#श्रीकृष्णनीती #भाग४१
श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद हे खरतर नेहरुंनी निवडलेले नव्हते तर नेहरुंवर लादले गेलेले राष्ट्रपती होते. कारण डॉ राजेंद्रप्रसाद यांची मतं बऱ्याच बाबतीत नेहरुंच्या विचारांना छेद देणारी होती. ते रोखठोक होते. हिंदू कोड बिलालासुद्धा डॉ राजेंद्र प्रसादांचा विरोध होता आणि राष्ट्रपती म्हणून त्यावर आपली मोहोर उठवायला ते खरतर राजी नव्हते. परंतु नाखुषीनेच त्यांनी त्यावर सही केली. (यावर देखील पुरेशी माहिती उपलब्ध झाली तर एक लेख लिहीन). स्वतः नेहरुंच्या पसंतीचे होते सी राजगोपाला चारीआणि ते त्यावेळी पाहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले गेले होते.
नेहरुंनी राजगोपाला चारी यांना आणण्यासाठी जंग जंग पछाडलं, पण डॉ. राजेंद्रप्रसाद यांना पटेलांसह सर्वांचा काँग्रेसमध्ये पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे डॉ राजेंद्रप्रसाद सहज पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. दिवस २६ जानेवारी, १९५०. याआधी १९४९ च्या मध्यापासून जेंव्हा या पहिल्या नियुक्त राष्ट्रपतीपदाचे वेध लागेल, त्यावेळीच पडद्यामागे हालचाली सुरु झाल्या होत्या, अर्थातच नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात.
नेहरूंना राजाजी अर्थात सी राजगोपालाचारी यांना नेमायचे होतं. पण सरदार, डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या उमेदवारीवर ठाम होते. परंतु त्यांनी तसं नेहरूंना प्रत्यक्ष बोलून दाखवलं नाही आणि आतून डॉ राजेंद्र प्रसादांना आपला पाठिंबा दिला. पण ते जाहीर केलं नाही. १९४९ च्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व सभासद राजाजींवर तुटून पडले. सर्वांनी त्यांच्या चलेजाव चळवळीतील भूमिकेवर टीका करत त्यांच्या उमेदवारीला ठाम विरोध केला.
नेहरूंनी तकलादूपणे बाजू मांडण्याचा प्रयत्न करत सरदार पटेलांकडे मदतीसाठी हात मागितला आणि पटेलांनी आतापर्यंत जाहीरपणे न मांडलेली आपली भूमिका या सभेत मांडत, नेहरूंना धोबीपछाड देत, डॉ राजेंद्रप्रसादांना ठाम पाठिंबा दिला . अश्या पद्धतीने डॉ राजेंद्रप्रसादांच्या हंगामी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं.नेहरू एक मोठी लढाई सहजी हरले. कदाचित याचं खूप मोठं श्रेय अर्थातच पटेल आणि त्यांचे समर्थक यांना जातं. कारण नेहरूंचे मोठे आणि खंदे पाठीराखे या जगात नव्हते.
वास्तविक राजाजी (सी राजगोपालाचारी) हे काँग्रेसमध्ये अमान्य होते. कारण राजाजींनी दुसऱ्या महायुद्धाच्या मुद्द्यावर ब्रिटिशांना पाठिंबा दिला आणि याच कारणास्तव त्यांनी चलेजाव चळवळीला विरोध केला होता. इतकंच नाही तर त्यांनी त्यात भाग घेतला नव्हता, ही वस्तुस्थिती समोर होती. याचसाठी काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांचा राजाजींना विरोध होता. अजून एक कारण म्हणजे राजाजींचा जींनाना आणि त्यांच्या प्रस्तावाला प्रथमपासून पाठिंबा होता.
मुळात या अनेक गोष्टींमुळे नेहरूंना राजाजीच राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून हवे होते. त्यांच्या सेक्युलरीझमच्या कल्पनेला राजाजींचा पाठिंबा होता. पण डॉ राजेंद्रप्रसाद सेक्युलरीझमवर वेगळे मत असणारे होते. त्यांनी आपली मतं कधीही लपवून ठेवली नाहीत. डॉ राजेंद्रप्रसाद सर्वार्थाने योग्य उमेदवार वाटल्यामुळे सरदार पटेलांनी एक चाल खेळली. त्यांनी आपलं मत प्रत्यक्ष न मांडता गुलदस्त्यात ठेवलं. नेहरूंनी त्यांना विचारून पाहिलं तेंव्हा पटेल मोघम इतकंच म्हणत की, तुम्ही तुमचं मत मांडा आपण काँग्रेस कार्यकारिणीत बघून घेऊ. याचा नेहरूंनी अर्थ असा काढला की पटेलांचा राजजीनाच पाठिंबा आहे. तस पत्रदेखील त्यांनी डॉ राजेंद्रप्रसाद यांना लिहिलं की, पटेलांचाही पाठिंबा राजाजीनाच आहे. त्यामुळे तुम्ही उमेदवारी मागे घ्यावी हे उत्तम. डॉ राजेंद्रप्रसादांनी तस पटेलांना विचारलं देखील. पण पटेलांनी त्यांना इतकंच सांगितलं की, मी नेहरूंना राजाजींच्या पाठिंब्याबद्दल काही बोललो नाहीये तुम्ही निश्चीन्त असा.
अर्थातच डॉ राजेंद्रप्रसाद ठाम राहिले. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा विचारही केला नाही. मुद्दा काँग्रेस कार्यकारिणीत गेला. साधारण ऑक्टोबर १९४९ च्या सुमारास झालेल्या या बैठकीत उमेदवारीचा मुद्दा चर्चेला आला. उपस्थित सर्व सदस्यांनी राजाजींच्या उमेदवारीला, चलेजाव चळवळीतील राजाजींच्या कचखाऊ भूमिकेमुळे त्यांच्यावर कडाडून विरोध केला.
देशातील पहिली निवडणूक १९५२ साली झाली. काँग्रेस मेजॉरिटीने निवडून आली. पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधींकडून राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक झाली. त्यासाठी देखील नेहरूंना डॉ राजेंद्रप्रसाद नको होते. पण काँग्रेस कार्यकारिणी आपल्या मतावर ठाम होती. खरंतर १९५० साली पटेलांच्या मृत्यूनंतर १९५२ साली नेहरूंना हे कार्य आता सहज आहे असं वाटलं. परंतु पटेलांच्या पश्चात काँग्रेसमधील नेहरू विरोधकांनी पुन्हा एकदा डॉ राजेंद्रप्रसाद यांनाच राष्ट्रपतिपदाचा उमेदवार घोषित करून नेहरूंना परत एकदा चकवलं. १९५७ च्या राष्ट्रपतीपदाच्या दुसऱ्या निवडणुकीवेळी पुन्हा नेहरूंनी उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उमेदवारी द्यायचं योजलं होतं. पण सलग तिसऱ्यांदा नेहरूंना कार्यकारिणीत हार पत्करावी लागली आणि उमेदवारीची माळ परत एकदा डॉ राजेंद्रप्रसादांच्याच गळ्यात पडली आणि ते सलग १९५० ते १९६२ असे १२ वर्ष राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते.
सोमनाथ मंदिर जीर्णोद्धार इतिहास पुढील भागात.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
क्रमशः
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
भाग एक्केचाळीसावा समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment