे फक्त ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. खरं ज्ञान हे ते जे मनाला, मनातील जाणीवेच्या केंद्रांना आणि त्याद्वारे मनःचक्षुंना योग्य आणि अयोग्य हा सारासार विचार करण्याची किल्ली मनाला प्राप्त करून देतं. असा सारासार विचार करायची दृष्टी मनाला प्राप्त झाली की, हळूहळू, त्या मार्गावर नियमित चालताना, विवेक जागृत होतो.
विवेक हा सारासार विचार आणि योग्य दृष्टी यांचा संगम आहे. विवेक म्हणजे काय, हे आपण मागील भागांमधे विस्ताराने पाहिलं आहे. पण ज्ञानप्राप्ती माणसाचे मनःचक्षू उघडून देते. ज्यायोगे व्यक्ती तर्कशुद्ध विचार करून, त्यानुसार परिस्थिती, धर्म, सार्वत्रिक हित आणि योग्य विकल्प यांची निवड करण्यास शिकतो. ज्ञान त्या दृष्टीकडे मनाला घेऊन जातं. म्हणून ज्ञानाने मनुष्य विवेकी आणि समृद्ध होतो. ही समृद्धता, विचारांची, मनाच्या स्थिरतेची आणि परिस्थिती हितावह असो की विपरीत असो, त्यातून योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांची असते.
विवेक जागृती होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कर्म. अर्थात यामधे होण्याचा हा शब्द मुद्दाम योजला आहे. कारण ज्ञानाने, माणूस विवेकी होईलच याची शाश्वती नाही. तर तो सद्गुरू किंवा ईश्वर कृपेचा महिमा आहे. कारण विवेका सोबत अनेकदा अहंकार, गंड बळावू शकतो. किंवा तसा तो सर्वसामान्यपणे बळावण्याची शक्यता अधिक असते.
याचं कारण म्हणजे मी. ज्यावेळी माणसाच्या मनाला व बुद्धीला जाणीव होते की, मी योग्य तो निर्णय घेणारा तर्कशुद्ध दृष्टी असलेला मनुष्य झालो आहे, त्या तिथे अहं ची बीजं रुजतात आणि एकदा अहं रुजला की, तो निरुपयोगी गवता सारखा अत्यंत वेगाने फोफावतो. त्याच्याच जोडीला त्याचा बंधू क्रोध, हासुद्धा आपोआप हात धरून येतो.हे दोघे विवेकाचा गळा घोटून, माणसाचा कधी आत्मघात करतील, हे ईश्वराला सुद्धा सांगता येणार नाही.
म्हणून सद्गुरू अधिष्ठानाशिवाय प्राप्त ज्ञानाने आलेला विवेक बहुतांशी अहं वाढायला कारणीभूत होतो. याच साठी ज्ञानप्राप्ती सद्गुरू कृपेने व्हावी आणि त्यांच्या कृपेची जाणीव मनात आत्म्यासह वसलेली असावी. अन्यथा आत्मघात हा ठरलेला आहे. म्हणूनच अनेकदा ज्ञानी मनुष्य नम्र व एका कोणत्यातरी अक्षावर शरणागत नसेल तर, विवेकी असून अविवेकी वर्तन होऊ शकतं. हा अक्ष असा असावा जो स्थिर, योग्य, तितकाच बलिष्ठ आणि तरीही निगर्वी असेल. असा अक्ष फक्त सद्गुरू कृपा हाच असू शकतो.
ज्ञान व ज्ञानाने प्राप्त विवेक व त्या ज्ञानाचा सर्वंकष विचार केल्यावर, मुख्य निष्कर्ष असलेला त्याचा मुलाधार अर्थात सद्गुरू कृपा यांची महती आपण पुढील भागात पाहूच. पण त्याआधी विवेक जागृतीचा दुसरा ईश्वर प्रणित मार्ग म्हणजे कर्म, यावर फक्त विवेक जागृतीच्या दृष्टिकोनातून उद्याच्या भागात विचार करुया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment