खास आषाढी एकादशीनिमित्त.
रखुमाईची तक्रार
भक्तरक्षणार्थ हरी उभे विटेवरी
अठ्ठावीस युगे सरली हरी पंढरी
अखंड हा स्नेह झरा पंढरपुरी
पांडुरंग उभे ऐकले पंढरपुरी
रखुमाईस वाटले तक्रार न्यावी
आपली व्यथा श्रीहरींना सांगावी
बोलावून घेतले नारद मंदिरी
एकतारी वाजवीत आली स्वारी
लक्ष्मी म्हणे नारदांस ऐका एकदा
ऐकली मी उभी इथे सदा सर्वदा
कधी न मी खंत केली ना काळजी
परी मनी सल आहे एकलेपणाची
सांगू कुणा हृदयाची पीडा नारदा
उपाय काही असेल सांगा मजला
नारायण नारायण बोल बोलुनी
नारद करीती चिंता काय बोलू मी
सुचले ते सांगतो परी हात जोडतो
नाव नका घेऊ माझे पाया पडतो
आश्वस्त करिते नारदास माता
सांगावे काय करिता पावेन नाथा
नारद मग स्मरून श्रीहरीस बोलती
माते मग साधा उपाय करा एकची
भक्तवत्सल हे ब्रीद असे हरीवचन
जावे शरण पांडुरंग करा भावेस्मरण
हरी आपुल्या नामाला बांधला असे
तत्पर येऊन पुसतील भाव मनीचे
सांगा त्यास एक क्षण द्यावा मजही
ज्ञाना सांगे क्षण एक राहे हरी द्वारी
खरे नाही वाटत परंतु हे अद्भुत सत्य
एक क्षण विठ्ठल म्हणा हरिरूप प्राप्त
रखुमाई हसून म्हणे मम हृदयी नाथ
उगीच पुसले तुम्हा हरी जवळी नित्य
नारद हसून म्हणती दोष न आपुला
जवळी जे असते ते दिसे न स्वनेत्रा
राग रखुमाईचा पळून गेला क्षणात
हरी हसले मंदिरात नारदहि आनंदात
हरी हसले मंदिरात नारदहि आनंदात
कवी : प्रसन्न आठवले
०१/०७/२०२०
१४:४६
Comments
Post a Comment